गुरुवार, २ जुलै, २०१५

शुभ्राची दैनंदिनी
११ जून २०१५
          
          आज बऱ्याच दिवसांनी जरा वेळ मिळाला आहे. मिळाला कसला! काढलाच.. मुद्दाम! अगदी ठरवून..! आता असेच सारे दिवस भरपूर कामाचे.. तारेवरची कसरत करायचे..! पुन्हा लिहायला वेळ कधी मिळेल ठाऊक नाही. तशी दैनंदिनीला अधूनमधून बुट्टी मारणे मला नवीन नाही. पण, किमान काही महत्त्वाच्या नोंदी, आठवणी जपून ठेवायलाच हव्या म्हणून हा खटाटोप.

          ५ जून २०१५, डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या चांगले २० दिवस आधी अचानक आगमन करून आमच्या बाळ राजेंनी सर्वांचीच धांदल उडवली. नेमक्या त्याच दिवशी सासूबाई निलूच्या लग्नासाठी ४ दिवस काढून सुरतेस गेल्या होत्या. माझी तब्येत, काही हवं / नको, सर्व व्यवस्था पाहून, मला चार चार वेळेस विचारून गेल्या त्या. आता या बाळोबाला सर्वांना चकित करायची आणि वेळेआधीच जग पहायची एवढी घाई झाली असेल, असं कोणाला माहित होतं! मला कळा सुरु झाल्या.. कसबसं स्वतःला सावरत सचिनला फोन केला.. ऑफिसला जाण्यासाठी अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचलेले बाळाचे बाबा माघारी फिरले.. येताना आमच्या जवळच राहणाऱ्या त्याच्या शैला मावशीला मदतीसाठी घेऊन आला.. आमची ही पहिलीच वेळ आणि त्यात घरी मोठं कोणीच नाही.. तेव्हा शैला मावशीची खूप मदत झाली. कारमधून त्वरित मला हॉस्पिटलमध्ये आणलं. सकाळपासून कळा देऊन देऊनही रात्री ११ वाजता माझी सुटका झाली. एवढ्या कळा, सर्वांची धावपळ, हॉस्पिटलचं कुबट वातावरण.. बाळ आता लवकरच आपल्या कुशीत असेल याची हुरहूर..! पण या सगळ्यातही माझ्या डोक्यात एक वेगळंच द्वंद्व चालू होतं..! हो.. मी चक्क भांडत होते.. कोणाशी? स्वतःशी.. नशिबाशी.. परिस्थितीशी.. देवाशी.. की आईशी??

          ही चिडचीड, असा त्रागा, याचा काय फायदा? उलट स्वतःलाच त्रास.. आणि आता बाळालाही.. गरोदर असताना अनेकदा स्वतःला असं समजावून पाहिलं. पण, मनाचं असंच असावं. जे विचार नको असतात म्हणून मनाला गच्च आवळायला जावं, तेवढंच उसळी मारून ते वर येतात.. बोचत राहतात! त्यात हे हार्मोनल चेंजेस म्हणजे भावनांचा झोपळाच.. मस्त वर वर जाणारा.. पोटात खड्डा पाडत खाली येणारा!

          तशी मी आईची बरेचदा आठवण काढत असते. बरेचदा नशिबाला दोष देत असे. पण, बाळ होते वेळीही तीच फक्त माझ्या मनात आंतर्बाह्य व्यापली होती. “ती आज इथे असती तर मी “जा” म्हणाले असते तरीही गेली नसती कुठे बाहेर.” वाक्य पूर्ण होईपर्यंत, “पण, गेली तर खरी निघून..” दुसरं वाक्य हजर.. “पण, ते तिच्या हातात नव्हतं.” “पण, त्रास तर झालाच नं.. तुला आणि सगळ्यांनाच!” बापरे.. किती हे विचार! अनेस्थेशियापेक्षा विचारांनीच बधीर झाल्यासारखं झालं.

          आई हे जग सोडून गेली तेव्हा खूप लहान होते मी. शाळकरी पोर! ईशान तर माझ्याहून लहान.. काही दिवस घरातील गडबड पाहून गोंधळले. सर्वजण नानापरी, “आई कुठे आहे?” या प्रश्नावर उत्तर देत होते. तात्पुरतं मन त्या थापांत रमत होतं. पण, दिवसपाणी झाले आणि सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. मग मात्र हे काहीतरी विचित्र आहे, हे जाणवलं. घरभर शोधलं आईला, रडरड रडले, चिडले, फेकाफेक केली. शेवटी बाबांनी जवळ घेऊन थोपटलं. “आई आता कधीच दिसणार नाही.” असं मला म्हणाले. ते रडणं माझं शेवटचं होतं. मग सर्वांसमोर कधीच रडले नाही मी. एकट्यात रडत, राग काढत, मोठी झाले. मित्र मैत्रिणींच्या आईमध्ये, कधी कुणा ओळखी तर कधी अनोळखी स्त्रीमध्ये आई शोधात.. कधी तिची कल्पना करत, दिवस काढत राहिले. मोठी झाले, वयात आले, तेव्हा जगातील एवढी मोठी गोष्ट सांगायला, समजवायला, आईच नव्हती जवळ! सर्व मैत्रिणी त्यांच्या आईनी काय सांगितलं याबद्दल? काय काळजी घ्यावी? पहिल्या नाहाण्यानंतर कशी ओवाळून भेटवस्तू दिली! असं सांगत असत. मी एकटी आतल्या आत धुसफुसत पण आतुरल्या कानांनी त्यांचे क्षण साठवत असे. मग मात्र आईची आठवण म्हणजे रागच येई मनात. देवाचाही आणि तिचाही.. केवळ तिरस्कार..! वेडेपणाच होता तो.. आता समजतंय! पण ते मोठे होत असतानाचे दिवसही असे विचित्रच असतात. अजून वय वाढलं. महाविद्यालयात जाऊ लागले.. कोडकौतुकाची सवयच नुरली होती. आता महाविद्यालयात जाण्याआधी आणि  आल्यावर घरातले सर्व काम आणि ईशानचा अभ्यास ही वेगळी जबाबदारी अंगावर आली. आपल्याला इतरांसारखी मजामस्ती करायला वेळच नाही. आपल्याकडे आई नाही आपल्याला काय हवं आहे हे सर्व समजून घेण्यासाठी...  हळूहळू मनाविरुद्ध, झगडत का होईना परिस्थिती मान्य करावीच लागते.. तशी केली. आजवर आई गेल्यामुळे काय काय नाही करता आलं आणि ती कसं आपल्याला काहीच न देता गेली.. त्यामुळे तिला/ देवाला दोष देत आले. आपलं आपण सगळं शिकलो.. जबाबदार झालो.. एकटे राहू शकतो.. असा किमान इतांना दाखवता येण्याजोगा एक वेगळंच दृष्टीकोन आला. अधूनमधून नातेवाईक, “शकुसारखी/ आईसारखी दिसतेस हो अगदी.. सुंदर!” किंवा “शकूसारखी सगळ्यांची काळजी घेणारी आणि लाघवी पोरं आहे!” म्हणतात. बाबा मी केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक डोळे भरल्या नजरेने करून, “अगदी तुझ्या आईसारखी सुगरण आहेस!” म्हणत, तेव्हा त्याचा आनंद होत नव्हता. काहीच वाटेना झालं होतं! माझ्या लग्नात बाबाच काय पण आईची फारशी आठवण असणे शक्यच नसलेला ईशानही, “आई आत्ता हवी होती.” म्हणून रडला तेव्हाही मी मात्र कोरडीच होते. “काहीच दिलं नाही आईनी आपल्याला आणि पोरकं करून निघून गेली.” माझा हा एकंच तोरा!

          तुझी तिथी कधी मी लक्षात ठेवली नाही की कधी देवाला किंवा तुला फुलं वाहिली नाहीत!  पण, बाळाला हातात घेतलं आणि कसं कोण जाणे अचानक लक्षात आलं.. तू गेलीस ती हीच तारीख! तू गेलीस तेव्हापासूनच स्वतःच्या कोशात, भ्रमात असलेल्या या ‘स्वयंभू शुभ्रेचा’ जन्म झाला होता. पण नाही..! खरा जन्म आता झाला आहे.. बाळाची अंघोळ, बाळाला न्हाऊ माखू घाला, त्याला सांभाळ आणि सोबतच घरातल्या सर्वांच करा.. ईशानच्या वेळेस तुझी ही अशी धावपळ मी पहिली होती. तुझ्या माहेरी  तूदेखील फार लहान वयात घराची जबाबदारी उचलली होतीस असं मामा नेहमी सांगतो. त्यामुळेच माझ्यातही हा गुण आला. तू देखणी होतीस म्हणून मी आहे. सुगरण होतीस म्हणून मी आहे. काळजी घेणारी, मायाळू होतीस म्हणून मी आहे. एवढी वर्ष तू नाहीस म्हणून तुला शोधत, स्वतःशी भांडत राहिले. पण, आता समजलं.. तू कुठेही गेली नाहीस मला सोडून.. माझ्यातच होतीस तू.. आणि राहशील.

    © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे