शुक्रवार, १५ जून, २०१२


मृदगंध 

यंदा नेहमीपेक्षा पावसाने जरा उशीराच हजेरी लावली. आधीच महागाईनं त्रासलेले आम्ही मुंबईकर उकाड्यानी अधिकच त्रस्त झालो होतो. हवामानखात्यानी जरी पाऊस उशिरा येण्याची वेगवेगळी कारणं सांगितली असली तरी याचं एक मुख्य कारण फेसबुक असावं असं वाटतं.. काय आहे.. एवढ्या लोकांच्या पावसासंबंधीच्या पोस्टला हजेरी देऊन मग त्याला उशीर होणं स्वाभाविकच आहे ना..!!

पण एका तप्त रात्रीनंतर अगदी सकाळ उजाडताच पावसाने रिमझीम रिमझीम करत मन तृप्त केलं. पहिला पाऊस... वाह..!! कितीही मोठी झाले तरी काही गोष्टींचं वेड कसं जराही कमी होत नाही..!!  म्हणजे.. रस्त्यावरची पाणीपूरी, लहान मुलांच्या बोबड्या बोलण्यातली गम्मत, मोगऱ्याचा गजरा, आपल्या प्रिय व्यक्तीच्या मिठीतली ऊब, समुद्राच्या लाटांशी हितगुज आणि अर्थात पावसात मनसोक्त भिजणं आणि मंद मंद दरवळणारा मृदगंध भरभरून घेणं.....! कितीही वेळा या गोष्टी केल्या - अनुभवल्या तरी याचं वेड, ओढ, गम्मत, मजा, नशा, मुळीच कमी होत नाही, उलट क्षणाक्षणाला वाढतंच असते. त्या सकाळीही पावसासोबत मृदगंध वातावरण उल्हासित करत होता. एक वेगळाच उत्साह, चैतन्य आपल्यासोबत घेऊन आला होता. गरमागरम ब्लॅक कॉफीचा मग हातात घेऊन मी खिडकीत बसले. मधेच हात बाहेर काढून ते इवले इवलेसे मोती हातावर घेत होते. झाडांच्या वर वरच्या पानांवर क्षण दोन क्षण विसावलेले ते थेंब हळूच ओघळून खालच्या पानांवर उतरत होते आणि मग मातीशी एकरूप होत होते. जणू एवढ्यासाठीच ते जन्मले होते....

लहानपणापासून असे किती पावसाळे आले आणि गेले. पण प्रत्येक पाऊस वेगवेगळ्या आठवणींना नकळत उजाळा देत गेला.. एवढेच नाही तर कित्येक नवनवीन आणि मोलाच्या आठवणी देतही गेला. आठवणींचा पेटारा सतत समृद्ध करत राहिला. मनाला आलेली मरगळ झटकत, नवीन उमेद देत गेला. मला वाटतं या मृदगंधामध्येच याचं काहीतरी गुपित लपलं असावं. का बरं सगळ्यांना पावसाएवढाच हा गंधही वेड लावतो? कोणतंही अत्तर यापुढे फिकंच पडेल नाही? कोणीतरी या मातीच्या सुवासाचे अत्तरही बनवले आहे म्हणे.. मोकळेपणाची मजा या सुवासाची खरी खासियत आहे. मग नैसर्गिकरीत्या आणि अशा खास वातावरणात सहज, मनसोक्त घेता येणारा हा गंध खरंच असा बाटलीत बंद करता येईल?

का बरं हे वातावरण, हा सुवास अनेक आठवणीसोबत आणतो? का नवीन गोष्टीही देऊन जातो? उगाचच मला हे प्रश्न त्रास देत होते. मग आठवणींनी अलगद मला कवेत घेतलं. एखाद्या चित्रपटासारख्या त्या झरझर डोळ्यांसमोर येऊ लागल्या. सकाळी धावपळ करत मला बालवर्गात सोडणारे माझे बाबा, अभ्यासाचा कंटाळा करायचे म्हणून माझ्या मागेमागे फिरून तो करायला लावणारी माझी आई, कोणीतरी एक बिस्कीट दिलं तर त्याचं अर्ध माझ्यासाठी काढून ठेवणारा माझा दादा, माझी शाळा, ती सुटल्यावर पावसाळ्यात बेडूक पकडायला येणारी मज्जा आणि मग आईचा ओरडा, रस्त्यावरच्या कुत्रा – मांजरीच्या पिल्लांना हात लावण्यासाठी पळत सुटणारी मी, कथ्थकचा रियाझ, नाटकाची तालीम, चित्रकलेचा वर्ग, कॉलेजच्या मित्रमैत्रिणींसोबत केलेली टवाळकी, लगाम सुटलेल्या घोड्याप्रमाणे या आठवणी येतंच होत्या. धडाम् असा मोठ्ठा आवाज झाला आणि माझी तंद्री तुटली. वीजेचा गडगडाट.... इथे रिमझिमत असला तरी कुठेतरी जोरात पडत असावा. पण त्या आवाजांनी माझी स्मृती मालिका केवळ खंडितच झाली नाही तर आजच्या बदललेल्या परिस्थितीची बोचरी जाणीवही झाली. काळाच्या ओघात किती गोष्टी बदलल्या.. निसटल्या.. मागे सुटल्या... नकळत डोळ्यातूनही अश्रू अलगद गालांवर बरसले.. शाळा संपली, आता कोण सोडायला किंवा घरी घेऊन जायला येणार? अभ्यास आपला आपण करता येऊ लागला, आता आई कौतुकानं माझी प्रगती पाहते. पण तिचा ओरडा..? तेव्हा नकोसा वाटायचा तेवढाच आता हवा हवासा वाटत होता. दादा तर शिकायला गेली ७ वर्ष घराबाहेर आहे. मग आता कसली वाटावाटी? लटके राग आणि भांडणं.. क्वचित कधीतरी अगदी उरावर बसून केलेली मारामारी.. आई बाबांचं कोण जास्त लाडकं यावरून घातलेले वाद... हरवलंच कुठेतरी सगळं.. कथ्थकचा, चित्रकलेचा वर्ग, नाटकाच्या तालीमी सगळ्यांवर पडदा पडला. कॉलेज संपलं आणि सगळेच आपापल्या कामात व्यस्त झाले. अचानक खूपच एकटेपणाची भावना तीक्ष्ण अशी जाणवली. पाऊस थांबून मळभ दाटलं होतं. आतही... बाहेरही... विचित्र बेचैनी जाणवत होती... थोडा वेळ असाच गेला.. सुन्न.. स्तब्ध.. एकाकी... 


अचानक पावसाने जोरदार कोसळायला सुरुवात केली. मातीचा सुगंध वाढला. पावसाचे शिंतोडे माझ्या अंगावर आले. थोडंस बरं वाटू लागलं. तेवढ्यात आई झाडांना पाणी घालायला आली. म्हणाली, “एवढ्या गरमीमुळे माझ्या गुलाबाच्या रोपट्यांना त्रास होत होता. वाटलं पावसापर्यंत तग धरतील की नाही.. पण आता मस्त पालवी फुटेल. छान फुलं येतील.” हे ऐकलं आणि माझ्या डोक्यात विचारांची वीज कडाडली, प्रकाश पडला... खरंच... एकामागून एक असं ऋतुचक्र आपलंही बदलत असतंच. आशा निराशेचा शिवा शिवीचा खेळ अगदी या अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींसाराखाच जणू... आई बाबांनी एवढ्या खस्ता खाऊन शिकवलं, मोठं केलं. एक चक्र पूर्ण झालं. आता त्यांचा आनंद आणि समाधान महत्त्वाचं. खेळताना डॉक्टर होणारा दादा आता खरंच डॉक्टर झाला. आयुष्यभर एकाच जागी राहूनच केवळ सोबत करता येते का? मनाने तर आम्ही नेहमीच जवळ असतो. कॉलेज संपलं आता स्वतःच्या अस्तित्वाची नवीन ओळख करून देण्याची वेळ सुरु झाली. जुने छंद मागे पडले पण नवीन आवडीही निर्माण झाल्याचं की...

आता संपूर्णपणे समाधानाने मी श्वास भरभरून घेतला आणि अचानक त्या कोड्याचा उलगडाही झाला. मुदगंध हा पावसाची ग्वाहीच आपल्याला देत असतो. दूरवर कोसळणाऱ्या पावसाची खबर इथे तिथे पसरवतो आणि आपल्याला पाऊस येईल असा दिलासा देतो. रणरणत्या उन्हानी शुष्कं झालेली धरती आता परत हिरवी गार दिसणार, हवेत गारवा येणार, पिक पाणी व्यवस्थित मिळणार, कॉफी आणि कांदा भाजी असे बेत होणार, पाऊस खूपच झाला की कामावर दांडी मारता येणार, असे एक एक मनसुबे आपण आधीच आखत असतो आणि ही सारी कल्पनांच्या भरारीची किमया पावसाआधी हा मृदगंध घडवून आणत असतो. मग हा वेड लावणारंच ना..! वातावरणातील नैसर्गिक बदलांचा थेट परिणाम आपल्या मनावर होत असतो असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. अगदी खरंच तर आहे हे. तसंच काहीसं माझंही झालं होतं. धो धो बरसणाऱ्या पावसाने झाडांवरची माती जशी निघून पाने स्वच्छ होतात तसंच मनही आता स्वच्छ आणि टवटवीत झालं होतं. जुने विचार मागे टाकून नव्या विचारांचे कोंब अंकुरीत होत होते. मी परत कॉफीचा मग भरला आणि गरमागरम घोटासोबत नभातून तसंच “त्याच्या” नजरेतून, स्पर्शातून बरसणाऱ्या पावसात एकाच वेळी चिंब चिंब भिजताना कशी मजा येईल या विचारात गुरफटले...!!

शुक्रवार, ८ जून, २०१२


त्या टोकावर मी तुझीच वाट पाहत असेन... 


तू येशील जगाची सफर करून,
येशील चंद्र चांदण्यांना हात लावून,
येशील तुझ्या स्वप्नातलं जग जिंकून...
तू विसरलास जरी परतीचा रस्ता...
तरी त्या टोकावर मी तुझीच वाट पाहत असेन..
कितीही दूर गेलास तरी तसंच प्रेम करत असेन.....

माझ्यासोबत असतील तुझ्या आठवणी केवळ..
तू येशील तेव्हा त्यांची ओळख असेल का तुझ्याजवळ??
पण तुझा स्वप्नांची मी काळजी घेईन,
विस्कटलेला संसार नीट सांभाळीन,
आणि तरीही त्या टोकावर मी तुझीच वाट पाहत असेन..
कितीही दूर गेलास तरी तसंच प्रेम करत असेन.....

तू परत येशील तेव्हा खूप खूश असशील,
तुला हवं ते सगळं मिळवून आला असशील,
इथली मी मात्र तुला आता वेगळीच वाटेन...
सगळं तेच असलं तरी..मी त्या जुन्या तुझ्यावरच प्रेम करत असेन..
आणि म्हणूनच तू आलास तरी.. त्या टोकावर त्या जुन्या तुझीच वाट पाहत असेन...
कितीही दूर गेलास तरी तसंच प्रेम करत असेन.....