सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

"बाप" माणूस 





           बाहेर धो धो पाऊस पडत होता. चिऊच्या बाबांनी तिच्यासाठी नवीन पावसाळी चपला घेतल्या होत्या. नुकतीच शाळेत जाऊ लागलेली चिऊ सकाळीच बाबांसोबत शाळेत जायला घराबाहेर पडली. चपला नवीन असल्याने त्या चिऊच्या इवल्याशा पायाला लागू लागल्या. चिऊने बाबांना सांगितले. बाबा म्हणाले, “नवीन चपला आहेत. थोड्याशा त्रास देणारच.” शाळेत पोहोचल्यावर बाबांनी चिऊच्या चपला काढल्या तर त्यांना पायाची सालं निघालेली दिसली. खरतर फारसं लागलं नव्हतंच पण बाबांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. वेळीच पाहिलं असतं तर पोरीला लागल नसतं, असं त्यांच्या मनात आलं. आजही हा प्रसंग कोणाला सांगताना बाबांचे डोळे पाणावतात. हे बाबा म्हणजे डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि चिऊ म्हणजे त्यांची लाडकी कन्या वैदेही अर्थात मी. राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोहींबद्दल प्रचंड आक्रमक होणारे आमचे बाबा खासकरून मुलांबद्दल फारच हळवे आहेत. एक राष्ट्राभिमानी व्याख्याते म्हणून ते सर्वांच्याच परिचयाचे आहेत. त्यांच्या स्पष्ट आणि तीक्ष्ण वाणीमुळे बरेचदा लोकं त्यांना फारच कठोर समजतात. पण, नारळही वरून कठीण दिसतोच की तसेच आमचे बाबा जेवढे शिस्तशीर तेवढेच संवेदनशील आहेत.
          मला आठवतं, बाबांनी नोकरी सोडली तेव्हा मी आणि दादा जेमतेम पाचवी सहावीत होतो. पण गुरु आज्ञेनुसार बाबांनी संपूर्ण वेळ लेखनकार्य आणि राष्ट्रप्रबोधनासाठी देण्याचं ठरवलं. ऐन उमेदीच्या काळात नोकरी सोडल्यावर समोर येणारे आर्थिक प्रश्न वगैरे याची जाण आम्हा दोघांना असणं शक्यच नव्हतं. आमची आई सौ. शुभांगी शेवडे मात्र सतत बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आर्थिक गणितांची कसरत आणि बाबांचे सततचे कार्यक्रमांचे दौरे सांभाळत तिनं आम्हाला काहीच कमी पडून दिलं नाही की कसली तक्रार केली नाही. त्यामुळे बाबांना लेखक आणि व्याख्याता म्हणून मिळालेल्या यशाची खरी शिलेदार आमची माऊली आहे असे तेही निःसंकोच सांगतात.
          बरेचदा इतरांना उपदेशाचे डोस पाजणारे स्वतः मात्र कोरडे पाषण असतात. पण, बाबा मात्र त्यांचे विचार केवळ मांडत नाहीत तर जगतात. आम्हा दोन्ही भावंडांवर त्यांनी कधीच त्यांचे विचार लादले नाहीत. त्यांनी सतत आपल्या आचरणातून आम्हाला चांगल्या वाईटाची ओळख करून दिली. प्रेम, विश्वास आणि संस्कार यांची कधीही न संपणारी शिदोरी त्यांनी आमच्या हाती ठेवली. आमच्या बाबांना मी गंमतीनं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणते. खरच आहे. त्यांच्याशी कुठल्याही विषयावर गप्पा मारता येतात आणि त्यातून बरीच माहितीही मिळते. त्यांच्यासोबत प्रवास करताना एखाद्या ठिकाणचं ऐतिहासिक महत्त्वच नाही तर बाबा खवय्ये असल्यानं तिकडे खायला काय चांगलं मिळतं तेही ते सांगतात. एवढंच नाही तर बऱ्याच घरांमध्ये बाबांपेक्षा आई जवळची असते. पण, आमच्याकडे असं काहीच नाही. घरातल्या मोकळ्या वातावरणामुळे मी बरीच गुपितं बाबांना सांगते. बाबाही मित्रासारखे सर्व ऐकून त्यावर मस्करी करतात तर योग्य तिथे कानही पिळतात.
          आमचा चरितार्थ केवळ बाबांचे कार्यक्रम आणि पुस्तकांच्या लेखनावर चालतो. देव कृपेने कधी काही कमी पडलं नाही. पण बाबा सढळ हस्ते गरजूंना मदत करत आले आहेत. अधिकाधिक लोकांना पुस्तकं वाचायला मिळावीत म्हणून स्वतःची बरीच पुस्तकं ते सवलतीत उपलब्ध करतात. घरातील विविध खास प्रसंग किंवा स्वताःच्या तब्येतीच्या अडचणी काहीही असलं तरी बाबा कार्यक्रमांसाठी कसाही उलट सुलट प्रवास करून वेळेत मंचावर उपस्थित असतात. पूर्वी महाराष्ट्र आपल्या वाणीने चेतवणारे बाबा आता भारत भ्रमण करून तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम वाढवत आहेत. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये भाषण देणारे ते पहिलेच वक्ते आहेत. गतवर्षी थेट मॉरिशसला कार्यक्रमाचा योग आला तर यंदा दुबई दौरा होईल. एकतीस पुस्तकं आणि जवळपास २८०० हून अधिक कार्यक्रम एवढी मोठी घोडदौड करणाऱ्या बाबांमध्ये जराही अहं नाही. काश्मीरवरील त्यांच्या प्रबंधास युनेस्कोशी संलग्न असलेल्या आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे डॉक्टरेट बहाल करण्यात आली. यासाठी सलग वीस दिवस काश्मीरच्या कानाकोपऱ्यात बाबा पायी हिंडले. थेट अतिरेक्यांच्याही भेटी घेतल्या, विस्थापितांच्या शिबिरांमध्ये राहिले. महाराष्ट्र राज्यसेवा समिती आणि पद्मश्री मणीभाई मेहता प्रतिष्ठानचा समाजप्रबोधनासाठीचा “राष्ट्रसेवा पुरस्कार २००५”, क डों म पा चा “महापौर पुरस्कार २०१०”, पु. भा. भावे वक्तृत्व पुरस्कार २०१०, असे पुरस्कार पाहिले की बाबांच्या आत्तापर्यंतच्या कष्टाची कल्पना येते.
          असा हा “बाप” माणूस येत्या ९ नोव्हेंबरला वयाच्या ५१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यांना माझ्याकडून आणि देश विदेशातील असंख्य चाहत्यांकडून खूप शुभेच्छा. ( प्रत्यक्ष शुभेच्छा देण्यासाठी ९८९२३२१७०४ या क्रमांकावर संपर्क साधावा. )
-      वैदेही सच्चिदानंद शेवडे.
vaidehishevde@gmail.com

२ टिप्पण्या: