शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

उशीर
         
            "तू हवं तेव्हा निघ. मी पोहोचेन वेळेतच... नेहमीप्रमाणे. पण, तू आजही उशिरा आलास तर मी थांबणार नाही. आज शेवटची भेटणार होते, तीही तशीच निघून जाईन." रस्त्यात वाट पाहत उभं राहण्याचा तिला अत्यंत तिटकारा. रागाने फणफणतच श्रेया घराबाहेर पडली. "आज काय तो सोक्षमोक्ष लावतेच. वेळ तर नसतोच कधी याला पण आता तर सतत चिडचीड! नेहमी वैतागून बोलतो." अशाच सगळ्या विचारात गढून गेली असल्याने पावसाळ्याचे दिवस असून ती छत्री घ्यायला विसरली. स्टेशन जवळ आलंच होतं एवढ्यात मुसळधार पाऊस सुरु झाला. छत्री विसरल्यामुळे स्वतःवरच वैतागली.
          चार पाच ट्रेन्स समोरून गेल्या, तरीही पावसामुळे तिला हताश होऊन, स्टेशनसमोर रस्त्यातच एका शेडखाली उभं राहावं लागलं होतं. "पाऊस नसता तरीही साहेबांची वाट पाहत असंच ठाणे स्टेशनबाहेर वाट पाहत थांबावं लागलंच असतं." तिची आतल्याआत धुसफूस सुरूच होती. पावसाचा जोर जरा कमी झाल्यावर तिने भराभर रास्ता ओलांडून प्लॅटफॉर्म गाठला. तर पुढची ट्रेन १५ ते २० मिनिटं उशिराने असल्याची घोषणा झाली. घड्याळाचा काटा पुढे जात होता तसा श्रेयाचा रागही वाढत होता. तेवढ्या वेळात दोन वेळेस श्रीकांतचा फोन येऊन गेला. तिने समजूनही दुर्लक्ष केलं. "फोन नाही उचलला की कसं वाटतं बघ आता!" तिने ठरवलं होतं. २० मिनिटांनी एक ट्रेन आली. तोपर्यंत गर्दी जास्त झाली असल्यामुळे श्रेया चढू शकली नाही. “किती वाजले?” तिने मोबाईल पाहिला. श्रीकांतचे ५ मिस कॉल!! "अरे वाह! रोज तर लक्षातही नसतं फोन वगैरे करावा असं. आज बरा वेळ मिळतो आहे!" तिने फोन पुन्हा बॅगेत टाकला. पाऊण तासांनी श्रेया ट्रेनमध्ये चढू शकली. "मी पोहोचलो आहे. ट्रेनचा गोंधळ आहे. सावकाश ये." "कुठे पोहोचलीस?" "मला काळजी वाटत आहे. मेसेज, कॉल पाहूनही उत्तर मुद्दाम देत नसशील तर असं करू नको, प्लिज." हा शेवटचा मेसेज वाचून तिने त्याला कॉल केला. बिचारा खरंच काळजीत होता. त्याच्या आवाजातून श्रेयाला ते लगेच समजलं. तरीही, आपला तोरा सांभाळत, तिने "आता वाट बघ आणि कसं वाटतं सांग!" असं तोंड वाकडं करत उत्तर दिलं. डोंबिवली ठाणे अर्ध्या तासाचं अंतर... पण, आज ट्रेन थांबत थांबत दिड तासाने ठाण्याला पोहोचली. तेवढ्या वेळात पाऊस, मोबाईलवरील गाणी, फोटोज, त्याचे अधूनमधून येणारे कॉल आणि मेसेज यामुळे तिचा राग मावळत होता. बऱ्याच दिवसांनी तो आपली वाट पाहतोय आणि त्याला अजून काळजी आहे, या विचाराने ती सुखावली होती.
          तशी श्रेयाही तापट. याबाबतीत अगदी श्रीकांतपेक्षा चार पावलं पुढेच. हे तिलाही मान्य आहे आणि मनापासून ती बऱ्याच वेळेस शांतपणे बोलायचा प्रयत्न करत असते. पण, आजकाल कामाच्या गडबडीत किंवा श्रेयाचा (अव)गुण लागल्यामुळे श्रीकांतही चिडका झाला आहे. कितीही "सोक्षमोक्ष लावायचा" ठरवलं तरीही दोघांनाही हे शक्य नाही हे माहित होतं. पण, तरीही एकमेकांपासून दूर जाण्याची भितीही होती. श्रेया स्टेशनबाहेर आली. समोरच तिला श्रीकांत दिसला. काळजी, आपण चुकलो असल्याची भावना, सगळं अगदीच स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. श्रेया थोडी हट्टी आणि लाडोबा असल्यामुळे राग ओसरला असला तरी ती काही एवढ्यात ते दाखवणार नव्हतीच. आपल्याला उशीर झाला पण, श्रीकांत कारणं देतो तसं आपलं अजिबात नाही. ट्रेनमुळे गोंधळ झाला. असा सगळा विचार तिच्या मनात चालू होता. चिडल्यावर, भाव खाताना, एखादा टोमणा ती सहज मारते. अगदी तशाच सवयीप्रमाणे ती सॉरी म्हणतानाही सरळ बोलणार नव्हतीच.
          "सॉरी... मी वेळेतच निघाले होते. पण, ट्रेन आणि पाऊस... काय करणार मी! तुझ्या आधीच पोहोचले असते. पण, बरं झालं... आता कसं वाटतंय मला उशीर झाला म्हणून!" श्रीकांतला तिच्या असं बोलण्याची खोड चांगलीच सवयीची होती. आज तो यावर चिडणार नव्हता. त्याने शांतपणे तिच्याकडे पाहिले. " उशीर झालाच तुला! खरंय! जरा आधी आली असतीस आयुष्यात तर आणखी आनंद मिळाला असता. आता फक्त एक काम कर. उशीर झालाय हे ठिक पण आता कधीच जाऊ नकोस." त्याच्या उत्तराने ती चकित झाली. राग तर ओसरला होताच पण, त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांनी उरलीसुरली कटुताही वाहून गेली. त्याने दिलेला रेनकोट तिने चढवला आणि बाईकवर बसून त्याला घट्ट मिठी मारून ती दोघं फुर्रर्र निघून गेली.


-      ­ © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे

रविवार, १५ मे, २०१६

गुलमोहोर

           "बाबा, या शेंगा बघा ना गुलमोहोराच्या! कशा पसरट आणि लांब आहेत. तुम्ही त्या गोष्टी सांगता त्यातल्या तलवारीसारख्या... की  दांडपट्टयासारख्या!"
          रविवारच्या निवांत दुपारी मी गॅलरीमध्ये असाच शून्यात नजर लावून उभा होतो. तोच आमच्या ५ वर्षांच्या तेजूने माझ्या पँटला पकडून मला हलविले. "बाबा, दोन शेंगा द्या ना खेळायला. हात लांब केलात की आल्याच हातात." आत्ता आत्तापर्यंत अम्, मम्, ब्बा, असे काहीसे आवाज काढणारी, माझा हात पकडून चालायला शिकणारी माझी बाहुली किती सहज आता केवढं काही सांगू शकते! मी आनंदाश्चर्याने तिच्याकडे पाहतंच राहिलो. तोच तिने पुन्हा मला हाक मारली. तिच्या हातात गुलमोहोराच्या शेंगा देऊन तिचा पापा घेतला. बाईसाहेब लगबगीने, खेळण्याच्या नादात आत पळून गेल्या. अगदीच तान्ही असल्यापासून तेजूचं हे लाडकं झाड असावं. तिच्या टप्पोऱ्या डोळ्यांनी ती गुलमोहोराची लाल भडक फुलं पाहून उत्साहाने हुंकार भरत असे.
          परवाच माझे आई बाबा इथे आले होते. आई सांगत होती, "तेजू अगदी तुझ्यावर गेली आहे हं! गुलमोहोराच्या फुलांचा सडा आपल्या दारात पडतो ना; तो पाहून 'लाल गालिचा', 'रेड कार्पेट', असं म्हणून चिमणी थुई थुई नाचली त्यावर. तुपण असाच नाचायचास गुलमोहोरांच्या फुलांवर." 
          खरंच! गुलमोहोराचा तो रंग, फुलं, ते झाड, सगळंच माझ्या मनाच्या अगदी जवळचं. लहानपणी मीदेखील तलवार तलवार खेळत असे त्या शेंगांसोबत. आमच्या जुन्या घरासमोरही असंच एक मोठं गुलमोहोराचं झाड आहे. तिथे मी तासंतास रेडिओवरील गाणी ऐकत, अभ्यास करत तर कधी नुसताच त्या सावलीत चटई अंथरून लोळत असे. गुलमोहोराच्या फुलांचा तो नाजूक, मऊ स्पर्श मला आजही आवडतो. त्या आवडीचे संदर्भ मात्र वयानुसार बदलत गेले. लहानपणी खेळाचे सोबती असलेली ही फुले नंतर तिची आठवण करून देणारी झाली.
          ती म्हणजे रमा; माझी बालमैत्रीण. पण महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षांमध्ये तिच्याबद्दल काहीतरी वेगळीच ओढ मला जाणवू लागली होती. एक दिवस आमच्या घरी रमा काही कामासाठी येऊन गेली. ती गेली पण इथे माझं मन बेचैन होतं. तिचा तो लाल रंगाचा पंजाबी सूट... अगदी तसाच लाल रंग या फुलांचा आहे. अंगणात चटईवर लोळत गुलमोहोराचं फुल हातात नाचवत मी पुन्हा पुन्हा रमाची आठवण काढत होतो. किंबहुना ती आपसूक येतंच होती... सतत... तिचं मनमोकळं हास्य, तिचा निर्मळ पण स्पष्ट स्वभाव, तिचा आजचा ड्रेस, तिचे तसेच लाल ओठ, गाल... बेचैनी वाढत होती. खिशातून पेन काढलं आणि त्याच गुलमोहोराच्या एका पाकळीवर मी आमची नाव एका बदामात लिहिली. घरी गेलो एक पुस्तक घेतलं आणि त्यात ती पाकळी ठेऊन दिली. नंतर कितीतरी दिवस गेले. ती पाकळी तिला देण्याचंच काय; मी तर त्या पाकळीबद्दल अगदी विसरलो होतो. महाविद्यालयात ते पुस्तक माझ्यासोबत असायचं पण मी इतक्यात ते उघडलंही नव्हतं. रमेने ते माझ्याकडून वाचायला घेतलं आणि