गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०१५

चक्र

           “अग कुमुद, ये ये.. अशी दारातच काय उभी! सोनं द्यायला आलीस ना? मग लाजायचं काय एवढं त्यात?” वैद्य काकूंनी कुमुदचा हात धरला आणि तिला पलंगावर बसवलं. “प्रेम करताना लाजत नाहीत; आता कसली आली आहे एवढी लाज?” वाती वळता वळता काकूंच्या सासूने होणाऱ्या नात सुनेला टोमणा मारला. “असू द्या हो आई.. आजकालची मुलं ठरवतात आपलं आपण.. आणि कुमुदला तर आपण लहान असल्यापासून पाहत आहोत. आपल्या डोळ्यासमोरच मोठी झाली ही पोर. आता चार खोल्या सोडून इथे येणार राहायला एवढाच काय तो फरक. मुलगी शिकलेली आहे, गुणी आहे, आपल्या किशोरला आवडते. दोघ सुखाचा संसार करतील बघा.” एवढ्यात किशोर आतून बाहेर आला. “अरे वाह! आज साडीत!” कुमुद अजूनच लाजून, खाली मान घालून बसते. “आता चारचौघात कौतुकंपण करा हो.. आपण ठरवलेल्या बायकोची..” असं म्हणत वैद्य आजी आत निघून गेल्या. काकूंनी कुमुदचा हात दाबला आणि मुक्यानेच तिला मनाला लावून घेऊ नको असं सांगितलं. “आजीचं मनावर घेऊ नकोस.. ती अशीच. जरा प्रेमाने बोलणार नाही तोंडावर. पण परवाच धाकट्या मामीला कौतुकाने सांगत होती, आमची नात सून लाखात एक आहे. सुंदर तर आहेच पण हुशारही आहे. एम ए झाली आता. पुरण पोळ्याही अगदी पटापट करते हो!” असं म्हणत किशोरनेही तिची समजूत घातली. आपल्या कौतुकाने सुखावून कुमुद खुदकन हसली. किशोर सोनं देऊन आईच्या पाया पडला. कुमुदही सोनं देऊन लगेच नमस्कार करण्यासाठी वाकली. काकूंनी तिला मायेनं जवळ घेतलं आणि गालावरून हात फिरवून चुंबन घेतलं. वडिलांनी एकट्याने वाढवलेल्या कुमुदच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ते लक्षात येताच किशोरने काहीसे विनोदी बोलून वातावण हलक केलं. या त्रिकुटाच्या गप्पा सुरु झाल्या.

          एवढ्यात आजूबाजूची चार पाच लहान पोरं हातात आपट्याची पानं घेऊन आली. कुमुदने त्यांना आपट्याची पान वाटण्या मागची गोष्ट सांगितली. मग काकूंनी त्या प्रत्येकाच्या हातावर घरी बनवलेली खोबऱ्याची वडी दिली. ती खाऊन झाल्यावर ही वानरसेना पुढच्या घरी निघाली. ती जात आहेत तोवर चाळीतील वरच्या मजल्यावरच्या कदम वहिनी आपल्या दिपाला घेऊन आल्या. वडी तोंडात टाकत म्हणाल्या; “आमच्या बयेला पातळ नेसायची हौस. पण मला सातवा महिना आहे ना.. वाकता येत नाहीये आणि पलंगावर उभी केली तरी हिची वळवळ फार. जरा तुमच्या पद्धतीच लुगडं नेसवा ना काकी.” पूर्ण चाळीत कजाग म्हणून प्रसिद्ध असलेली ही कदम वहिनी. पण वैद्य काकूंच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्याशी नेहमीच आदराने बोलत असे. काकूंनी दिपाला सुंदर नटवली आणि कदम वहिनींच्या हातात तिच्यासाठी केलेले लाडू दिले. कदम वाहिनीने घरी जाऊन “तुमच्यापेक्षा त्या काकींना बघा माझी किती काळजी!” असे सासूला सुनावले.

