मंगळवार, ३ मे, २०२२

हे ही दिवस जातील...

          उन्हाळा मला लहानपणापासून आवडत नाही. आवडत नाही म्हणजे झेपतच नाही. तान्ह्या बाळाला छानसं मऊसूत कापडात गुंडाळतात. मग, ती कशी छान झोपतात. अम्मा सांगते, मला कधी असं बांधून झोपवता आलंच नाही. पातळ सुती कापडाशिवाय अंगावर कसलेही कपडे चालायचे नाहीत. अजूनही जाड, सिंथेटिक कापडांपासून दूर असते मी. जरा गुंडाळल की लालेलाल होत असे म्हणे मी. डॉक्टरांनी तेव्हाच सांगीतल, अजिबात गुंडाळायच नाही. पातळ कपडेच घालायचे. नाहीतर पुरळ येत राहणार. बाळ चिडचीड, रडरड करणार.

          ही माझी उन्हाळ्याशी झालेली पहिली आणि अप्रिय ओळख. त्यात जन्मच उन्हाळ्यातला. साहजिकच इतर मुलांप्रमाणे माझ्या वाढदिवसाबाबत मी मात्र जराही उत्सुक नसे. एकतर एप्रिलचं भयंकर ऊन, त्यात शाळांना सुट्टी असल्याने मित्र मैत्रिणी गावाला... मग, कितीसा उत्साह वाटणार?

          आंबा डाळ, आंबा या दोनच गोष्टींमुळे मी उन्हाळा सहन करू शकते. हे १२ महिने उपलब्ध झालं तर कसलं भारी होईल! मला वाटतं, असं जन्मापासूनच न आवडत्या गोष्टींसोबत अपरिहार्य तडजोड आपसूक शिकत असतो आपण.

          काही दिवसांपूर्वीही कामासाठी भर दुपारी बाईकवरून प्रवास करत असताना, मी अशीच उन्हावर रागवून, वैतागून बसले होते. जराही ऊन लागलं की कितीही सनस्क्रीन लावा की चेहरा रुमालाने झाका की अजून काही उपाय करा. मी लगेच लालबुंद होते आणि मग त्वचेला दाह सतत जाणवत राहतो. त्यादिवशी उन्हावर रुसल्यानेही थोडी जास्त लाल झाले असावे. ऊन अजिबात सहन होत नव्हतं आणि अजून अर्धा / पाऊण तास असेच चटके सहन करायचे होते.

          या सगळ्या वैतागवाण्या विचारांत नजर मात्र रस्ताच्या आजूबाजूला नेहमीप्रमाणे भिरभिरत होती. आणि अचानक लाडका अमलताश अवचित डोळ्यांसमोर आला. “अरे वाह! बहावा फुलाला. पाऊस वेळेवर असावा यंदा.” तेवढाच दिलासा मिळाला. पुढे कुठे घरटी करणारे तर कुठे घरट बांधून होत आलेले कावळे दिसले. लवकरच पाऊस येणार याच्या खुणा पटत गेल्या. पण, आत्ता बसणाऱ्या चटक्यांच काय! जरा उभारी मिळत असलेलं मन पुन्हा खट्टू झालं. तेवढ्यात वेगवेगळ्या छटांची बोगन वेल दिसू लागली. मग, सोनमोहर, गुलमोहर, त्यात गुलमोहोराचे विविध रंग, कुठे पांगारा, मंद सुगंधाचा चाफा, नाजूक बकुळ, सध्या अचानक दिसू लागलेलं मोहक गुलाबी फुलांनी डवरलेली गुलाबी ट्रम्पेट, कुठे गुच्छांमध्ये आलेली हळद, कुंकू रंग ल्यालेली फुलं तर कुठे लव्हेंडर तुरे मन मोहून घेत होते. याच काळात फुलणारी शेवग्याची नाजूक पांढरी फुलंही किती सुंदर दिसतात! निसर्गानेच दिलेले उन्हाळ्याचे चटके सुसह्य करण्यासाठी निसर्गच किती प्रयत्न करतो! मी मात्र तोंड फुगवून एवढ्या सुंदर दृश्य मेजवानीकडे तोंड फिरवून होते! ते कोकिळेच गान (खरंतर बरेचदा किंचाळत असतो तो आणि समाजाने जास्तच डोक्यावर घेतलं आहे त्याला असं वाटतं मला!), हे सुंदर बहर, आंबा, फणस, काजुच आगमन, कावळ्याची घरटी, सरड्याचं लाल होणं, अगदी बाहेर कशाला जायला हवं? घरात सुरु होणारी मुंग्यांची लगबग, पूर्वी होत असणारी आयाबायांची वाळवण, पापड, फेण्या, चिकवड्या, लोणच्याची तयारी, हे सगळं कसला संदेश देत असतं बरं?

          हे रखरखीत दिवस सरणार आहेत. जीवाची तगमग लवकरच पावसाचे दिवस शांत करतील. पुढचा काळ सुसह्य असणार आहे. त्यामुळे, आत्ता बसणाऱ्या चटक्यांमुळे हताश होण्यात अर्थ नाही. अगदी हाच मंत्र आयुष्यालाही लागू होतो नाही का! बाबा नेहमी म्हणतात, “हे ही दिवस जातील.” प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर कधी सहन होणारा तर कधी वैशाख वणवा म्हणावा असा उन्हाळा येत असतो. पण, पुढे सुखाची बरसात होणार असेल आणि आपण मात्र आधीच शस्त्र टाकली तर कसं चालेल??? तेव्हा आपण सर्व लढवय्या जीवांनी या कठीण काळानंतर जो रम्य काळ येईल, त्याचा विचार मनात ठेवून चिकाटीनं दटून राहायला हवं! तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्यात पुढील काळात सकारात्मक घटना घडाव्या, चटके देणारा काळ लवकर सरून सुखासमाधानाच्या बरसातीत जीव शांत करणारे दिवस यावे, ही प्रभू चरणी प्रार्थना!

-    © वैदेही शेवडे वैद्य.

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

चार साहिबजादे

 

चार साहिबजादे

          १७०५ सालातील पंजाबातील डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. आनंदपूर साहिब येथे जवळपास सहा महिने युद्ध मुघलांचे आक्रमण, धर्मांतर, महिलांवर त्यांच्याद्वारे करण्यात येणारे अत्याचार, याला चोख उत्तर आता दशमेश गुरु गोबिंदसिंहजी देत होते. प्रत्येक ठिकाणी होणारा पराभव बघून औरंग्या अधिकाधिक चवताळत होता. जहांगीराने पंचमेश गुरु अर्जनसिंह यांची तर औरंग्याने दशमेश गुरूंचे पिता अर्थात गुरु तेगबहाद्दूरसिंह यांची हत्या केली. तरीही शीख तलवारींची धार जराही कमी झाली नव्हती. शस्त्राला शस्त्राने उत्तर आणि मुखी सदैव भगवंताचे नाव असा भक्ती आणि शक्तीचा सुंदर मिलाप म्हणजे शीख विचारधारा.

          बरेच महिने युद्ध चालू असल्याने आता दोन्हीकडे रसद यथातथाच उरली होती. मुघल्यांच्या तुलनेत शीख संख्येने कमी होते, पण त्यांची लढण्याची जिद्द मात्र अपार होती. यावर काहीतरी मार्ग लवकरात लवकर काढणं गरजेचं होतं. शेवटी, गुरुगोबिंदसिंहजींकडे सामंजस्याचा करार घेऊन मुघल आले. त्याप्रमाणे तह झाला. आनंदपूर साहिब शिखांना सोडून जावे लागणार होते. युद्ध किती काळ करणार? सैनिकांसोबत जखमी, आजारी, वृद्ध, बालके, स्त्रिया, अशा अनेकांची जबाबदारीही गुरुजींवर होती. ठरल्याप्रमाणे आपला लवाजमा घेऊन जड अंतःकरणाने आनंदपूर साहिब सोडण्यात आले.