माझ्यासमोरच उघडलं. नेमकी त्याचं पानात दडवून ठेवलेली ती पाकळी तिला दिसली. तिने ती हातात घेतली. किंचितशी लाजली. "किती दिवस अजून अशीच ही पाकळी पुस्तकात सुकवणार होतास? बरंय, जिच्यासाठी आहे तिच्याकडे स्वतःच आली ती. मलाही बरेच दिवस तुला हे सांगायचं होतं. पण, असं काही सुचलं नसतं रे मला. खूप सुंदर आहे हे. मी जपून ठेवेन." माझ्या मनातला आनंद ओळखून तो गुलमोहोरही भेभान होऊन वाऱ्यावर सळसळत होता. मग आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या. गुलमोहोर मोहोरत गेला.
महाविद्यालायचं शेवटचं वर्ष सरलं. सुट्टयांमध्ये आम्ही आमच्या नेहमीच्या बागेत भेटत असू. तेही गुलमोहोराच्या झाडाखालीच. त्यानेच अंथरलेल्या गालिच्यावर हातात हात घालून आम्ही गप्पा मारत असू. आता पुढचं शिक्षण किंवा नोकरी यामुळे आम्हाला रोज भेटता येणार नाही म्हणून मी काहीसा विचारात होतो. दुराव्याच्या विचाराने तिचा आत्ताचा सहवास, स्पर्श, अधिक हवाहवासा वाटत होता. त्याच विचारात मी तिचा हात घट्ट पकडला आणि जवळ ओढला. साहजिकच ती जराशी जवळ आली. तिचा नेहमीचाच स्पर्श आज मात्र मला भलतीच मोहिनी घालत होता. मी तिला आणि जवळ घेतले आणि तिचे चुंबन घेण्यासाठी पुढे झालो. तोच तिने माझ्या हाताला जोरदार हिसडा दिला. मला काही समजलेच नाही! मी पुन्हा पुढे आलो. पुन्हा एकदा धक्का मारून माझ्याकडे अत्यंत रागीट कटाक्ष तिने टाकला. काय होतंय या भानावर मी अजून पुरता आलोच नव्हतो. पण गुलमोहोराचा रंग आता तिच्या डोळ्यात उतरला होता. चेहराही तसाच लालेलाल! "हात पकडणं वगैरे ठिक. पण लग्न नाही झालं अजून आपलं. असल्या गोष्टी मला चालणार नाहीत, सांगून ठेवते." ती उठली आणि निघून गेली. मी पार शरमिंदा झालो. अचानक गुलमोहोर भकास वाटू लागला.
          तिच्या एका वाक्याने मी आजवर सर्व स्त्रियांशी अधिक आदबीने वागतो. कदाचित पौगंडावस्थेतील मुलामुलींवर, त्यांच्या मानसिक, शारीरिक बदल आणि वागणुकीवर अभ्यास करून आता देशोविदेशी कार्यशाळा, चर्चासत्र, घेणारा मी... डॉ शैलेश मुजुमदार त्या एका झटक्यामुळे कुठेतरी घडला, असं म्हणायला हरकत नाही. एक झटका... माझा गुलमोहोर मला भानावर आणून तिथून निघून गेला.
          "मेरी झाँसी में नही दूँगी।" तेजूच्या आवाजाने मी आठवणींमधून बाहेर आलो. आमचं कन्यारत्न तिच्या आईची लाल ओढणी साडीसारखी गुंडाळून, हातात तलवार म्हणून शेंग घेऊन उभी होती. इवल्याशा वयातही झांशीच्या भूमिकेत रमलेल्या तिच्या चेहऱ्यावर करारी आणि ठाम भव होते! अगदी तसेच.... रमेच्या चेहऱ्यासारखे! उन्हात बराच वेळ उभी असल्याने तिचे गोबरे गाल लाल दिसत होते... रमेसारखेच!!! नाही... गुलमोहोराच्या पाकळ्यांसारखे!
          इतक्यात बायको माझ्यासाठी चहा घेऊन आली. मी बशीत चहा ओतला आणि तिला दिला. लग्नाआधी आम्ही असेच चहा पित असू. तिलाही ते आठवले आणि तिलाही तेच आठवले. ती किंचित लाजून हसली.  तोच रंग पुन्हा खुलला होता. मी माझ्या गुलमोहोरांच्या दोन फुलांकडे पाहत होतो. रमा आणि तेजू... आणि आमच्या पाठीशी माझा सवंगडी... तो टवटवीत गुलमोहोर!


-      © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे. 

सोमवार, २५ एप्रिल, २०१६

    नंदादिप

           "आलीस, रूपा! ये ये बाळ, बस." बऱ्याच वर्षांनी तो आवाज कानी आला. आता आवाजात थकवा होता पण तेच प्रेम, तोच आपलेपणा जाणवला! लग्नानंतर पहिल्यांदाच मी अनुजाच्या घरी गेले. पण काकूंनी पूर्वीसारखेच हसत स्वागत केले त्यामुळे मधली ८ वर्ष जणू गायबंच झाली असं वाटलं. 
          अनू माझी वर्ग मैत्रीण. अगदी बालवर्गापासून कॉलेजपर्यंत आम्ही दोघी एकत्रच होतो. दर काही दिवसांनी एकमेकींकडे येणं जाणं होत असे. पुढे लग्न होऊन मी यूएसला गेले आणि आमचा संपर्क कमी झाला.  आता यूएसला आमच्या जवळच अनुजा तिच्या नवऱ्यासोबत राहायला आल्यावर आमची भेट अधूनमधून होत असे. काकूंचे निर्मळ, तजेलदार डोळे सतत डोळ्यांसमोर येऊ लागले. जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या तशा त्या एकेक करून उड्या मारून वर येऊन काकूंच्या भेटीची ओढ तीव्र लागल्या. तिच्या आईच्या हातच्या एकेक पदार्थांची आणि त्यांच्याकडील नंदादिप यांचीही आठवणही आली. परदेशात अशा आठवणी जास्तच डाचतात. अनू तिच्या आई वडिलांबद्दल फारशी काही बोलत नाही, हे आत्तापर्यंत माझ्या लक्षात आलं होतं. कदाचित त्यांच्याशी तिचं तेवढंसं बोलणंही होत नसावं!... माझा आपला एक अंदाज. एकदा तिला ओझरतं याबद्दल विचारूनही पाहिलं पण तिच्या उत्तरावरून आम्ही आता त्या पूर्वीसारख्या एकमेकींना सगळं सांगणाऱ्या मुली राहिलो नाहीत आणि वयासोबत बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, हे लक्षात आलं. एव्हाना मला अनूचा भाऊ वेगळा राहतो आणि आता आई बाबा दोघंच घरी असतात असं समजलं होतं. यूएसला नवीननवीन होते तेव्हा इतरांशी ओळख होई तो एकटेपणा काय असतो याची कल्पना मला आली होती. त्यामुळे तिथे आपल्या दोन्ही मुलांची आठवण काढत अनूचे आईवडील आपल्याच देशातही आठवणींच्यासोबत परकेपणाने आपल्याच माणसात वावरत असतील, हे मी जोखले होते. त्यांना भेटायची इच्छा अधिक तीव्र झाली. परवाच भारतात आले आणि काल काकूंना फोन करून भेटायला येते असं कळवलं.
          काकू कशा असतील? पूर्वीप्रमाणेच आम्ही एकमेकींशी बोलू का? काय बोलावं? एवढ्या वर्षांनी आज मी कशी आले भेटायला, असं विचारलं तर उत्तर काय देऊ? मनात असंख्य विचार आणि हातात एक लहानशी भेट घेऊन मी त्यांच्या दारात उभी होते. पण, काकूंच्या पूर्वीसारख्या स्वागताने मनातलं मळभ दूर झालं. घरात पाऊल ठेवताच मटरच्या करंज्यांचा खमंग वास नाकात शिरला. "तुला आवडतात नं करंज्या! कालंच यांना सांगून बाजारातून मटार आणले." काकू मायेने डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. मला त्यांच्या एवढ्या प्रेमाने उगीचंच भरून आल्यासारखं झालं. सोबतच आपण एवढी वर्ष काकूंना भेटलो नाही, याबाबत अपराधी वाटू लागलं. 
          बराच वेळ गप्पा झाल्या. काका, काकूंनी बोलून दाखवलं नाही तरीही अनू आणि तिचा भाऊ इथे फारसे फिरकत नाहीत किंवा काही हवं नको पाहत नसावेत हा माझा समज अधिकाधिक घट्ट होऊ लागला. तडे गेलेल्या, पोपडे निघालेल्या भिंतींप्रमाणे नाती विद्रुप झाल्याचा मला भास होऊ लागला. कारण काय असेल हे मला माहित नाही आणि मला त्याच्याशी काही कर्तव्यही नाही. पण आपल्याच आई वडिलांशी कोणी एवढं फटकून कसं वागत असेल हे मला समजत नव्हतं. 
          अनू आता माझ्याजवळच राहते हे त्यांना माहित नव्हतं. किंबहुना ते युएसला आधी राहायचे तिथून दुसरीकडे शिफ्ट झाले हेच त्यांना माहित नव्हतं. काकूंनी नेहमीप्रमाणे सारवासारवी केली. पण, "मुलगी लग्न करून भारताबाहेर गेली, फोन वगैरे नसतोच तिचा आणि मुलगा इथे जवळच राहत असूनही बऱ्याच महिन्यांनी त्याच्या आईने अनेक निरोप पाठवले की अर्ध्या एका तासासाठी पाहुण्यासारखा येऊन जातो... एकूण काय पाखरं घराट्यातून उडून गेली की ती परत येतील ही आशा ठेवणंच चूक." काकांच्या एका वाक्याने माझा अंदाज खरा ठरला होता. काकूंनी शिताफीनं डोळ्यातलं पाणी लपवलं. 
          थोडा वेळ कोणीच कोणाशी बोललं नाही. मग काकू उठल्या, देवापाशी दिवा तेवत होता. काकूंनी वात सारखी केली आणि जरासे तेल घातले. काकूंकडे देवासमोर नेहमीच एक दिवा तेवत असतो. दर काही दिवसांनी एक दिवा नेमाने घासला जाई तेव्हा दुसरा घासलेला दिवा देवापाशी ऐटीत विराजमान होत असे. नेमाने स्वच्छ, लखलखीत केला जाणारा आणि बारा महिने, चोवीस तास अखंड तेवणारा तेजस्वी दिवा! आज मात्र तो काळवंडलेला दिसत होता. बरेच दिवस घासला गेला नसावा. मी आणि अनू लग्नाच्या वयाच्या झालो तेव्हा एकदा काकूंनी आम्हाला जवळ बसवलं. दिवा लख्ख चमकवताना त्या म्हणाल्या, "हा दिवा सासूबाईही असाच अखंड तेवत ठेवत. मी घरात आले तेव्हा मला त्या म्हणाल्या की ही आपली परंपरा आहे. यातून दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. या घरात आपण दिव्यासारख्या सतत प्रकाश देत राहायचं आणि ज्याने आपल्याला एवढं भरभरून सुख दिलं आहे, त्याच्या पायाशी अंधार होऊ द्यायचा नाही. तुम्ही पोरीही लग्न कराल तेव्हा हे लक्षात ठेवा की तुम्हाला दोन्ही घरं अशीच प्रकाशमान करायची आहेत आणि याबद्दल देवाचे नेहमी  ऋणी राहायचं." हातातील दिवा आमच्या डोळ्यांसमोर धरून पुढे त्या म्हणाल्या, "बरं, हा दिवाही अस्सा हवा. स्वच्छ आणि चमकदार. दिव्याला काजळी धरता कामा नये. आपलं घरही असंच हवं. कोणाच्या मनात एकमेकांबद्दल काही मळ नको." हे सांगताना त्या ज्योतीचे तेज असलेले काकूंचे चमकणारे डोळे आणि दिव्यासारखे स्वच्छ, लखलखीत असे काकूंचे अंतरंग मला आजही स्पष्ट आठवले. एकटेपणाचं दुःख पचवूनही कोणतीही तक्रार न करता त्या देवाकडे त्यांच्या दोन्ही मुलांसाठी सुख, भरभराट मागत होत्या, हे सांगायला तिथे कोणा अन्य व्यक्तीची गरज नव्हती. 
          त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि होणारी घुसमट यामुळे मी गलबलून गेले. त्यांना भेटवस्तू दिल्या आणि निरोप घेतला. "पुन्हा ये गं वेळ असेल तेव्हा. किती बरं वाटलं आज आलीस ते. सुखी राहा. जे मनात आहे ते मिळो" मी पाया पडत असताना काकू म्हणाल्या. निघताना पुन्हा एकदा त्या दिव्याकडे नजर गेली. पूर्वीपेक्षा तो जरासा मिणमिणता झाल्यासारखा जाणवला. एवढी काजळी साचल्यावर असंच होणार म्हणा!

- © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.

मंगळवार, १ मार्च, २०१६

चिऊ काऊची गोष्ट

          ते दिवस अजबच होते! मन्तरलेले! काऊ आणि चिऊ नुकतेच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दिवसभर फोन, व्हॉट्सअॅपवर गप्पा आणि तरीही रोज संध्याकाळी भेटण्यासाठी नवनवे बहाणे.... बाईकवर बसून चिऊ आणि काऊ दूर दूर फिरायला जायचे. मागे बसलेल्या चिऊचा चिवचिवाट काऊ बाईक चालावता चालवता ऐकत असे. जात्याच् सुन्दर असलेली चिऊ गप्पा मारू लागली की आणिक मोहक दिसायची. काऊला चिऊकडे एकटक पाहण्याची खोड... फिरत असताना तिचा चेहरा तो सतत बाईकच्या आरशातून पाहत असे. चिऊच्या ते लक्षात आलं की ती लाजत असे. लटकासा राग आणि भरपूर काळजी डोळ्यात आणून ती त्याला ओरडत असे. काही दिवसांनी चिऊ काऊचे लग्न झाले आणि दिवस पलटू लागले. अनेक गोष्टी बदलू लागल्या.

           आता एकमेकांशी फोनवरुन सतत बोलणे होत नव्हते, कुठे बाहेर फिरायला जाणे राहिले नव्हते. आपलं घरटं अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करत काऊ त्याच्या कामात व्यस्त... चिऊदेखील मन लावून तिच्या नव्या जबाबदारी पार पाडण्यात मग्न. पण तरी पूर्वीच्या दिवसांसारखी मजा आता राहिली नाही हा साल तिच्या मनाला पोखरत होता. आता ते चिऊ काऊ नव्हतेच जणू! या गोड नावांऐवजी आता त्यांच्या खऱ्या नावाने ते एकमेकांना संबोधू लागले. रोजच संध्याकाळी फिरायला जाणारी ही जोडी आता फक्त केवळ काही लग्न समारंभासाठी बाहेर पडू लागली. काऊचा वाढदिवस, काऊची पदोन्नती, पगारवाढ, त्या दोघांच्या पहिल्या भेटीचा, मागणी घातल्याचा दिवस,... असे कितीतरी दिवस चिऊने कुठेतरी बाहेर जाऊन साजरे करण्याबद्दल काऊला सुचवलेही पण कामाच्या गडबडीत त्याला वेळ मिळत नव्हता. हॉटेलमधून काहीतरी घरी मागवण्यापलीकडे आता काही फारसा उत्साह त्यांच्यात राहिला नव्हता. काऊचे आपल्यावर पूर्वीसरखे प्रेम उरले नाही या विचाराने चिऊ पछाडली होती. काऊला मात्र याची कल्पनाही नाही. आता चिऊनेही स्वतःला घर आणि पुढील शिक्षणामध्ये गुंतवून घेतले होते. तरीही तिच्या मनात काऊचे आपल्यावर आता प्रेम नाही ही भीती होतीच. असेच काही दिवस गेले. चिऊच्या परीक्षेचा निकाल लागला. ती उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. काऊला फोन करायला गेली तर नेहमीप्रमाणे फोन कट! तिचा आंनद लगेच ओसरला. तिने मेसेज पाठवून निकाल कळवला. बराच वेळ काऊने तो वाचलाही नसल्याचे तिला दिसत होते. चिऊ हिरमुसली, तिला भरुन आलं. जुन्या आठवणी डोळ्यांसमोरुन झरझर जाऊ लागल्या. रडता रडता केव्हातरी चिऊला डोळा लागला.

          संध्याकाळी तिला जाग आली तीच काऊच्या आवाजामुळे..."चिऊ, ऊठ. मी बघ चित्रपटाची तिकीट आणली आहेत. गेल्या आठवड्यात सांगत होतीस न् पहायचा आहे तुला तो चित्रपट. चल, आवर आता लवकर." चिऊला हे स्वप्नच वाटत होतं. शेवटी काऊने तिला हलवलं तेव्हा तिच्या लक्षात आलं. ती काही न बोलता उठली. दोघे बाहेर गेले. चित्रपट पाहिला. आज काऊ जास्तच आनंदात दिसत होता. चिऊला मात्र या बदलाचं कारण समजंत नव्हतं. चित्रपटानंतर पूर्वीप्रमाणे आवडत्या ठिकाणी त्यांनी मनसोक्त पाणीपुरी आणि मग आईसक्रीम खाल्ले. चिऊला अजूनही काहीच आकलन होत नव्हते. बाईकवरुन घरी जाताना काऊने चिऊचे हात पुढे ओढुन त्याच्या कमरेभोवती कडे तयार केले. "चिऊ, बोल ना ग काहीतरी... गप्प का? मी आज खूप आनंदात आहे. कसं काय घर आणि सगळं सांभाळून अभ्यास केलास गं!" कितीतरी वेळ तो चिऊचं भरभरुन कौतुक करत होता आणि पूर्वीसारखंच सतत आरश्यामधून चिऊकडे पाहत होता. कितीतरी दिवसांनी तिला पूर्वीचा काऊ प्रत्यक्षात दिसत होता. काऊ बोलतंच होता. त्याचे आनंदाचे क्षण साजरे करायला त्याच्याकडे वेळही नव्हता आणि आज आपल्यासाठी तो आपल्यापेक्षा जास्तच आनंदात आहे. एवढे दिवस तो आपल्यावर प्रेम नाही म्हणून कामात व्यस्त नव्हता तर आपल्या सुखासाठीच धडपडत होता, हे चिऊच्या लक्षात येत होते. आज मात्र चिऊ काही बोलत नव्हती. तीदेखिल आरश्यामधून एक टक काऊकडे बघत होती. बोलत असताना काऊ जास्तच सुन्दर दिसतो असं तिला आजंच समजलं होतं!
   © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे