शुक्रवार, २३ मे, २०१४

Pamper Yourself

          बापरे..! साडे पाच वाजले! झोप लागतेच कुठे पहाटे चार वाजेपर्यंत? जेमतेम तासाभरात उठून, आवरून ६ वाजताच घरातून बाहेर पडायचं. मग पुढे लोकलवारी. दादरपर्यंत उभ्यानेच जा. एवढ्या सकाळीही क्वचितच फोर्थ सीट मिळते बसायला. त्यात पण काही बायका अशा काही पसरून बसतात की जागा असूनही आपल्याला बसता येत नाही. दादर ते अंधेरी जागा मिळते पण मग अंधेरी येईपर्यंत झोप येऊ लागते. मग तसेच पेंगुळले डोळे घेऊन कामाची सुरुवात करा. दररोज वाढणारा कामाचा व्याप, कामासोबतच मास्टर्सचा अभ्यास, रोज हा चार तासांचा ट्रेनचा प्रवास आणि घरी आले की घरातूनही करावी लागणारी काही लहानसहान कामे आणि घरात आणि बाहेर सतत होणाऱ्या लहानसहान कुरबुरी! विचार करूनच वैताग आला. वाटलं, घेऊया सुट्टी. जायचंच नाही कामावर. मस्त ताणून देऊ. खूप वेळ झोपू. मग लक्षात आलं की कालही आपल्याला उठल्या उठल्या असेच विचार मनात आले होते आणि परवाही.. कदाचित त्या आधीदेखील! तेवढ्यात आईचा आवाज आला, “आज जायचं आहे की नाही? रात्रभर जागते त्यामुळे माझी झोपमोड होते. पुन्हा सकाळी तुला उठवायचं आणि डबा करून द्यायचा म्हणून एवढ्या लवकर उठावं लागतं. एवढी मोठी झाली तरी स्वतःला गजर लावून उठता येत नाही! उठवायला, डबा करून द्यायला, सगळं सामान घेतलं ना याची आठवण करून द्यायला अजून आई लागते. लग्न झालं की कसं होणार देव जाणे..” आता मात्र झोपायची इच्छा झाली तरी झोप मिळणार नाही हे समजलं आणि नाईलाजाने मी उठले. कामावर पोहोचायला उशीर तर झालाच पण नेहमीची ट्रेन हुकली त्यामुळे अचाट गर्दीचा सामना करायला लागला. आधीच उठल्यापासून काही चांगले विचार मनात येत नव्हते त्यातून ट्रेनची गर्दी, प्रचंड उकाडा आणि कोणत्याही कारणांवरून भांडणाऱ्या बायकांचा आवाज ऐकून माझ्या निरुत्साही, वैतागलेल्या विचारांना खतपाणीच मिळालं.

          रोजच्यासारखी कामं चालू होती. आज मात्र त्यात काहीतरी यांत्रिकता आल्यासारखं वाटत राहिलं. रोज रोज तेच ते.. काहीच नवीन नाही. आजकाल तर सोमवार का येतो? असंच वाटतं आणि मंगळवारपासूनच शनिवार – रविवारच्या हक्काच्या सुट्टीचे वेध लागतात. तेवढ्यात मैत्रिणीने विचारलं, “सुट्टीचा काय प्लान आहे?” “सुट्टी? आज तर गुरुवार आहे. कसली सुट्टी?” मग लक्षात आलं की धुळवडीची सुट्टी आणि शनिवार, रविवार असे लागून आले आहेत. सुट्टी.. हेच तर हवं होतं आपल्याला. मग तरीही आनंद का नाही झाला? मी माझ्याच विचारात.. आणि इथे माझ्या मैत्रिणीचे ३ दिवसांचे काय काय प्लान आहेत याची वर्णन चालू होती. ती कुठेतरी बाहेर जाणार आहे एवढंच समजलं मला आणि आपण किती दिवसात बाहेर गेलोच नाही फिरायला हे आठवलं. एकूणच उदासीनतेचा पारा ‘वाढता वाढता वाढे’ असाच होत होता. संध्याकाळपासूनच मुंबईमध्ये ठिकठिकाणी लोकांच्या अंगावर फुगे मारा. उगीच घराखालून किंवा समोरून जाणाऱ्या माणसांच्या अंगावर रंग उडवा असले प्रताप सुरु होतात. त्यामुळे आज सगळ्या महिला वर्गाला कामावरून लवकर निघता येणार होतं. घरी जाऊन खूप झोपूया असा विचार मनात डोकावला. इतक्यात आईचा फोन आला. “भरून ठेवलेला डबा साधा पर्समध्ये घालायला पण लक्षात राहत नाही? तरीही मी अगदी तुझ्या पर्स जवळच ठेवते तो. आज जाताना विचारलं नाही ना सगळं ठेवलं आहेस ना सोबत? तर लग्गेच विसरलीस! आता काहीतरी खाऊन घे बाहेरच. आणि वेळेवर खाऊन घे. तशीच उपाशी राहू नको. जागरण झालंय आणि त्यात अजून उपास नको. गेल्यावेळेस ट्रेनमध्ये चक्कर आली होती, आठवतंय ना? जीवाला घोर उगीच आमच्या..” उफ्फ..!!! मला लहानपणापासून भूक सहन होत नाही. भुकेच्या वेळेस कोणी माझ्या भल्याचही सांगत असेल तरीही माझ्यापाशी ते ऐकण्याचा संयम नसतो. त्यात सकाळीच मातोश्रींनी आमच्या नावाने भूपाळी आरवली होती आणि आताही तेच. त्यातून पोटात कावळे ओरडत होते. मी काहीही विचार न करता आई बोलत असतानाच फोन बंद करून टाकला. खरंच, एवढी साधी एक गोष्ट आपल्या लक्षात राहू नये? बरीच कामं आपण अशीच नंतर करू म्हणून ढकलतो आणि विसरूनही जातो. आवडत्या ठिकाणी, आपल्याला आवडणार काम करत आहोत पण त्यातही उत्साह नाही. वैताग आला आहे सगळ्याचाच. कशीबशी कामं आटोपली आणि ४ वाजताच मी निघाले. आता भूकही लागली होतीच आणि आई आपल्याच काळजीपोटी आपल्याला बोलत होती याची जाणीवही तीव्र झाली होती. स्वतःवरचाच राग आपण आईचा फोन कट करून तिच्यावर काढला या भावनेने शरम वाटली. पण स्वभाव असा अडेलतट्टू की घरी जाऊन माफी मागू असंदेखील मन ऐकत नव्हतं.

          मी सरळ एकटीच मरीन ड्राईव्हला गेले. का? माहित नाही.. पण घरी जाण्याची इच्छा नव्हती. हे ठिकाण माझ्या खूप आवडीचं. कॉलेजमध्ये असताना तर दर काही दिवसांनी इथे दौरा ठरलेला. आता एकटीलाच त्या गोष्टी आठवत होत्या. शेवटची कधी आले होते मी इथे? धन्याचं लग्न ठरलं तेव्हा सगळे भेटलो होतो वाटत. अरेच्या! म्हणजे जवळपास वर्ष होत आलं. इथून घरी परत जात असताना सीएसटीहून आरामात बसायला जागा मिळते तेव्हा मी वाचत असे.माझ्या बॅगेमध्ये नेहमीच एखादं पुस्तक असे. फावल्या वेळेत वाचायचं किंवा भरपूर गाणी ऐकायची हा माझा आवडता कार्यक्रम. इतक्यात कोणतच पुस्तक नाही वाचलं की नवीन गाणीही माहित नाहीत. जुनी गाणीही ऐकून बराच वेळ झाला. काय होतंय हे सगळं? मीच आता मला अनोळखी वाटू लागले. आजूबाजूच्या अपरिचीत जगाचाच एक भाग असल्यागत मी स्वतःकडे पाहू लागले. मी वैतागून डोकं हलवलं. मार्च महिना, त्यात मुंबईचा उकाडा.. सूर्य निरोप घेत होता पण अजूनही गरम वाफा येत होत्या. त्यात सकाळपासून घराबाहेर.. जरा बरं वाटावं म्हणून मी पर्समधून वेट टीश्यू काढला आणि चेहरा खसाखसा पुसला. धूळ निघाली चेहऱ्यावरची... पण, या स्पर्धेच्या युगात तग धरून राहण्यासाठी रोज जी वेगवेगळी पुटं आपण चढवतो त्यांचं काय? ती अशी खसाखसा पुसून निघणारच होती जणू! चेहरा पुसल्यावर सवयीप्रमाणे आरसा हातात घेतला.  पण आज कसं कोणास ठाऊक पण आरश्यात स्वतःला बघून गुलजार साहेबांच्या ओळी आठवल्या. “हम नहीं थे आइनेमे, बाकी तीनों थे.. एक नोकर, एक रुतबा, एक वर्दी थी..” मला माझ्याच विचारांचा उबग येऊ लागला होता. तेवढ्यात एक मोठी लाट आली आणि तिने हलकेच काही शिंतोडे माझ्या तोंडावर उडवले. मी लगेच चेहरा पुसण्यासाठी हातात रुमाल घेतला. पुन्हा तेच.. समुद्राचं खारं वारं आणि पाणी पुन्हा माझ्या गालांवर आलं. ते पुसायला गेले पण, हात तसाच थांबला. आता मलाच माझं अनोळखी होण्याचं कोडं उलगडू लागलं. इथे तासंतास मी अशीच खारं वारं आणि पाणी अंगावर घेत बसायचे. आताही तेच हवंय मला खरंतर. लहान मुलाला भूक लागली तरी समजत नाही आणि ते ते चिडचीड करतं. मग आईलाच ते समजतं आणि ती त्याला लाडीगोडीने भरवते, तसंच मलाही नेमकं काय होतंय हे मला कळत नव्हतं. पण, ते समजलं ते या वारा आणि पाण्याच्या स्पर्शाने. स्वतःवरच रुसलेल्या या बाळाच्या गालांना स्पर्श करून ते पाणी गुदगुल्या करत होतं. दिवसभर उन्हात वणवण केलेल्या जीवाला फुंकर घालून वारा शांत करू पाहत होता. आता अचानक मला हवेत जरा प्रसन्न शीतलता आल्यासारखी वाटली. मी उभी राहिले. त्या कट्ट्यावरून चालू लागले. गच्च वर बांधलेले माझे लांब केस सोडले. वाऱ्यावर त्यांना मनसोक्त उडू दिलं. भरभरून तो खारा वारा आत साठवून घेतला. हेडफोन्स काढून मोबाईलवर माझी आवडती गाणी ऐकली. एक वेगळाच आनंद होत होता. तेवढ्यात घड्याळाकडे लक्ष गेलं. निघायला हवं. फोर्ट फेरीने सीएसटी स्टेशन गाठलं.

          मोबईलची बॅटरी उतरली होती. आईने अजून काळजी करू नये म्हणून तिला फोन करून दीड तासात पोहोचते असं कळवलं. फोन ठेवताना तिला जेवायला काही करू नकोस असंही सांगितलं. ट्रेन सुरु झाली. आता तासाभराने उतरायचं. हल्ली ट्रेनमध्ये बसायला पुरेशी जागा मिळाली की मला लगेच झोप लागते. आज मात्र तसं नाही झालं. एक उत्साह संचारला होता. माझ्या शेजारी एक बाई दोन लहान मुलांना घेऊन बसली होती. तिच्या मांडीत जेमतेम ६ महिन्यांचं तान्हुलं होतं तर पुढ्यात ४ वर्षांचं. त्या छोटुला मी माझी खिडकीची जागा दिली. ट्रेन सुरु झाली. छोटूसोबत गप्पा रंगल्या. त्याला गोष्टी सांगितल्या. थोड्या वेळाने त्याला भूक लागली तेव्हा तो आईपाशी भुणभुण करू लागला. तिला दोघांना सांभाळणं कठीण जात होतं मग मी लगेच तान्हुल्याचा ताबा घेतला. अगदी माझं स्टेशन येईपर्यंत ते माझ्या मांडीत होतं. जाताना त्याच्या आईने दोनदोनदा माझे आभार मानले. तेव्हा अवघडल्यासारखंच झालं. तिची मदत म्हणून मी कुठे काही केलं होतं? माझी आवड म्हणून केलं आणि त्या दोन्ही पिल्लांनी मला अजूनच उत्साह दिला. हे तिला कसं समजवू शकले असते मी?

          आईला माझे मोकळे केस आवडत नाहीत, वेणी आवडते. त्यामुळे ट्रेनमध्ये बसल्यावर मी वेणी घातली होती. ती पाहून मी घरी आल्यावर आईच्या चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह उमटलं. पण सकाळपासून वैतागलेल्या मला आल्याआल्या प्रश्न विचारायला नको म्हणून ती काहीच बोलली नाही. अंघोळ करून मी बाहेर आले आणि स्वयंपाक घरात शिरले. थोड्या वेळाने आईला खिचडी तयार आहे असं सांगितलं. आईला खिचडी जेवढी आवडते तेवढीच मला नकोशी असते. लहानपणापासून तोंड वाकडं न करता मी कधी खिचडी खाल्ली नाही. आज मी स्वतः गाणी गुणगुणत खिचडी केली त्यामुळे आता मात्र आईला राहवलं नाही. “आज हे काय आक्रीत?” असं तिने पानं घेताना विचारलंच. मी हसले आणि आईसाठी आठवणीने आणलेली तिची आवडती चाफ्याची फुलं तिच्या हातात दिली. “जास्त चिडले ना उगीच.. चुकले गं.” असं म्हणाले. आई मनापासून हसली पण लिंबाच्या लोणच्याची बरणी काढता काढता तिने, “आत्ता म्हणालीस ठीक आहे. पण उद्यापासून पुन्हा सगळं असंच असणारे हे माहित आहे मला.” असा टोला लगावलाच. मग दोघी मायलेकींनी वाफाळत्या खिचडीवर ताव मारला. मातोश्री आज उगीच कौतुक करीत खिचडी खात होत्या. मग मला ती आवड नसूनही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कौतुक यामुळे दोन घास जास्तच गेले. रात्री आईने डोक्याला तेल लाऊन दिलं  आणि मग पाउलो कोएल्लोचं पुस्तक वाचता वाचता मला कधीतरी झोप लागली.

          सकाळी कोणीही न उठवता आणि सुट्टी असून लवकर जाग आली. मी लगेच घराबाहेर पडले. रंग विकत घेतले आणि गल्लीतल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना जागं करून घरी जाऊन रंग लावला. बऱ्याच दिवसांनी सगळ्यांना भेटले. त्यांनीही गेली अनेक वर्ष रंग खेळले नसल्याचं आणि माझं असं अचानक घरी येऊन सरप्राईज करण्याने त्यांना छान वाटल्याचं कबुल केलं. मग सगळे तसेच रंगलेले चेहरे घेऊन आमच्या घरी आले. आमच्या मातोश्रींना सगळ्याच गोष्टी आधीच कश्या कळतात देव जाणे! तिने सगळ्यांसाठी दडपे पोहे करून ठेवले होते. गप्पा आणि पोहे यांचा पोटभर आस्वाद घेऊन सगळे निघाले. मीपण मस्त अंघोळ केली, एक चित्रपट पहिला आणि झोपी गेले. रविवारचा दिवसही आईसोबत शॉपिंग करण्यात आणि गप्पा मारण्यात घालवला. संध्याकाळ झाली आणि विचार आला की संपली सुट्टी. आता उद्या पुन्हा सगळं आधीसारखं. अभ्यासाची टिपण काढलेली डायरी मला दिसली आणि पुन्हा एकदा चिंतेची हलकीशी लकेर चेहऱ्यावर उमटली. नोकरीसोबत शिक्षण पूर्ण करणं खरंच जमणार आहे ना मला? डायरीखालची फाईल मी हातात घेतली. त्यात माझी शाळा, कॉलेजमधली आणि विद्यापीठात प्रथम  आल्याची वगैरे बरीच प्रमाणपत्रकं होती. ती पहिली. तेव्हाही परिस्थिती फारशी अनुकूल नव्हती हे आठवलं. तेव्हाही भीती वाटत होती पण जमवलंच की आपण! असा विचार आला आणि हुरूप आला. “हो, मी हे करणारंच!” असं स्वतःलाच मी बजावलं. आता कसलाच ताण जाणवत नव्हता. मग पुस्तक वाचायला घेतलं. रात्री झोपण्याआधी आठवणीने आठवणीने मी ते पर्समध्ये ठेवलं. 

          घड्याळाचा गजर लावताना आईने, “सुट्टी संपली. तेव्हा उद्या सकाळपासून वैताग आणि चिडणं सुरु ना?” विचारलं आणि दोघी हसत सुटलो. आता एक गोष्ट मला पक्की समजली होती. मोबाईलची बॅटरी जास्त डाऊन झाली की तो बंद करून आपण चार्ज करतो. तसंच, आपल्याला स्वतःची गणितं चुकत आहेत, काहीच बरोबर होत नाही आहे असं वाटायला लागलं की एक लहानसा ब्रेक घ्या. स्वतःला आवडत ते करा. स्वतःचेच लाड करा. कौतुक करा आणि मग बघा पुढच्या आव्हानांसाठी पुन्हा नव्या उमेदीने आपण कसे उभे राहतो!

-     वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.