          तहात ठरल्याप्रमाणे कुराणाची शपथ घेऊन शिखांना सुखरूप आणि सुरक्षितपणे बाहेर जाऊ देणे आणि त्यांच्यावर हल्ला न करण्याचे वचन दिले होते. पण, फसवणूक, कपट हीच मूळ वृत्ती असलेल्यांनी आधीच काही वेगळा बेत आखला होता. थोडं अंतर कापताच मुघलांनी मागून हल्ला केला. सिरसा नदीच्या तीरावर पुन्हा तुंबळ युद्ध झालं. लढत लढता ज्याला जशी वाट मिळाली तसे सिरसेच्या पाण्यातून आपल्या सोबतच्या समूहासोबत ते पुढे झाले. इथेच गुरुजींच्या कुटुंबाची ताटातूट झाली.

          गुरु गोबिन्दसिंहजींचे चार सुपुत्र ‘चार साहिबजादे’ नावाने ओळखले जात. त्यातील ज्येष्ठ दोघे अनुक्रमे अजितसिंह आणि झुजारसिंह, गुरुजींचे अत्यंत जवळचे असे पंज प्यारे आणि काही योद्धा चमकौर गढीस पोहोचले. पण, जोरावरसिंह आणि फतेहसिंह हे कनिष्ठ बंधू त्यांची आजी माता गुजरीसोबत राहिले. त्यांच्यासह आनंद्पुरात सेवेस असलेला एक सेवक गंगुही होता. मजल दरमजल करत गंगू या तिघांना आपल्या गावी घेऊन आला.

          इकडे मुघल अजूनही लढण्याच्या तयारीत सर्वांचा शोध घेत होते. लवकरच दशमेश गुरु चमकौर येथे अगदीच जेमतेम सैन्यासह असल्याची पक्की खबर त्यांना मिळाली. समोरचं सैन्यबळ अगदीच कमी आणि त्यातही युद्ध, प्रवास आणि उपासमारीने थकलेलं असूनही शिखांची लढवय्या वृत्ती माहित असल्याने मुघल, भरपूर सैन्य घेऊन आले. चमकौर गढीला त्यांनी वेढा घातला. पण, “सव्वा लाख से एक लडाऊ” या ब्रीदाचं अमृत प्राशन करून गढीवरील सर्व ४० जण समोर लाखांत असलेल्या शत्रूशी लढायला उभे ठाकले.

          लहान लहान तुकड्यांनी जाऊन लढायचं ठरलं. खरंतर लढायचं म्हणजे काय? परिणाम तर स्पष्ट दिसत होताच. एकदा समशेर हाती घेऊन घोड्याला टाच मारून गढीबाहेर आल्यावर वीरमरण एवढाच एक मार्ग होता. तरीही शस्त्र खाली न ठेवता शत्रूला शेवटच्या श्वासापर्यंत भिडायचं. मरायचं ते रणात शत्रूला मारूनच, हे मनाशी पक्क होतं.

          मनुष्यबळ कमी असल्याने अजीतसिंहाने केवळ गढीवरून नेतृत्व न करता, रणांगणात उतरायचं ठरवलं. पंज प्यारे त्यांना समजावू लागले. पुढचे गुरु तुम्हीच असणार आहात. तेव्हा हे असं धाडस करू नये म्हणून विनवू लागले. अजितसिंहाने आपल्या पित्याकडे पाहिले. गुरुजींनी शांतपणे अनुमोदन दिले. टप टप टापा वाजत घोडे निघाले. सपासप तलवार चालत होती. शत्रूचा विळखा तीक्ष्ण तीरासारखा भेदत, वाटेल येईल त्यास यमसदनास धाडत शूर पुत्र बाजी मारत होता. बराच वेळ लढून शेवटी नको तेच घडले. पण, आपला ज्येष्ठ बंधू धारातीर्थी पडल्या पडल्या झुजारसिंह वीज चमकल्यागत उठले. आता मी जाणार, असं त्यांनी घोषित केलं. पंज प्यारे पुन्हा थांबवू लागले. धाकटे दोन्ही साहिबजादे कुठे असतील? कसे असतील? वाचले असतील कि नाही! कसलीच कल्पना नाही. पुढचं नेतृत्व म्हणून तुम्ही एकमेव आधार आणि आस आहात. असं करू नका. पंज प्याऱ्यांचे डोळे पाणावले. गुरु गोबिंदसिंहजी मात्र अजूनही शांत होते. झुजारसिंह अनुमती घेण्यासाठी त्यांच्यापाशी गेले. यावेळेसही गुरुजींनी प्रेमळपणे आपल्या पुत्राकडे पाहिले आणि त्याच्या हाती तलवार दिली. घोड्यावरून जाणारी ही पाठमोरी मूर्ती आता पुन्हा आपल्याला दिसणार नाही, याची पूर्ण कल्पना त्यांना आली होती.

          अनुक्रमे अवघं १८ आणि १४ वर्षाचं वय! पण, आपल्या वयापेक्षा अधिक शत्रूंचा नायनाट या दोहोंनी केला. तारुण्यात जेमतेम पदार्पण करणाऱ्या आपल्या पुत्रांना वीरगती प्राप्त झाल्याचं बघून गुरुजींचं मन अभिमानाने भरून गेलं. आपले अश्रू त्यांनी कसेबसे रोखले. हळूहळू गढी रिकामी होत आली. गुरुजी स्वतः लढायला उतरणार तेवढ्यात, पंज प्यारे “क्षमा करा. पण, आम्ही तुम्हाला हे करून देणार नाही, गुरुजी.” असं निकराने म्हणाले. बराच वेळ गुरुजींशी बोलून, त्यांना समजावून कसंबसं त्यांना गढी बाहेर रात्री लपून निसटण्याबाबत राजी करण्यात आले.

          इकडे माता गुजरी आणि धाकटे साहिब जादे गंगुच्या घरी पोहोचले. गावागावांमधून मुघल सैनिक गुरुजी, त्यांचे पुत्र, सैन्यातील अन्य कोणी कुठे आहे, याचा शोध घेत फिरत होतेच. त्यात गंगुची बुद्धी फिरली. त्याने सरहिंदचा नवाब वजीरखानासमोर माता गुजरी आणि साहिबजादे यांचा ठावठिकाणा सांगितला. मुघल सैनिक त्यांना पकडून सरहिंद येथे घेऊन गेले. वृद्ध गुरु माता आणि दोघे शिशु! पण, नराधम वजीऱ्याने किल्ल्यावरील एका उंच उघड्या बुरूजावर त्यांना बांधून ठेवले. गुरु गोबिंदसिंह अजूनही आपल्या हाती लागत नाहीत. हे दिवसरात्र मुघल्यांना डाचत होते. त्यांच्या दोन पुत्रांना ठार केल्याच्या कहाण्या रंगवून सांगताना मात्र विकृत आनंद त्यांना होत होता. आता गुरुजींना त्रास द्यायचा एकमेव मार्ग त्यांच्याकडे होता. तो म्हणजे या तिघांना पीडा देणे. आपल्याहून दुर्बल, वृद्ध, लहान मुलं यांना घाबरवायचा प्रयत्न करून, त्यांचे हाल करून मुघले आपली शूरता(?) दाखवत होते. कडाक्याच्या थंडीत लोखंडी साखळ्यांमध्ये अडकवून, अन्न पाण्याशिवाय, अंगावर पांघरायला काहीही नं देता या तिघांना ठेवले होते.

          साखळदंडात बांधलेली ती जणू नाजूक, नुकतीच उमलणारी गोरी गुलाबी फुलं... पण, नवाबाने “इस्लाम कबूल केलात आणि आमच्यासोबत राहिलात तर तुम्हाला सोडू.” असं सांगताच, “जे अत्याचार आणि धर्मांतर रोखण्यासाठी आमच्या आजोबांनी प्राण पणाला लावले. आमचे पिताश्री सदैव ज्यांच्या विरुद्ध लढले, ज्यांनी आमच्या ज्येष्ठ बंधुसहीत अनेकांची हत्या केली. आमच्या माता, भगिनींना छळले, त्यांना आम्ही सामील होऊ, असा विचार केलातच कसा?” असं ठाम उत्तर जोरावरसिंहाने दिले. “तुमच्या बंधूंप्रमाणे आम्ही तुम्हालाही मारून टाकू, याची भीती नाही वाटत?” एकाने भर दरबारात विचारले. “आम्हीही त्यांच्याप्रमाणेच निर्भीड आहोत. उलट आम्ही इथून सुटलोच तर तुमची खैर नाही. आम्ही पुन्हा सैन्य तयार करून तुम्हाला नेस्तनाबूत करू.” त्याच्याकडे धारदार नजर टाकून धाकटा फतेहसिंह म्हणाला. “घाबरले तर तुम्ही आहात म्हणून आम्ही शस्त्रहीन असूनही आम्हाला असे बांधून ठेवले आहे.” सिंहांच्या दोन्ही बछड्यांनी जोरदार डरकाळी फोडून नवाबाचा खरपूस समाचार घेतला होता. बोटभर पोरांचा या वयातील अभिमान आणि निष्ठा बघून नवाब घाबरला. यांना सोडून देणं आपल्याच जीवावर बेतणार याची त्याला खात्री झाली होती. त्यामुळे या दोघांना जिवंतपणे भिंतीत गाडण्याचा आदेश तातडीने देण्यात आला.

        दोघांच्या बाजूने भिंत बांधण्यास सुरुवात झाली. दोघेही निडरपणे उभे होते. हात जोडून जपजी पाठ त्यांनी सुरु केला. वृद्ध गुरुमाता गुजरी हे दुरून भरल्या डोळ्यांनी बघत होत्या. भिंत बांधून झाली तर आतूनच “वाहे गुरुजी दा खालसा, वाहे गुरूजी दी फतेह” ची ललकारी आली. हळूहळू आवाज क्षीण झाला. आवाज पूर्णपणे थांबल्यावर भिंत फोडून दोघांचे प्राण गेल्याची खात्री करण्यास नवाबाने सांगितलं. अजूनही त्या इवल्या इवल्या कुडीत प्राण होता. पण, नवाबाच्या मनात जरब एवढी बसली होती की त्याने तातडीने दोघांचा गळा चिरण्याचा आदेश दिला. वय वर्ष ९ आणि ७ असलेले दोन कोवळे जीव परमात्म्यात विलीन झाले.

            ती तारीख होती २६ डिसेम्बर १७०५. ३१५ वर्षांपूर्वी घडलेले हे प्रसंग डोळ्यासमोर आले की आजही अंगावर काटा येतो. हे सगळं इथे थांबलं नाही... तर पुढे ५ वर्षांत या दोन्ही वीर बालकांच्या हत्येचा बदला बंदासिंह बहाद्दुराने सरहिंदवर आक्रमण करून घेतला. त्यांच्या सोबत असलेल्या फतेहसिंहाने वजीरखानाचे मुंडके छाटले. बंदासिंहाने दोन्ही बालकाना जिथे पुरलं होता ती जागा शोधून काढली. वर उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणांवर गुरुद्वारे उभारण्यात आली आहेत. ही आपली राष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहेत. तिथे जाऊन नतमस्तक होणं, आपला इतिहास हा पराभवाचा नाही तर असा पराक्रमाचा आहे आणि तो समजून घेणे, सर्वांसमोर आणणे आवश्यक आहे.

          हा इतिहास आपल्याला शिकवला गेला का? येता जाता बॉलीवूडच्या किंवा अशाच काही बिनडोक बातम्या, फुटकळ फोरवर्डस, याच्या गर्दीत आपला महान इतिहास कुठेतरी हरवतो आहे का? बाहेरून येऊन इथे आक्रमण, लूट, छळ करणाऱ्यांची नाव अजूनही शहरांना, रस्त्यांना आहेत. ती बदलण्यास मूर्ख विरोध होतो! आपला देश, संस्कृती कसलाही संबंध नसलेल्यांचे दिवस मात्र इकडे साजरे होतात. मात्र आपल्यासाठी आयुष्य पणाला लावलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून कोणता दिवस आपण पाळतो? काय करतो? असे प्रश्न पडतात. अशावेळी काही वर्ष आधी या चार साहिबजाद्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या हुतात्मा दिनाच्या वेळेस बाल दिन साजरा करावा अशी मागणी करण्यात आली होती, ती अगदीच रास्त वाटते. 

-    © वैदेही शेवडे वैद्य. 


बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८


आठवण
          अलकाच्या नवीन घरी जायचं होतं... नवीन म्हणजे ठिकाण तेच पण, आता जुनी घर पाडून नवीन कॉलोनी उभी केली आहे. तिच्या सुंदर आणि भव्य कमान असलेल्या कॉलोनीच्या दारातून आत जाताना का कुणास ठाऊक थोडंस परकं वाटलं! "वेगळं वाटतं नाही का आता इकडे!" अलकेने माझ्या मनातले की चेहऱ्यावरचे भाव लक्षात आल्याप्रमाणे टिप्पणी केली. थोड्यावेळ कॉलोनीच्याच बागेत बाकड्यावर बसून गप्पा झाल्या. दुतर्फा ड्युप्लेक्स घरांची ती सुंदर अशी कॉलोनी. अलकेचं बालपण इथेच गेलं. तेव्हा मी इथे बरेचदा येत असे. काही वर्षांपूर्वी अशी नव्हती ती जागा... आता बरंच काही बदललं आहे. तिच्याशी बोलताना मी अधूनमधून त्याच जुन्या जागेत आठवणींमधून जात होते. तसं इथे काहीच कमी नव्हतं. सगळ्या उत्तम सोयीसुविधांनी युक्त अशी कॉलोनी. पण, काहीतरी मला आठवत नव्हतं इथलं... काही वर्षांपूर्वीचं... चांगलं की वाईट तेही आठवेना... सगळ्या खाणाखुणा बदलल्या होत्या... नव्हे जुन्या सर्व खुणा पुसल्याच होत्या. पण काहीतरी आधी इथे होतं ते आता दिसत नव्हतं आणि तेच शोधत मन सैरावैरा भटकत होतं.
          अलकेचं घर भारी सुंदर... तिनं आणि विशालनं सजवलंही छान होतं... अगदी मनापासून. भरपूर गप्पा, खाऊ पिऊ, हम आपकें है कोन सिनेमा, मस्त धम्माल झाली. आता घरी जायचे वेध लागले. मैत्रिणीबरोबर दहा दिवसही घालवले तरी कमीच पडतात, नाही!
          आम्ही निघालो तोच कोणीतरी मागून आवाज दिला. "दिसलोच आपण ह्यांना!" अलका वैतागून म्हणाली. आम्ही मागे वळलो. दारातून एक वयस्कर आकृती आमच्याकडे हात हलवताना मला दिसली. "जायचं आहे का तुला त्यांच्याकडे?" अलकेचा हा प्रश्न खरंतर पूर्ण होण्याआधीच माझी पावलं तिथे वळली होती. 
          "अगं, किती वर्षांनी दिसत्ये ही! वैदेही ना? आजच आठवण आली होती तुझी!" त्या दारापाशी जाईपर्यंत मला काही ओळख पटत नव्हती... आता मात्र सगळं अगदी लख्ख आठवायला लागलं. अलकेच्या चेहऱ्यावर मात्र, "काहीही काय बडबडत आहे ही बाई! इतक्या वर्षांनी आजचं कशी आठवण काढली हिने? उगीच आपलं..." असे भाव स्पष्ट दिसत होते. दामले काकू दारातून पुढे आल्या. माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्यांनी चुंबन घेतलं. मग पाठीवरून त्यांचा मऊसूत हात फिरु लागला. कित्ती मायाळू, मखमली, उबदार स्पर्श तो... एवढ्या वर्षांनीही अगदी तसाच! थोड्या जुजबी, इकडच्या तिकडच्या गप्पा आम्ही मारल्या तेवढ्यात आतून काकूंना कोणीतरी आवाज दिला. पूर्वी त्यांची सासू अशी हाक मारत असे तेव्हाही त्या गप्पा आटोपून लगबगीने आत वळत असत. हा आवाज वेगळा होता पण काकूंच्या चेहऱ्यावर तेच भाव. मालकांनं कामात अळमटळम करताना पकडल्यावर नोकराला जसं अपराधी वाटावं... अगदी तसंच! 
          त्यांनी मग लगेच त्यांचे पुढचे प्रश्न गुंडाळून मनाच्या कपाटात बंद केले. "थांब हं जरा." असं म्हणत त्या आत वळल्या. "कोणाशी बोलताय,आई? झाले का तांदूळ निवडून?" तो मगाचा आवाज पुन्हा आला. "ही सून बरं का काकूंची." अलकेने सांगितलं. "उगीच म्हणे आठवण आली वगैरे... एवढ्या वर्षांनी शेजारच्यांच्या मुलीच्या मैत्रिणीची कोणाला आठवण येते होय!" अलकेचं सुरू झालं... तिला काय बोलणार मी! मला माझ्या लहानपणी बघितलेल्या दामले काकू आता समोर दिसू लागल्या आणि अलकेच्या बोलण्याकडे आपसूक दुर्लक्ष झालं. काकू सर्वांशी प्रेमानं बोलत. आजूबाजूच्या मुलांना खाऊ दे, अभ्यासाचं विचार, कोणालाही मदत कर... काहींना त्यांचा हा निर्मळ स्वभावही खुपत असावा... स्वतः तसे नसल्याने असेल कदाचित... पण, काकू प्रेमाने वागतात तर ते खोटं खोटं आहे असं काही जणी म्हणत. कोणी म्हणत, "ही बाई बघावं तेव्हा दारात उभी असते, येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रश्न विचारत... कामं असतात की नाही? मग सासूने आवाज दिला की कशी फजिती होते!" अलकेची आईही या गप्पांमधलीच... त्यामुळे दामले काकूंबाबत मुलीचेही विचार आपसूक गढूळ झाले होते. 
          मी मात्र काकूंना दारात उभं राहून, निवड पाखड करताना, दारात बसून काही विणताना, शिवताना, मसाले किंवा लोणची, कुरडया, वाळवण करताना पाहिलं आहे. आम्हा मुलांना त्यांनी स्वतः केलेला खाऊ त्या देत असत. या बायकांना ही त्यांची कामं कशी दिसत नसावी! 
          तरीही घरातील कोणतीही व्यक्ती त्यांच्याशी मायेने बोलताना कधी दिसली नव्हती. कधी नवा दागदागिना, भरजरी कपडे दिसले नाहीत. पण, काकूंच्या मागेन डोकावणारे घरातल्यांचे सदैव रंगीत चेहरे आणि काकूंना धाकात ठेवायची त्यांची नजर मात्र माझ्या नजरेतून कधी सुटली नाही. आता घरात अशी स्थिती असताना आणि बाहेर कुठे जायची सोय नसताना जीव असंच उंबऱ्यापाशीच घुटमळनार ना! चेहरा आजारी दिसला तरी त्या मात्र कामात आणि इतरांच्या देखभालीत असायच्या... मला एवढ्या कमी वेळात आणि कमी वयात जे दिसलं, समजलं ते अलकेला आजही समजू नये! असं का आणि काय झालं असावं काकूंच्या बाबतीत! असतं एकेकाचं नशीब... आजकाल मला अशा प्रश्नाचं हे एकंच उत्तर मिळतं. 
          "हे घे गं पट्कन! आजच केले आणि तुझ्याचसाठी केले असल्याप्रमाणे आलीस बघ बरोबर आजच!" त्यांनी एक डबा माझ्या हातात दिला. तो देताना आधी एक चोरटी नजर घरात फिरवली. आम्हा पोरांना एकदा खाऊ दिल्यावर काकूंची सासू त्यांना खूप ओरडली होती. खूप आवाज येत होता त्या सासूबाईंचा बराच वेळ... काकूंनी नंतरही आम्हाला खाऊ देणं बंद नाही केलं. पण, अशी अपराध्यासारखी आपल्याच घरात कोणी आपल्याला बघत नाही ना असं करताना याची त्या खात्री करत असत. एकंदर स्वतः सासू झाल्यावरही काकूंची स्थिती मात्र तशीच असल्याचं जाणवलं. "आई, झालं आहे का जेवण?" आतून पुन्हा आवाज आला. "चल बाळा! मी जरा आत जाते. तू येत जा. मोठी हो... विसरू नको हं मला!" पुन्हा तोच मऊ स्पर्श...! 
          "मोठी झालीस की विसरू नकोस हं..." मला लहानपणीही काहीतरी व्याकुळता या वाक्यात जाणवत असे. आजही तसंच काहीसं आतल्याआत गलबलून आलं. 
          अलकेच्या गाडीपर्यंत आम्ही आलो तरी माझं मन कुठेतरी दामले काकूंच्या त्या पायरीपाशी घुटमळत होतं. आम्ही गाडीत बसलो. मी डबा उघडला. मला आवडणारे रवा, खोबऱ्याचे लाडू! काकूंना खरंच माझ्या आवडीची एवढीशी गोष्ट एवढ्या वर्षांनीही लक्षात होती... काय संबंध खरंतर! हे कसले ऋणानुबंध! आपण तर आठवणींच्या गोतावळ्यात कुठेतरी दामले काकूंचा धागा असाच सोडला होता. पण, त्यांनी मात्र जपून ठेवला होता तो अजूनही... लाडूचा घास खाताना आता ती जागा पुन्हा ओळखीची वाटू लागली. काहीतरी हरवलेलं पुन्हा मिळालं होतं.

- © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.

सोमवार, १७ एप्रिल, २०१७

अन्नपूर्णा
            
          गोविंदवाडीमध्ये काहीतरी जादूच होती. लाखमोलाची माणसं ती! सण, उत्सव असो किंवा ओळखीच्याच काय तर कोणाही अनोळख्याला मदत करायची असो, सर्व अगदी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येत असंत. एकमेकांच्या सुखदुःखात असे काही एकाच रंगात रंगत असंत की कोणालाही त्यांचा हेव वाटावा! नाही म्हणायला काही खोचक भोचक मंडळी इथेही होती. पण, त्यांनाही सर्व आपलेपणाने वागवायची. इथे कोणाचंही पोरं, कोणाच्याही घरी खेळायला, जेवायला, अभ्यासाला, अगदी राहायलाही असायची. वाडीतील सुरकुतलेले हात कधी त्यांना गरमागरम खमंग थालीपीठ भरवत असंत तर कधी खरपूस रट्टेही देत होते. बरं यातही भेदभाव नाही! नाईकांच्या पिंट्याचा, सोमणांच्या राजूचा आणि आपल्या कार्ट्याचा अभ्यास घेताना जोशी काकू मनसोक्त कणिक तिंबून समाचार घेत असंत पण तिघांच्याही निकालाच्या दिवशी त्याच गोडधोड करत होत्या.
          वाडीमध्ये स्वामी समर्थांचं एक मंदिर होतं. केवळ वाडी नाही तर ठिकठिकाणाहून भाविक तिथे दर्शनासाठी येत असंत. स्वामींच्या प्रकट दिनाचा सोहोळा तर काय वर्णावा! आधीच उत्साही वाडी त्या दिवशी अधिकच गजबजून जात असे. पालखी काय, रोषणाई काय, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अगदी सप्ताहभर चालत असंत. प्रत्येकजण आपल्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत भक्तिभावानं पार पाडत असतानाच दुसऱ्याच्या कामात मदत करत असे. दर वर्षी प्रत्येक कुटुंबावर वेगवेगळी जबाबदारी असे. पण, स्वामींच्या नैवेद्याची जबादारी मात्र गोखले आजींकडेच होती. दोन तीन वर्ष ही जबाबदारीदेखील अन्य कुटुंबांकडे देऊन बघितली होती म्हणे. पण, दरवेळेस काही न काही असे घडत असे की गोखले आजींचा हात त्या नैवेद्याला लागल्यावरच तो पूर्ण होत असे. मग, उत्सवाचे दिवस सोडल्यास बाकी दिवसांमध्ये दररोज एकेक कुटुंब स्वामींसाठी नैवेद्याचं ताट मोठ्या प्रेमानं आणि सेवा भावानं  मंदिरात नेत असे. पण, आजींच्या हातचा नैवेद्य खाऊन स्वामींच्या चेहऱ्यावर जे तेज आणि आनंद दिसत असे तो इतर वेळेस दिसत नाही, असं सर्व म्हणायचे. स्वामींची अन्नपूर्णाच ती जणू!
          मला तर स्वामींचा मोठा धाक वाटत असे. बाकी सर्व देव स्मित करत असताना, स्वामी मात्र आपल्याकडे गंभीर मुद्रेने का बघत आहेत? आपण काही चुकलो का? आपण काय केलं की स्वामी आपल्याकडेही हसून बघतील? एकदा तरी असं दिवस येईल का? असे अनेक प्रश्न मनामध्ये रोज धिंगाणा घालत असंत. आईच्या ते लक्षात आलं होतं. मला अभ्यासाच्या, जेवणाच्या वेळेसही धाक दाखवताना आई नेहमी म्हणायची, “जो चांगला अभ्यास करतो, ताटातील पदार्थ संपवतो, त्याच्याकडे स्वामी हसून बघतात. नाहीतर चिडतात!” मग मी काही नं बोलता पानात वाढलेली नावडती भाजी किंवा गणिताचा अभ्यास संपवत असे. रोज स्वामींना कोमल मुद्रेने पाहण्याची प्रार्थना करत असे.
          तर, गुण्यागोविंदाने नांदणारी अशी आमची गोविंदवाडी...! पण, त्या वर्षी मात्र कोणालाच स्वामींचा प्रकट उत्सव अगदी ३ दिवसांवर आला तरीही काहीच करावे वाटत नव्हते. ठिकठिकाणाहून आलेले भाविक नेहमीच गजबजलेल्या आमच्या वाडीतील त्या खास दिवसांमध्ये असलेली भयाण शांतता पाहून नवल करत होते. वाडीतील जो माणूस दिसेल त्यांना आपलेपणाने याबद्दल विचारत होते आणि सत्य जाणून घेतल्यावर हळहळत होते. स्वामींची अन्नपूर्णाच स्वामींनी स्वतःकडे बोलावून घेतली होती. आता उत्सव कसा करावा? सर्वांसमोर मोठा प्रश्न होता.
          गोखले आप्पा... म्हणजे गोखले आजींचे पती... अगदी कडक शिस्तीचे. वाडीत कोणालाही काही प्रश्न पडला, संकट आलं तर पहिले त्यांना आप्पा आठवत असंत. आप्पा स्वतःदेखील अत्यंत संघर्षमय आयुष्य, अनंत अडचणी यांना तोंड देत खंबीर उभे होते. आजींच्या चेहऱ्यावर याचा सार्थ अभिमान नेहमी दिसत असे. त्यांच्या आयुष्यातील असे कठीण क्षण मोकळेपणाने सांगताना, पतीवरील प्रेम आणि अभिमानानं त्यांची प्रभा झळाळून निघे. अगदी तसेच तेज, तसेच समाधान स्वामींच्या चेहऱ्यावर आजींच्या हातचा नैवेद्य चाखून दिसते असं सर्व म्हणत असंत.
          डोंगरासारखे आप्पा,आजी गेल्यावर काडी मोडावे तसे आतून पुरते कोसळले. आयुष्यात नेहमी कडवट, कठोर अनुभव आणि त्यावर एकट्याने दिलेला लढा, यामुळे आप्पा थोडे जास्तच स्वाभिमानी होते. टोकाचे नास्तिक नसले तरीही फारसे भाविकही नव्हते. त्यांना मंदिरात कधी कोणी पाहिले नाही पण, आजींच्या भक्तिला कधी त्यांनी आडकाठीही केली नाही. कोणताही भाव कधीच ते चेहऱ्यावर दाखवून देत नसत. आजी गेल्यावरही त्यांनी खूप प्रयत्न करून डोळे वाहू दिले नाहीत. पण, सतत पाणावत असलेले डोळे ते किती वेळ झाकणार होते! आजींना मुखाग्नी देताना मात्र त्यांनी आभाळाकडे पाहून, “का केलेस रे हे असे?” असं देवाला विचारलं असेल का? जमेल तेवढं बाहेरून शांत राहू पाहणाऱ्या आप्पांचे डोळे दिवस दिवस भकास दिसत होते. रोज सकाळी फेरी मारताना टवटवीत दिसणारे आप्पा आता सुजलेल्या डोळ्यांनी, म्लान चेहऱ्यानं, फिरत होते.
          अशातच २ महिने गेले आणि उत्सवाचे दिवस असे भयाण शांततेत जात होते. देवा घरून हाक वाडीत अनेक घरांमध्ये आधीही आली आली होती. काही दिवसांच्या दुखवट्या नंतर सर्व सुरळीत होत असे. पण, आजींच्या जाण्याने मात्र पूर्ण वाडी सुन्न झाली होती. आता प्रकट दिन तोंडावर आल्यावर मात्र वाडीतील कुजबुज वाढू लागली. सर्वांसमोर एकंच प्रश्न होतं. “आता करायचं काय?” पण, आप्पा समोर आले की हा विषय बदलला जात असे.
          अवघ्या २ दिवसांवर आता उत्सव आला. त्या रात्री चर्चा चालू होती. अचानक आप्पा तिथे आले. “उद्या सर्वांनी नैवेद्य, भंडारा, बाकी उत्सवाची तयारी करण्यासाठी जे समान लागेल ते घेऊन यायचं. या पोरांना पाठवा आत्ताच वर्गणीसाठी.” कधीही मंदिरात न दिसलेला माणूस हे काय सांगतोय! सर्व अचंबित झाले. “उठणार का आता?” आप्पांच्या आवाजाने विचारांमधून बाहेर पडत सर्व उत्सवाच्या तयारीसाठी पांगले. पण, आप्पांच्या आवाजातला कंप, थकवा सर्वांना जाणवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तयारी करून पुन्हा वाडी सजवण्यात आली. बऱ्याच दिवसांनी वाडीत चेतना जाणवत होती. पण, खरा प्रश्न तसाच उभा होता... आजींशिवाय नैवेद्य पूर्ण होणार कसा???
                    तरीही पहाटेपासून सर्व बायका नैवेद्याच्या तयारीला लागल्या. मंदिराच्या मागच्या भागातील मोकळ्या जागेत स्वयंपाक होत असे. सर्वांना जी शंका होती ती खरी ठरली. एकदा ताजं असून दुध नासलं, मध्येच सांडलवंड झाली. नेहमीचं प्रमाण घेऊनही भजी तेलात विरघळत होती. आतामात्र सर्वांच डोकं सुन्न झालं. काय करावं कळे ना झालं! वाडीभर हे सर्व पसरायला वेळ नाही लागला. आप्पांच्याही हे कानावर आलं. आम्हा मुलांचा ते अभ्यास घेत होते. पुस्तक बाजूला ठेऊन आप्पा उठले. कपडे बदलून बाहेर आले आणि एक वही त्यांनी उघडली. “अरे ही तर आजींच्या पाककृतींची वही!” मी लगेच ती ओळखली. वाडीतल्या सर्व आयाबायांची ती वही म्हणजे मदतीला धावून येणारी सखी. सर्व मोजमाप, क्लुप्ती, आजी त्यात लिहून ठेवत. कोणीही काही खास पदार्थ करायचा असेल की ती वही घेऊन जात असे. आप्पांनी नैवेद्याच्या शिऱ्याच पान उघडलं. आजींच्या छायाचित्राकडे पाहून, “हेच हवं आहे ना तुला!” असं काहीसं म्हणाले आणि झपझप बाहेर चालू पडले.
          पुस्तकं, वह्या आवरून आम्ही मुलं खाली आलो. बघतो तर काय! आप्पा एखाद्या सराईत बल्लवाचार्यासारखे उभे राहून शिरा करत होते. सर्वजण अचंबित होऊन ते दृश्य पाहत होते. पाच सहाशे जणांना होईल एवढा शिरा हा हा म्हणता झाला आणि त्यात एकही विघ्न आले नाही. “आता बाकी पदार्थ करा.” आप्पांच्या आवाजाने सर्व भानावर आले. काय चमत्कार! खरंच, सर्व पदार्थ आता बरोबर होऊ लागले. आप्पा संपूर्ण वेळ तिथेच उभे राहून एकेक सूचना, वहीत पाहून देत होते. सर्व स्वयंपाक वेळेत झाला. स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी दामले गुरुजी ताट घेऊन मंदिरात गेले. तेवढ्यात कोणीतरी मोठ्यानं ओरडलं... आम्ही सर्व धावत बाहेर आलो.
          आप्पा जमिनीवर बसले होते... की कोसळले होते? लालबुंद चेहऱ्यावरून अश्रू ओघळत होते. “झालं का ग तुला हवं ते? तुझा नैवेद्याचा नेम नाही मोडला मी.” आम्ही सर्व अवाक्! “आता जे आहे ते गोड मानून घे रे बा, देवा!” आप्पांनी हात जोडले होते. दामले गुरुजी नैवेद्य दाखवून बाहेर आले. आपल्या जीवाभावाच्या मित्राला त्यांनी उभं केलं. जवळ घेतल. “आत ये. जरा शांत हो.” असं म्हणत त्यांनी आप्पांना आत नेलं. आज पहिल्यांदाच त्यांना कोणी मंदिराच्या आवारात पहिले. “तिच्या आठवणीने जीव पिळवटून निघतोय आणि दुसरीकडे तिचा नेम नाही चुकला, माझ्या हातून सेवा घडली याचं समाधानही आहे!” आप्पा बोलत होते.
          मला त्याचे अश्रू बघवत नव्हते. मी तडक गाभाऱ्यात स्वामींकडे धाव घेतली. “का असे कठोर झालात तुम्ही?” आज जाबच विचारणार होते. पण, आज स्वामी माझ्याकडे प्रसन्न मुद्रेने पहात होते. “आजींच्या हातचा नैवेद्य चाखुन स्वामी प्रसन्न दिसतात असं वाडीतले सर्व म्हणतात ते हेच का?” मला पहिल्यांदाच हे स्वरूप पाहायला मिळालं. आज असं कसं झालं??? मी थोडी अजून जवळ जाऊन स्वामींना निरखून पाहू लागले... आणि उत्तर मिळालं... त्यांच्या ओठांवर काही लागलं होतं... आप्पांनी केलेल्या शिऱ्याचे कण होते ते...!!!

©वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

उशीर
         
            "तू हवं तेव्हा निघ. मी पोहोचेन वेळेतच... नेहमीप्रमाणे. पण, तू आजही उशिरा आलास तर मी थांबणार नाही. आज शेवटची भेटणार होते, तीही तशीच निघून जाईन." रस्त्यात वाट पाहत उभं राहण्याचा तिला अत्यंत तिटकारा. रागाने फणफणतच श्रेया घराबाहेर पडली. "आज काय तो सोक्षमोक्ष लावतेच. वेळ तर नसतोच कधी याला पण आता तर सतत चिडचीड! नेहमी वैतागून बोलतो." अशाच सगळ्या विचारात गढून गेली असल्याने पावसाळ्याचे दिवस असून ती छत्री घ्यायला विसरली. स्टेशन जवळ आलंच होतं एवढ्यात मुसळधार पाऊस सुरु झाला. छत्री विसरल्यामुळे स्वतःवरच वैतागली.
          चार पाच ट्रेन्स समोरून गेल्या, तरीही पावसामुळे तिला हताश होऊन, स्टेशनसमोर रस्त्यातच एका शेडखाली उभं राहावं लागलं होतं. "पाऊस नसता तरीही साहेबांची वाट पाहत असंच ठाणे स्टेशनबाहेर वाट पाहत थांबावं लागलंच असतं." तिची आतल्याआत धुसफूस सुरूच होती. पावसाचा जोर जरा कमी झाल्यावर तिने भराभर रास्ता ओलांडून प्लॅटफॉर्म गाठला. तर पुढची ट्रेन १५ ते २० मिनिटं उशिराने असल्याची घोषणा झाली. घड्याळाचा काटा पुढे जात होता तसा श्रेयाचा रागही वाढत होता. तेवढ्या वेळात दोन वेळेस श्रीकांतचा फोन येऊन गेला. तिने समजूनही दुर्लक्ष केलं. "फोन नाही उचलला की कसं वाटतं बघ आता!" तिने ठरवलं होतं. २० मिनिटांनी एक ट्रेन आली. तोपर्यंत गर्दी जास्त झाली असल्यामुळे श्रेया चढू शकली नाही. “किती वाजले?” तिने मोबाईल पाहिला. श्रीकांतचे ५ मिस कॉल!! "अरे वाह! रोज तर लक्षातही नसतं फोन वगैरे करावा असं. आज बरा वेळ मिळतो आहे!" तिने फोन पुन्हा बॅगेत टाकला. पाऊण तासांनी श्रेया ट्रेनमध्ये चढू शकली. "मी पोहोचलो आहे. ट्रेनचा गोंधळ आहे. सावकाश ये." "कुठे पोहोचलीस?" "मला काळजी वाटत आहे. मेसेज, कॉल पाहूनही उत्तर मुद्दाम देत नसशील तर असं करू नको, प्लिज." हा शेवटचा मेसेज वाचून तिने त्याला कॉल केला. बिचारा खरंच काळजीत होता. त्याच्या आवाजातून श्रेयाला ते लगेच समजलं. तरीही, आपला तोरा सांभाळत, तिने "आता वाट बघ आणि कसं वाटतं सांग!" असं तोंड वाकडं करत उत्तर दिलं. डोंबिवली ठाणे अर्ध्या तासाचं अंतर... पण, आज ट्रेन थांबत थांबत दिड तासाने ठाण्याला पोहोचली. तेवढ्या वेळात पाऊस, मोबाईलवरील गाणी, फोटोज, त्याचे अधूनमधून येणारे कॉल आणि मेसेज यामुळे तिचा राग मावळत होता. बऱ्याच दिवसांनी तो आपली वाट पाहतोय आणि त्याला अजून काळजी आहे, या विचाराने ती सुखावली होती.
          तशी श्रेयाही तापट. याबाबतीत अगदी श्रीकांतपेक्षा चार पावलं पुढेच. हे तिलाही मान्य आहे आणि मनापासून ती बऱ्याच वेळेस शांतपणे बोलायचा प्रयत्न करत असते. पण, आजकाल कामाच्या गडबडीत किंवा श्रेयाचा (अव)गुण लागल्यामुळे श्रीकांतही चिडका झाला आहे. कितीही "सोक्षमोक्ष लावायचा" ठरवलं तरीही दोघांनाही हे शक्य नाही हे माहित होतं. पण, तरीही एकमेकांपासून दूर जाण्याची भितीही होती. श्रेया स्टेशनबाहेर आली. समोरच तिला श्रीकांत दिसला. काळजी, आपण चुकलो असल्याची भावना, सगळं अगदीच स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. श्रेया थोडी हट्टी आणि लाडोबा असल्यामुळे राग ओसरला असला तरी ती काही एवढ्यात ते दाखवणार नव्हतीच. आपल्याला उशीर झाला पण, श्रीकांत कारणं देतो तसं आपलं अजिबात नाही. ट्रेनमुळे गोंधळ झाला. असा सगळा विचार तिच्या मनात चालू होता. चिडल्यावर, भाव खाताना, एखादा टोमणा ती सहज मारते. अगदी तशाच सवयीप्रमाणे ती सॉरी म्हणतानाही सरळ बोलणार नव्हतीच.
          "सॉरी... मी वेळेतच निघाले होते. पण, ट्रेन आणि पाऊस... काय करणार मी! तुझ्या आधीच पोहोचले असते. पण, बरं झालं... आता कसं वाटतंय मला उशीर झाला म्हणून!" श्रीकांतला तिच्या असं बोलण्याची खोड चांगलीच सवयीची होती. आज तो यावर चिडणार नव्हता. त्याने शांतपणे तिच्याकडे पाहिले. " उशीर झालाच तुला! खरंय! जरा आधी आली असतीस आयुष्यात तर आणखी आनंद मिळाला असता. आता फक्त एक काम कर. उशीर झालाय हे ठिक पण आता कधीच जाऊ नकोस." त्याच्या उत्तराने ती चकित झाली. राग तर ओसरला होताच पण, त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांनी उरलीसुरली कटुताही वाहून गेली. त्याने दिलेला रेनकोट तिने चढवला आणि बाईकवर बसून त्याला घट्ट मिठी मारून ती दोघं फुर्रर्र निघून गेली.


-      ­ © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे

रविवार, १५ मे, २०१६

गुलमोहोर

           "बाबा, या शेंगा बघा ना गुलमोहोराच्या! कशा पसरट आणि लांब आहेत. तुम्ही त्या गोष्टी सांगता त्यातल्या तलवारीसारख्या... की  दांडपट्टयासारख्या!"
          रविवारच्या निवांत दुपारी मी गॅलरीमध्ये असाच शून्यात नजर लावून उभा होतो. तोच आमच्या ५ वर्षांच्या तेजूने माझ्या पँटला पकडून मला हलविले. "बाबा, दोन शेंगा द्या ना खेळायला. हात लांब केलात की आल्याच हातात." आत्ता आत्तापर्यंत अम्, मम्, ब्बा, असे काहीसे आवाज काढणारी, माझा हात पकडून चालायला शिकणारी माझी बाहुली किती सहज आता केवढं काही सांगू शकते! मी आनंदाश्चर्याने तिच्याकडे पाहतंच राहिलो. तोच तिने पुन्हा मला हाक मारली. तिच्या हातात गुलमोहोराच्या शेंगा देऊन तिचा पापा घेतला. बाईसाहेब लगबगीने, खेळण्याच्या नादात आत पळून गेल्या. अगदीच तान्ही असल्यापासून तेजूचं हे लाडकं झाड असावं. तिच्या टप्पोऱ्या डोळ्यांनी ती गुलमोहोराची लाल भडक फुलं पाहून उत्साहाने हुंकार भरत असे.
          परवाच माझे आई बाबा इथे आले होते. आई सांगत होती, "तेजू अगदी तुझ्यावर गेली आहे हं! गुलमोहोराच्या फुलांचा सडा आपल्या दारात पडतो ना; तो पाहून 'लाल गालिचा', 'रेड कार्पेट', असं म्हणून चिमणी थुई थुई नाचली त्यावर. तुपण असाच नाचायचास गुलमोहोरांच्या फुलांवर." 
          खरंच! गुलमोहोराचा तो रंग, फुलं, ते झाड, सगळंच माझ्या मनाच्या अगदी जवळचं. लहानपणी मीदेखील तलवार तलवार खेळत असे त्या शेंगांसोबत. आमच्या जुन्या घरासमोरही असंच एक मोठं गुलमोहोराचं झाड आहे. तिथे मी तासंतास रेडिओवरील गाणी ऐकत, अभ्यास करत तर कधी नुसताच त्या सावलीत चटई अंथरून लोळत असे. गुलमोहोराच्या फुलांचा तो नाजूक, मऊ स्पर्श मला आजही आवडतो. त्या आवडीचे संदर्भ मात्र वयानुसार बदलत गेले. लहानपणी खेळाचे सोबती असलेली ही फुले नंतर तिची आठवण करून देणारी झाली.
          ती म्हणजे रमा; माझी बालमैत्रीण. पण महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षांमध्ये तिच्याबद्दल काहीतरी वेगळीच ओढ मला जाणवू लागली होती. एक दिवस आमच्या घरी रमा काही कामासाठी येऊन गेली. ती गेली पण इथे माझं मन बेचैन होतं. तिचा तो लाल रंगाचा पंजाबी सूट... अगदी तसाच लाल रंग या फुलांचा आहे. अंगणात चटईवर लोळत गुलमोहोराचं फुल हातात नाचवत मी पुन्हा पुन्हा रमाची आठवण काढत होतो. किंबहुना ती आपसूक येतंच होती... सतत... तिचं मनमोकळं हास्य, तिचा निर्मळ पण स्पष्ट स्वभाव, तिचा आजचा ड्रेस, तिचे तसेच लाल ओठ, गाल... बेचैनी वाढत होती. खिशातून पेन काढलं आणि त्याच गुलमोहोराच्या एका पाकळीवर मी आमची नाव एका बदामात लिहिली. घरी गेलो एक पुस्तक घेतलं आणि त्यात ती पाकळी ठेऊन दिली. नंतर कितीतरी दिवस गेले. ती पाकळी तिला देण्याचंच काय; मी तर त्या पाकळीबद्दल अगदी विसरलो होतो. महाविद्यालयात ते पुस्तक माझ्यासोबत असायचं पण मी इतक्यात ते उघडलंही नव्हतं. रमेने ते माझ्याकडून वाचायला घेतलं आणि माझ्यासमोरच उघडलं. नेमकी त्याचं पानात दडवून ठेवलेली ती पाकळी तिला दिसली. तिने ती हातात घेतली. किंचितशी लाजली. "किती दिवस अजून अशीच ही पाकळी पुस्तकात सुकवणार होतास? बरंय, जिच्यासाठी आहे तिच्याकडे स्वतःच आली ती. मलाही बरेच दिवस तुला हे सांगायचं होतं. पण, असं काही सुचलं नसतं रे मला. खूप सुंदर आहे हे. मी जपून ठेवेन." माझ्या मनातला आनंद ओळखून तो गुलमोहोरही भेभान होऊन वाऱ्यावर सळसळत होता. मग आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या. गुलमोहोर मोहोरत गेला.
महाविद्यालायचं शेवटचं वर्ष सरलं. सुट्टयांमध्ये आम्ही आमच्या नेहमीच्या बागेत भेटत असू. तेही गुलमोहोराच्या झाडाखालीच. त्यानेच अंथरलेल्या गालिच्यावर हातात हात घालून आम्ही गप्पा मारत असू. आता पुढचं शिक्षण किंवा नोकरी यामुळे आम्हाला रोज भेटता येणार नाही म्हणून मी काहीसा विचारात होतो. दुराव्याच्या विचाराने तिचा आत्ताचा सहवास, स्पर्श, अधिक हवाहवासा वाटत होता. त्याच विचारात मी तिचा हात घट्ट पकडला आणि जवळ ओढला. साहजिकच ती जराशी जवळ आली. तिचा नेहमीचाच स्पर्श आज मात्र मला भलतीच मोहिनी घालत होता. मी तिला आणि जवळ घेतले आणि तिचे चुंबन घेण्यासाठी पुढे झालो. तोच तिने माझ्या हाताला जोरदार हिसडा दिला. मला काही समजलेच नाही! मी पुन्हा पुढे आलो. पुन्हा एकदा धक्का मारून माझ्याकडे अत्यंत रागीट कटाक्ष तिने टाकला. काय होतंय या भानावर मी अजून पुरता आलोच नव्हतो. पण गुलमोहोराचा रंग आता तिच्या डोळ्यात उतरला होता. चेहराही तसाच लालेलाल! "हात पकडणं वगैरे ठिक. पण लग्न नाही झालं अजून आपलं. असल्या गोष्टी मला चालणार नाहीत, सांगून ठेवते." ती उठली आणि निघून गेली. मी पार शरमिंदा झालो. अचानक गुलमोहोर भकास वाटू लागला.
          तिच्या एका वाक्याने मी आजवर सर्व स्त्रियांशी अधिक आदबीने वागतो. कदाचित पौगंडावस्थेतील मुलामुलींवर, त्यांच्या मानसिक, शारीरिक बदल आणि वागणुकीवर अभ्यास करून आता देशोविदेशी कार्यशाळा, चर्चासत्र, घेणारा मी... डॉ शैलेश मुजुमदार त्या एका झटक्यामुळे कुठेतरी घडला, असं म्हणायला हरकत नाही. एक झटका... माझा गुलमोहोर मला भानावर आणून तिथून निघून गेला.
          "मेरी झाँसी में नही दूँगी।" तेजूच्या आवाजाने मी आठवणींमधून बाहेर आलो. आमचं कन्यारत्न तिच्या आईची लाल ओढणी साडीसारखी गुंडाळून, हातात तलवार म्हणून शेंग घेऊन उभी होती. इवल्याशा वयातही झांशीच्या भूमिकेत रमलेल्या तिच्या चेहऱ्यावर करारी आणि ठाम भव होते! अगदी तसेच.... रमेच्या चेहऱ्यासारखे! उन्हात बराच वेळ उभी असल्याने तिचे गोबरे गाल लाल दिसत होते... रमेसारखेच!!! नाही... गुलमोहोराच्या पाकळ्यांसारखे!
          इतक्यात बायको माझ्यासाठी चहा घेऊन आली. मी बशीत चहा ओतला आणि तिला दिला. लग्नाआधी आम्ही असेच चहा पित असू. तिलाही ते आठवले आणि तिलाही तेच आठवले. ती किंचित लाजून हसली.  तोच रंग पुन्हा खुलला होता. मी माझ्या गुलमोहोरांच्या दोन फुलांकडे पाहत होतो. रमा आणि तेजू... आणि आमच्या पाठीशी माझा सवंगडी... तो टवटवीत गुलमोहोर!


-      © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे. 

सोमवार, २५ एप्रिल, २०१६

    नंदादिप

           "आलीस, रूपा! ये ये बाळ, बस." बऱ्याच वर्षांनी तो आवाज कानी आला. आता आवाजात थकवा होता पण तेच प्रेम, तोच आपलेपणा जाणवला! लग्नानंतर पहिल्यांदाच मी अनुजाच्या घरी गेले. पण काकूंनी पूर्वीसारखेच हसत स्वागत केले त्यामुळे मधली ८ वर्ष जणू गायबंच झाली असं वाटलं. 
          अनू माझी वर्ग मैत्रीण. अगदी बालवर्गापासून कॉलेजपर्यंत आम्ही दोघी एकत्रच होतो. दर काही दिवसांनी एकमेकींकडे येणं जाणं होत असे. पुढे लग्न होऊन मी यूएसला गेले आणि आमचा संपर्क कमी झाला.  आता यूएसला आमच्या जवळच अनुजा तिच्या नवऱ्यासोबत राहायला आल्यावर आमची भेट अधूनमधून होत असे. काकूंचे निर्मळ, तजेलदार डोळे सतत डोळ्यांसमोर येऊ लागले. जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या तशा त्या एकेक करून उड्या मारून वर येऊन काकूंच्या भेटीची ओढ तीव्र लागल्या. तिच्या आईच्या हातच्या एकेक पदार्थांची आणि त्यांच्याकडील नंदादिप यांचीही आठवणही आली. परदेशात अशा आठवणी जास्तच डाचतात. अनू तिच्या आई वडिलांबद्दल फारशी काही बोलत नाही, हे आत्तापर्यंत माझ्या लक्षात आलं होतं. कदाचित त्यांच्याशी तिचं तेवढंसं बोलणंही होत नसावं!... माझा आपला एक अंदाज. एकदा तिला ओझरतं याबद्दल विचारूनही पाहिलं पण तिच्या उत्तरावरून आम्ही आता त्या पूर्वीसारख्या एकमेकींना सगळं सांगणाऱ्या मुली राहिलो नाहीत आणि वयासोबत बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, हे लक्षात आलं. एव्हाना मला अनूचा भाऊ वेगळा राहतो आणि आता आई बाबा दोघंच घरी असतात असं समजलं होतं. यूएसला नवीननवीन होते तेव्हा इतरांशी ओळख होई तो एकटेपणा काय असतो याची कल्पना मला आली होती. त्यामुळे तिथे आपल्या दोन्ही मुलांची आठवण काढत अनूचे आईवडील आपल्याच देशातही आठवणींच्यासोबत परकेपणाने आपल्याच माणसात वावरत असतील, हे मी जोखले होते. त्यांना भेटायची इच्छा अधिक तीव्र झाली. परवाच भारतात आले आणि काल काकूंना फोन करून भेटायला येते असं कळवलं.
          काकू कशा असतील? पूर्वीप्रमाणेच आम्ही एकमेकींशी बोलू का? काय बोलावं? एवढ्या वर्षांनी आज मी कशी आले भेटायला, असं विचारलं तर उत्तर काय देऊ? मनात असंख्य विचार आणि हातात एक लहानशी भेट घेऊन मी त्यांच्या दारात उभी होते. पण, काकूंच्या पूर्वीसारख्या स्वागताने मनातलं मळभ दूर झालं. घरात पाऊल ठेवताच मटरच्या करंज्यांचा खमंग वास नाकात शिरला. "तुला आवडतात नं करंज्या! कालंच यांना सांगून बाजारातून मटार आणले." काकू मायेने डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. मला त्यांच्या एवढ्या प्रेमाने उगीचंच भरून आल्यासारखं झालं. सोबतच आपण एवढी वर्ष काकूंना भेटलो नाही, याबाबत अपराधी वाटू लागलं. 
          बराच वेळ गप्पा झाल्या. काका, काकूंनी बोलून दाखवलं नाही तरीही अनू आणि तिचा भाऊ इथे फारसे फिरकत नाहीत किंवा काही हवं नको पाहत नसावेत हा माझा समज अधिकाधिक घट्ट होऊ लागला. तडे गेलेल्या, पोपडे निघालेल्या भिंतींप्रमाणे नाती विद्रुप झाल्याचा मला भास होऊ लागला. कारण काय असेल हे मला माहित नाही आणि मला त्याच्याशी काही कर्तव्यही नाही. पण आपल्याच आई वडिलांशी कोणी एवढं फटकून कसं वागत असेल हे मला समजत नव्हतं. 
          अनू आता माझ्याजवळच राहते हे त्यांना माहित नव्हतं. किंबहुना ते युएसला आधी राहायचे तिथून दुसरीकडे शिफ्ट झाले हेच त्यांना माहित नव्हतं. काकूंनी नेहमीप्रमाणे सारवासारवी केली. पण, "मुलगी लग्न करून भारताबाहेर गेली, फोन वगैरे नसतोच तिचा आणि मुलगा इथे जवळच राहत असूनही बऱ्याच महिन्यांनी त्याच्या आईने अनेक निरोप पाठवले की अर्ध्या एका तासासाठी पाहुण्यासारखा येऊन जातो... एकूण काय पाखरं घराट्यातून उडून गेली की ती परत येतील ही आशा ठेवणंच चूक." काकांच्या एका वाक्याने माझा अंदाज खरा ठरला होता. काकूंनी शिताफीनं डोळ्यातलं पाणी लपवलं. 
          थोडा वेळ कोणीच कोणाशी बोललं नाही. मग काकू उठल्या, देवापाशी दिवा तेवत होता. काकूंनी वात सारखी केली आणि जरासे तेल घातले. काकूंकडे देवासमोर नेहमीच एक दिवा तेवत असतो. दर काही दिवसांनी एक दिवा नेमाने घासला जाई तेव्हा दुसरा घासलेला दिवा देवापाशी ऐटीत विराजमान होत असे. नेमाने स्वच्छ, लखलखीत केला जाणारा आणि बारा महिने, चोवीस तास अखंड तेवणारा तेजस्वी दिवा! आज मात्र तो काळवंडलेला दिसत होता. बरेच दिवस घासला गेला नसावा. मी आणि अनू लग्नाच्या वयाच्या झालो तेव्हा एकदा काकूंनी आम्हाला जवळ बसवलं. दिवा लख्ख चमकवताना त्या म्हणाल्या, "हा दिवा सासूबाईही असाच अखंड तेवत ठेवत. मी घरात आले तेव्हा मला त्या म्हणाल्या की ही आपली परंपरा आहे. यातून दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. या घरात आपण दिव्यासारख्या सतत प्रकाश देत राहायचं आणि ज्याने आपल्याला एवढं भरभरून सुख दिलं आहे, त्याच्या पायाशी अंधार होऊ द्यायचा नाही. तुम्ही पोरीही लग्न कराल तेव्हा हे लक्षात ठेवा की तुम्हाला दोन्ही घरं अशीच प्रकाशमान करायची आहेत आणि याबद्दल देवाचे नेहमी  ऋणी राहायचं." हातातील दिवा आमच्या डोळ्यांसमोर धरून पुढे त्या म्हणाल्या, "बरं, हा दिवाही अस्सा हवा. स्वच्छ आणि चमकदार. दिव्याला काजळी धरता कामा नये. आपलं घरही असंच हवं. कोणाच्या मनात एकमेकांबद्दल काही मळ नको." हे सांगताना त्या ज्योतीचे तेज असलेले काकूंचे चमकणारे डोळे आणि दिव्यासारखे स्वच्छ, लखलखीत असे काकूंचे अंतरंग मला आजही स्पष्ट आठवले. एकटेपणाचं दुःख पचवूनही कोणतीही तक्रार न करता त्या देवाकडे त्यांच्या दोन्ही मुलांसाठी सुख, भरभराट मागत होत्या, हे सांगायला तिथे कोणा अन्य व्यक्तीची गरज नव्हती. 
          त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि होणारी घुसमट यामुळे मी गलबलून गेले. त्यांना भेटवस्तू दिल्या आणि निरोप घेतला. "पुन्हा ये गं वेळ असेल तेव्हा. किती बरं वाटलं आज आलीस ते. सुखी राहा. जे मनात आहे ते मिळो" मी पाया पडत असताना काकू म्हणाल्या. निघताना पुन्हा एकदा त्या दिव्याकडे नजर गेली. पूर्वीपेक्षा तो जरासा मिणमिणता झाल्यासारखा जाणवला. एवढी काजळी साचल्यावर असंच होणार म्हणा!

- © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.