          वैद्य काकू आपला मुलगा आणि होणाऱ्या सुनेसोबत गप्पा मारीत होत्या. अधुनमधून चाळीतली लहान पोरं, नवीन लग्न झालेली जोडपी, अन्य चाळकरी, किशोरचे मित्र, जवळचे नातेवाईक, यांची ये जा चालूच होती. तशीही निमकरांची चाळ नेहमी गजबजलेली असायची. सुखदुःखात हे चाळकरी एकमेकांच्या सोबत असायचे. चाळीत सर्वांची दार नेहमीच बिनधास्त उघडी असायची. पाटणकरांचं एकंच, नवीन लग्न झालेल्या आणि घरात दोघंच राहत असलेलं असं घर होत. नाहीतर बाकी सर्व घरात २ – ३ पिढ्या एकत्र आनंदात नांदत होत्या. दोघे नवरा बायको कामावर जाताना दाराला कुलूप लावून जायचे. पण किल्ली शेजारच्यांकडे असायचीच. चाळीत कोणाकडेही पाहुणे आले की लहानश्या खोल्यांमध्ये गर्दी होत असे. तेव्हा पाहुण्यांच्या आंघोळीसाठी आणि दुपारी वामकुक्षीसाठी चाळकरी खुशाल पाटणकरांची खोली वापरत असत. कदम वहिनी स्वतःच्या आणि जावेच्या पोरांसह चाळीतल्या बाकी पोरांनाही दंगा केल्यावर खुशाल रट्टे देत. कधी जेवायला, कधी पत्ते, कॅरम खेळायला एका घरी बाकी काही चाळकरी जमायचे तेव्हा ते अगदी नात्यातले असावे एवढे एकाच रंगत न्हायलेले दिसायचे.

          चाळीच्या फाटकासमोर एक मोटारगाडी थांबली. चाळीच्या मालकीणबाई न चुकता सणासुदीला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी येत असत. पण गेलं वर्षभर त्या इथे फारशा आल्या नव्हत्या. त्या आत आल्यावर चाळकरी त्यांच्या भोवती जमले. सर्वांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. “मागच्या वर्षी आमच्या अरविंदाचे अपघाती निधन झाले तेव्हा तुम्ही गणेशोत्सव साजरा केला नाहीत ते समजले.” मालकीणबाई बोलत होत्या. “अहो लीला ताई, तुमच्या अरविंदाला आम्ही लहान्या असल्यापासून खेळवला होता. आमच्या पोरांसोबत त्यालाही कधी खाऊ दिला होता. तुम्ही कधी परक्यासारख्या वागल्या नाहीत आमच्याशी. घरात काही अप्रिय घटना घडली तर कसला आलाय सण!” गोडसे काका त्यांना म्हणाले. लीला ताईंनी नम्रपणे हात जोडले आणि यापुढे पुन्हा सर्व सण साजरे करूया, असं म्हणाल्या. थोड्यावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि त्या निघून गेल्या.

          वैद्य काकू काही कामासाठी आत निघून गेल्या. किशोर आणि कुमुद पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरले. “जोडा कसा शोभून दिसतोय!” असं सर्वांनी त्यांना सांगितलं. समवयस्कांनी चेष्टा केली. चाळीसमोरच्या बागेतील बाकड्यावर जाऊन दोघं बसले. दोघांना लग्न अगदी साधसं हवं होतं. “हीच वेळ आहे पैसे कमावण्याची आणि जमवण्याची. आत्ता लग्नात वगैरे खर्च करण्यापेक्षा आपण हे पैसे जपून ठेऊ. आज इथे लहानश्या चाळीत आपण भाड्याने राहतो. घरी पाहुणा आला की आमची रवानगी बाहेर होते झोपायला. खूप अडचण होते. हेच आयुष्य मला आपल्या मुलांसाठी नकोय. थोडं मोठ आणि आपलं स्वतःच घर हवंय मला.” चाळीतल्या काही जणांनी एवढ्यात आजूबाजूच्या चाळींमध्ये किंवा गावाबाहेर घरं घेतली होती आणि आपलं बस्तान हलवलं होतं. तरीही प्रत्येक सणाला ते निमकर चाळीत हजेरी लावत होते. किशोरलाही असेच वेध लागले होते. पण, त्याच्या आणि वडिलांच्या नोकरीची जागा या घरापासून जवळ होती. इथे आसपास आता इमारती होत असल्याने आणि नवनवीन उद्योगांच्या कचेऱ्या येत असल्याने जागांचे भाव वाढले होते. त्यामुळे इथेच जागा घेणे किंवा ही जागा सोडणे यापैकी काहीच सध्या शक्य नव्हते. किशोरची यामुळे होणारी चिडचीड, घुसमट लक्षात घेऊन कुमुद मात्र त्याला काही वर्षांनी नक्की जवळच जागा घेता येईल असं समजावत नेहमी आधार देत होती.

          अशीच बरीच वर्ष गेली. निमकरांची चाळ अशी जुनी ओळख जाऊन त्या जागेला पार्क व्ह्यू असे नाव मिळाले. मोठा टॉवर उभा राहिला. प्रत्येक मजल्यावरची दार आता बंद असतात. चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे चाळीसोबातच विसर्जन झाले. पार्क व्ह्यूमध्ये सातव्या मजल्यावर राहणाऱ्या पटवर्धनांच्या नीताने आज पहिल्यांदाच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अरोरा आंटीच्या घराची बेल वाजवली. आपल्या आजारी भावाला शेजारच्या घरातून येणाऱ्या कर्कश आवाजाचा त्रास होतो आहे म्हणून वैतागून नीता त्यांच्याकडे गेली होती. ५ – ६ वेळा बेल वाजवल्यावर आंटीने दार उघडले. “घंटी तो चालू हे.. लेकीन आवाजही नाही सुना.. क्या हुआ?” असं तिने नीताला विचारलं. नीताने आवाज कमी करण्याची विनंती केली. त्यावर “अरे डियर डोन्ट से आंटी.. अँड वो नौ दिन कुछ खाया पिया नाही ना ताकदवाला.. तो आज दशेहरा पार्टी है| नॉईस तो होगा ही ना! तुमलोग जरा अडजस्ट करो ना आज|” असं म्हणून दार लावून घेतलं. नीता फणफणत घरी आली. आजारी भावाकडेही तिने वैतागून पहिले. घरी कोणीच नव्हत आणि याच्या आजारपणामुळे तिला मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जाता आलं नव्हत. इतक्यात तिची आजी आली. मुलाला बरं नाही म्हणून त्यांच्या सुनेनं धाकट्या जावेला फोन करून काही दिवस आधीच त्यांना बोलवून घेतले. एक महिना धाकट्या तर एक महिना मोठ्या मुलाकडे त्यांची सोय (?) केली असते. आजीने नातीच्या हातात आपट्याचं पान दिलं आणि डोक्यावरून हात फिरवून म्हणाली; “जा बाळ, मित्र मैत्रीण, इमारतीतील सगळे, यांच्याकडे सोनं देऊन ये. मी साडी नेसवू का तुला? की निषादच्या वाढदिवसाला घातलेला पंजाबी ड्रेस घालशील? तोंड कसं उतरलंय पहा! काही खायला करून देऊ का आधी?” नीता खूपच वैतागली, “व्हॉट रब्बीश आजी! हे असलं पान देऊन काय मिळतं तुम्हाला? उगीच झाडांना तोडून टाकता. मरतात ती तुमच्यामुळे... आणि प्लीज.. इथे कोणी असं घरोघरी जात नाही.. साडी नेस म्हणे! तू बस इथे. मी चालले फ्रेंड्ससोबत केएफसीला चिकन खायला. मम्माला सांग उशिरा येणारे घरी, उगीच फोन करू नकोस.” आजीला मात्र झाड कुठे कोणी तोडतंय आणि आपण झाड तोडतो असं म्हणणारी ही त्या कोंबडीची मान तोडून खाणार आहे या विचारानेच अंगावर शहारा आला. नेहमीप्रमाणे आजी गप्प बसली. शेजारून चित्र विचित्र गाण्यांचा आवाज होताच. नातवाला झोप लागली होती. घरात आता कोणीच नव्हतं. शेजारी कोणीच ओळखीचं नाही... त्यामुळे ती बसली टीव्ही लावून.

          पार्क व्ह्यू समोर एकाने आपली बाईक थांबवली. मागे बसलेल्या मुलीने काही विचारण्याआधी तो म्हणाला, “इथे आधी माझे आई बाबा राहायचे. या टॉवरमध्ये नाही.. चाळ होती इथे. बघ ना.. आता कसला मस्त टॉवर झालाय! आपला फ्लॅट केवढा लहान वाटतो! मलापण अश्या टॉवरमध्ये जागा घ्यायची आहे. जमेल?” मागे बसलेल्या तरुणीने त्याचा हात धरला आणि म्हणाली, “जमेल की.. तू इंजिनिअर आहेस, मी प्रोफेसर आहे. जमवू पैसे आणि घेऊ नवीन घर. वेळ लागेल पण अशक्य नाही अगदीच.” त्याने मागे वळून समाधानाने तिच्याकडे पहिले. “पण सध्या बाईक स्टार्ट करा मिस्टर अभिषेक किशोर वैद्य. आपल्याला इथून आपल्या घरी पोहोचायला किमान दीड तास तरी लागणार आहे. आई बाबा जेवायला थांबले असतील.” तो भानावर आला. बाईक सुरु करून भुर्र निघाला...!

    © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे