सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४

सदर लेख “संत साहित्य” विशेषांकात प्रकाशित झाला आहे.

विठ्ठलाचा छंद l वाचे गोविंद गोविंद ll
         
          पिवळ्या रंगाच्या, चकाकणाऱ्या कोणत्याही वस्तूला सोने म्हणता येत नाही. भट्टीतून तावून सुलाखून निघाले की मगच सोन्याच्या शुद्धतेची, त्याच्या उत्कृष्ठतेची ओळख होते. अशा सोन्यालाच आपण खरे सोने समजतो. अगदी तसेच आपल्या वडिलांनी अचानकपणे दुसऱ्याच्या घरात सोडल्यामुळे आलेला पोरकेपणा, अनाथ, उपेक्षित असे एका मोलकरणीचे आयुष्य वाटेला आलेली अशी ही जनाबाई.. कधी चोरीचा आळ तर कधी तिच्या विठूरायावरील श्रद्धेची समाजाने केलेली हेटाळणी किंवा एका स्वच्छ, सुंदर, पवित्र अशा चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे, जीवनातील अशा अनंत कटू प्रसंगांना संयमाने ती तोंड देत राहिली. जन्माने अतिशूद्र, त्यातून स्त्री, भरीस भर एकटेपणा आणि लोकांची सततची टीका, अश्या परिस्थितीत कोणताही सामान्य माणूस कोलमडेल. परंतु अत्यंत कठीण अथवा सचोटीच्या क्षणीही ती खंबीरपणे उभी राहिली. तिची विठ्ठलावरील भक्ती कधी तसूभरही कमी जास्त झाली नाही. मुखी सतत विठुरायाचे नाम घेत आपल्या भक्तीरसात न्हायलेल्या अभंगांमधून देवाच्या जवळ जाण्याचा नामसंकीर्तनासारखा सुलभ मार्ग सांगणाऱ्या संत जनाबाई या महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अस्सल बावनकशी सोनंच जणू.
          चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील सर्वात खालच्या वर्णातील, तत्कालीन अतिशूद्र समजल्या जाणाऱ्या समाजातील, गरीब घरातील एक लहानशी पोर.. आई वारल्यावर जेमतेम पाच सात वर्षांची असताना अचानक वडिलांनी तिला पंढरपुरी दामाशेटींकडे आणून सोडली. येथे तिच्या स्वतःच्या घरापेक्षा निश्चितच सुबत्ता होती. दामाजी आणि त्यांची बायको गोणाई दोहोंनी तिचे मनापासून स्वागत केले. त्यांच्या घरातले आणि घरातील प्रत्येकाच्या मनात जनाबाईचे स्वतःचे, हक्काचे असे स्थान होते. संत शिरोमणी नामदेवरायांची ही बालसखी. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, अशा अनेक संतांनी गौरवलेली संत जनाबाई. त्या विठू माऊलीची लाडकी भक्त. अशी अनेक मानाची पिसे तुऱ्यात असूनही नामदेवांच्या घरातील स्वतःची दासीची जागा तिने मनापासून जपली. वारकरी किंवा भागवत धर्माचा अंगीकार करणारे जात-पात मानत नाहीत. असे असूनही समाजाच्या चौकटीचे भान ठेऊन जनाबाई आचरण करीत. आज मराठी संत साहित्यात आवर्जून जनाबाईंचा उल्लेख शांत, मंद सुवासिक अशा जाईच्या वेलीचे रूपक वापरून केला जातो. तरीही आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत जनाबाई मात्र स्वतःचा उल्लेख ‘दासी जनी’ अथवा ‘नामयाची दासी जनी’ असाच करून समाधानी होत्या. आपल्या अभंगातून कित्येक वेळेस त्यांनी स्वतःला असे संबोधले असल्याचे दिसते.
“जनी म्हणे जोड झाली जोड विठोबाची l दासी नामयाची म्हणोनिया l”
          ज्याप्रमाणे नदी लांब अंतरावरील एखाद्या बिंदुपासून वाहत वाहत, सर्वांना तृप्त करीत सागराला येऊन मिळते तशीच लहानशी जनी मराठवाड्यातील एका छोट्याशा खेड्यातून ईश्वरी संकेतानुसार पंढरपुरी आली. नामदेवांसोबत राहून विठू सावळ्याची भक्ती करू लागली. स्वतःच अस्तित्व विसरली. या सागर सरितेच्या संगमाचा शेवट हा विश्वनियंत्या परमेश्वराच्या पायाशी विलीन होण्यात किंबहुन त्याच्याशी एकरूप होण्यात झाला नसता तरच नवल होते!
          दमा आणि कुरुंड हे गंगाखेड येथे गावाबाहेर राहणारे अतिशूद्र जातीतील एक दाम्पत्य. घरामध्ये अठरा विश्वे दारिद्र्य पण मनामध्ये विठोबाच्या भक्तीची श्रीमंती. दमा नित्यनेमाने वारीला जात असे. दररोज मिळेल ते काम करून दोघं आपला चरितार्थ चालवीत होते. मीठभाकरीमध्येही सुखी होते. आयुष्यात त्यांच्या दृष्टीने त्यांना एकंच मोठा सल होता. लग्न होऊनही कुरुन्डेची कूस उजवत नव्हती. एक दिवस त्या दोघांनी हे गाऱ्हाणे विठ्ठलासमोर मांडायचे ठरवले. दोघेही ठरल्याप्रमाणे वारीला निघाले. मुल व्हावे म्हणून विठोबाला साकडे घातले. आणि काय आश्चर्य.. विठू माऊलीने त्यांना दृष्टांत दिला! “तुमच्या कुळाचा उद्धार करणारी आणि माझा अंश असलेली कन्यारत्न तुमच्या पोटी येईल. माझा अखंड सहवास तिला लाभेल.” आणि खरंच काही काळाने कुरुन्डेला दिवस गेले. देवाच्या आशीर्वादाचे बीज तिच्या पोटी रुजले होते. त्यामुळे एक आगळेच तेज तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. दिवस भरत आल्यावर तिने एका गुटगुटीत कन्येला जन्म दिला. दमा आणि कुरुंड दोहोंच्या आनंदाला पारावर उरला नाही. जना असे तिचे नाव ठेवण्यात आले. परंतु, त्यासोबतच विठोबाचे शब्दही त्यांना पूर्ण लक्षात होते. त्यांच्या कुळाचा उद्धार करणारी अशी देवाच्या आशीर्वादाने झालेली लेक त्यांच्या कुशीत होती. पण तिचा सहवास त्यांना फारकाळ लाभणार नव्हता. तिला पंढरपुरात दामाशेटीकडे सोडण्याचा देवाचा आदेश त्यांना पाळावाच लागणार होता. पाच सात वर्ष त्यांच्या अंगणात ते पाखरू मनसोक्त  बागडले. दमा आणि कुरुंड दोहोंचा जीव त्यांच्या या लाडक्या लेकीत अडकला होता. तिच्या बाललीला त्यांना मोहात पाडत होत्या. पण तरीही लवकरच ती आपल्यापासून दूर होणार ही भावनाही त्यांना बोचत होती. त्यातच कसल्याशा आजाराचं निमित्त होऊन जनीची आई देवाघरी गेली. दमा या धक्क्याने खचला. एवढ्या लहान मुलीला आता आपण एकटे कसे सांभाळणार हा प्रश्न त्याला पडला. तेवढ्यात त्याला विठोबाचे शब्द पुन्हा आठवले. छोट्याशा जनीला दमाने, “काळ्या देवाला भेटायला जाऊया का?” असे विचारताच जनीने आनंदाने मान डोलावली. एवढंसं आपलं पोर..! आपल्याविना कसं राहू शकेल? दामाजींच्या घरी तिला कोण सांभाळेल? अशा हजार चिंतांनी जनीच्या बापाचे हृदय पोखरत होते पण जनी मात्र वेगळ्याच आनंदात होती. विठोबाच आता तिच्या आयुष्याचं चांगल वाईट पाहणार आहे; हे जणू तिला आधीच समजले होते. तिचा नामया तेथे तिची वाट पाहत होता. पुढे नामदेवांच्याच सानिध्यात राहून तिला तिचा विठू भेटणार होता. पण, जनीच्या आयुष्याच्या दोऱ्या विठोबाच्या हातात सोपवल्या असल्याने आपण निश्चिंत व्हावे हे एका बापाच्या मनाला नीटसे पटत नव्हते. इथे जनी मात्र आपल्या खऱ्या घरी जाण्यासाठी आतुर होती. मजल दरमजल करीत दमा आणि जनी दामाजींकडे पोहोचले. त्यांच्याकडे जनीला सोडून जड अंतःकरणाने दमाने निरोप घेतला. त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याची आणि जनीची भेट कधी झालीच नाही.
          लोकांच्या दृष्टीने जनी ही आई बापाने टाकलेली पोर होती. दामाजींच्या घरातील एक मोलकरीण होती. कुणाही सामान्य व्यक्तीला जनी अत्यंत एकटी, परावलंबी वाटेल. कुणालाही तिच्या या परिस्थितीवर कीव यावी. पण, जनी मात्र आपलं सर्वस्व विठोबाला समजू लागली. आई, वडील दुरावल्याचे दुःख कोणालाही होईल. जनीही यास अपवाद नाही. पण या यातना सहन करतानाही ती देवाला आळवते;
“माय गेली बाप मेला l आतां सांभाळी विठ्ठला ll
मी तुझे गा लेकरू l नको मजशी अव्हेरू ll
मतिमंद तुझी दासी l ठाव द्यावा पायापाशी ll
तुजविण सखे कोण l माझे करील संरक्षण ll
अंत किती पाहासी देवा l थोर श्रम झाला जीवा ll
सकल जीवाच्या जीवना l जनी म्हणे नारायणा ll”
          अत्यंत सध्या शब्दात पण आर्त विनवणी जनी करते. तिच्या शब्दाशब्दातून तिचे अंतर्मन उलगडत जाते. कधी देवाला ती माय बाप म्हणते तर कधी सखा मानते. कधी लहान मुलासारखा हट्ट करते तर कधी रुसून बसते. राग आला तर कधी “अरे विठ्या अरे अरे विठ्या l मूळ मायेच्या कारट्या ll” असे चार खडे बोलही सुनावते. विठुरायाच्या चरणांवर आपले आयुष्य वाहते. एवढेच नव्हे तर कोण कुठच्या टोकाच्या गावाहून आलेली ही पोर चंद्रभागेच्या तीरी उभे असलेल्या विठुरायावर अगदी सहजच आपला हक्क असल्याचे सांगते. पंढरपूर हे तिचे माहेर असून येथे आलेल्या प्रत्येकाला मोक्ष प्राप्त होतो असे ठामपणे सांगते.
“बाप रखुमाबाई वर l माझे निजाचे माहेर ll
ते हे जाणा पंढरपूर l जग मुक्तीचे माहेर ll
तेथे मुक्ती नाही म्हणे l जनी न पाहे त्याचे वदन ll”
          एखाद्या अशिक्षित, समाजाने मागास ठरवलेल्या वर्गातील, मोलकरीण असलेल्या स्त्रिला मोक्षाचे विचार करता यावे हे नवल नाही का! नामदेवांच्यासोबत राहून जनीला लहानपणी थोडीफार शब्द ओळख झाली. त्याकाळी महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी होते. तरीही नामदेवांने आग्रहाने जनीकडून अक्षरे गिरवून घेतली. ते कधी स्वतः तिचे अभंग लिहून काढत तर कधी जनाबाईच ते उतरवून ठेवत असत.  कोणतेच साचेबद्ध शिक्षण न घेताही जनाबाईंच्या अभंगात एक गोडवा जाणवतो. आज अभंगादी काव्य प्रकारांचे शालेय जीवनात पाठ शिकवले जातात. त्यातील रचना, विविध वृत्त यांचा अभ्यास केला जातो. शिक्षणाचा भाग असूनही अशा रचना आता सहसा कुणाला जमत नाहीत. असे रसाळ अभंग करणे हे वेड्या गबाळ्याचे काम नव्हे. तेथे एक अडाणी जना बोलता बोलता, अगदीच उत्स्फुर्तपणे अभंग रचत असे. तिची रोजची कामे, आजूबाजूच्या लोकांचा स्वभाव, विठोबावरील तिचे प्रेम असे अगदी साधारण विषय त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसतात.
          आज जवळपास प्रत्येक कामासाठी आपण विविध यंत्रांवर अवलंबून असतो. पूर्वीच्या काळी महिला वर्गाला ही सूट नव्हती. सडा सारवणे, निवड पाखडणे, जात्यावर दळणे, अशी असंख्य अंग मेहनतीची कामे जनी एकटीच मन लावून करीत असे. तिच्या कामाचा वेगही चांगला होता. कोणत्याही कामात चालढकलपणा नाही. भरपूर काम करूनही, एका क्षणाची विश्रांती न घेताही, ती सतत उत्साही असे. काय असेल या मागचे गुपित? सतत काम करण्याचा उत्साह कुठून येत असेल तिच्यामध्ये? यावर जनी म्हणते,
“झाडलोट करी जनी l केर भरी चक्रपाणि ll
पाटी घेउनी डोईवरी l नेऊनिया टाकी दुरी ll
ऐसा भक्तीसी भुलला l नीच कामे करू लागला ll
जनी म्हणे बा विठ्ठला l काय उतराई होऊ तुला ll”
          जनीच्या प्रत्येक कामात तिचा विठोबा तिची साथ देत असे. आपले प्रत्येक काम तोच करतो ही तिची दृढ श्रद्धा. आपण सामान्य माणसं.. त्यातून स्वतःला विज्ञाननिष्ठ अथवा बुद्धिप्रामाण्यवादी, अशी विशेषणं स्वतःच लावतो. अशा चष्म्यातून पाहिल्यास कुणाला हे सर्व एकटेपणात पिचलेल्या एका अबलेचे मानसिक खेळ वाटतील. पण हा चष्मा उतरवून स्वच्छ विचार केल्यास जनीचे विठूवरील प्रेम तिला कसे सबळ करते ते समजते. देव आपल्यावरील प्रेमाखातर आपली सगळी कामं वाटून घेत आहे, याचे जनीला कौतुक वाटते. आपल्यासाठी तो एवढी हलकी कामं करीत आहे या भावनेने सुखावणाऱ्या जनीला देवाचे उच्च स्थान लक्षात येते आणि तो केवळ आपल्यासाठी अशी कामं करीत आहे; त्यामुळे लोक त्याला नावं ठेवतील अशी अपराधीपणाची भावना तिच्या मनात येते. एवढा जगातील सर्व घटनांचा करता करवीता आज आपल्यासाठी कष्ट उपसत आहे, राबत आहे, या भावनेने सुखावत असतानाच जनीला आता या ऋणातून कसे मुक्त व्हावे? असा निष्पाप विचारही येतो. सोहम अथवा अद्वैताचे तत्त्व एकदा समजले की देव प्रत्येक कामात मदत कशी करतो हे कोडे अलगद उकलते. अगदी नेमक्या शब्दात हे तत्त्वही जनाबाई उलगडतात.
“जोड जाली रे शिवासी l भ्रांत फिटली रे जिवाची ll
आनंदची आनंदला l आनंद बोधची बोधला ll
एकपण जेथे पाही l तेथे विज्ञप्ति उरिली नाही ll
ऐसी सद्गुरूची करणी l दासी जनी विठ्ठल चरणी ll”
          भगवंत आणि भक्त दोन्ही एकच अथवा भक्त हा भगवंताशी एवढा एकरूप होतो की त्याच्यामध्ये आणि भगवंतामध्ये काही अंतरच राहत नाही. जेथे नर आणि नारायण दोन्ही एकमेकांमध्ये विलीन होतात त्यास ‘अद्वैत’ असे म्हणतात. भक्त आणि भगवंत हे दोन अथवा भिन्न असे मानले जाते ते ‘द्वैत’. तर दोन स्वतंत्र अस्तित्व नसलेले किंवा एकमेकांपासून भिन्न नसलेले ते ‘अद्वैत’. त्यामुळेच भक्त आणि भगवंताचे, आत्मा आणि परमात्म्याचे मिलन म्हणजे अद्वैत होय. जेव्हा मीठाची बाहुली समुद्रतळ शोधायला समुद्रात उडी घेऊ पाहील तेव्हा तिचे स्वतंत्र अस्तित्व राहू शकेल का? ती त्या पाण्यात पूर्णपणे विरघळून जाईल. तसेच स्वतःचा शोध घेताना, आपल्या अविनाशी आत्म्याचा ठाव घेताना, मी म्हणजे कोण? या प्रश्नापाशी येऊन अडकायला होते. तेव्हा त्या परब्रह्मरुपास आपण एकरूप झालो की “अहं ब्रह्मास्मि” हे मूळ सूत्र समजते. एकदा आपल्यातील देवत्वाची ओळख आपल्याला पटली की कुकर्मांपासून आपण सहज दूर होतो. मानवी देहाला या लौकिक जगातील ज्या दुःखांचे ओझे वाटते ते जीवा शिवाच्या मैत्रीने दूर होते. या अद्वैताच्या अथवा सोहम तत्त्वाच्या अंगिकारामुळे जनाबाईचे पोरकेपण दूर झाले. श्रमांमुळे देहाला होणारे कष्ट आणि मानसिक यातनाही तेथेच थंडावल्या. आपल्यासोबत सतत विठोबा आहे; आपले दोहोंचे अस्तित्व एकच आहे त्यामुळे तो आपल्याला प्रत्येक कामात साथ देतो हे जनाबाईंचे विचार यातून आपल्याला समजतात. जेथे लहानसहान कुरबूरी, हेवेदावे संपले तेथे आनंदची आनंद झाला असे त्या सांगतात. “देह भाव सर्व जाय l तेव्हा विदेही सुख होय ll” अशी त्यांची अवस्था होते. मी-तू पणाची बोळवण झाल्यावर आता देवाला आपण आपल्या हृदयात पक्के अडकविल्याचा जनाबाईंना साक्षात्कार होतो. त्याला आपल्यापासून कोणीच हिरावून नेऊ शकत नाही, असा दृढ विश्वास त्यांच्या मनी उत्पन्न होतो.
“धरिला पंढरीचा चोर l गळा बांधोनिया दोर ll
हृदय बंदिखाना केला l आत विठ्ठल कोंडला ll”
          एखाद्या द्वाड, अल्लड, बदमाश लेकरास आईने पकडून ठेवावे एवढ्या सहजतेने ती विठ्ठलाला हृदयात बंद केल्याचे सांगते. ती आणि तो एक याच भावनेतून तिच्या कामांमध्ये तिला मदत करण्यासाठी स्वतः चक्रपाणी आल्याचे तिला जाणवते. जनीला मदतीला कुणी माणूस येत असावा असे काही जणांना वाटते. तसे जरी मान्य केले तरी अडीनडीला आपल्यासाठी धावून आलेल्या प्रत्येकात आपल्याला ईश्वरच सापडत असतो हे विसरू नये.
       देवाच्या उपासनेचा आणि त्यायोगे मोक्ष मिळवण्याचा साधा सरळ मार्ग म्हणजे नामस्मरण. देवाचे नाव सतत मुखात असल्याने राग, लोभ, अविवेकी विचार, अशा सर्व दुर्गुणांचा निचरा होतो. शांत, समाधानी वृत्तीचा, सगुण रूपाचा आपल्यात शिरकाव होतो, असे त्या म्हणतात. “मूळ गेले हो क्रोधाचे l ठाणे केले विवेकाचे ll” असे त्या सहज सांगतात. जनाबाई आणि नामसंकीर्तन हे समीकरणच जगावेगळे वाटावे असे आहे. “मला लागो हाची धंदा l रामकृष्णहरिगोविंदा ll” अशी कामना त्या व्यक्त करतात. आपण जी कामं दररोज करतो त्याचा आपल्याला कधी ना कधी कंटाळा येत असतो. मग कामात चालढकल कळत नकळतपणे होत असते. परंतु, जनाबाई नामस्मरणात एवढ्या गुंग होत की त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना देवाचे अस्तित्व जाणवू लागले. मग कामातून पळवाट का शोधावीशी वाटेल कुणाला? एखाद्यावर जीव ओवाळून टाकणे किंवा समरस होऊन जाणे म्हणजे काय हे पुढील पंक्तींवरून सहज लक्षात येते.
“देव खाते देव पिते l देवावरी मी निजते ll
देव देते देव घेते l देवासवे व्यवहारीते ll
देव येथे देव तेथे l देवाविणे नाही रितें ll
जनी म्हणे विठाबाई l भरुनी उरलें अंतरबाही ll”
          आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक गोष्टीत, चराचरात जनीला देव सापडत होता. एका वेगळ्याच पातळीवरील अलौकीक प्रेम आणि विश्वासाची प्रचीती यातून होते. आपल्याला आई, वडील, भाऊ, बहिण, नवरा, बायको, आदी सर्व नात्यांमध्ये ती व्यक्ती सदेह रुपात दिसत असते. त्यांच्यावर आपले मनापासून प्रेम असते परंतु, “भरुनी उरले अंतरबाही” एवढे समर्पण प्रत्येकाला खरंच अनुभवता येते का? येथे तर जनी चारचौघांना न दिसणाऱ्या, केवळ तिच्या मनःचक्षूंसमोर असलेल्या एका प्रचंड विशाल शक्तीकडे अगदी सहज, डोळे मीटून स्वतःला सोपवीत आहे. हे कुणा सामान्याला जमणे केवळ अशक्य! म्हणूनच या कठीण अश्या भक्तिमार्गाचे वर्णन “भक्ती ते कठीण इंगळाची खायी l” असे ती करते.
          देवाला कधी आईच्या मायेने, लाडाने हाक मारणारी जनी, कधी आपल्या मित्राला हाक मारावी एवढ्या सहज त्याला मनातील गुज सांगणारी जनी, असे जनाबाईंचे अनेक रंग आपल्याला त्यांच्या अभंगातून दिसून येतात. पण सर्वात महत्त्वाचे आणि देवाला स्वतःपाशी कायमचे बांधून ठेवणारे जनीचे रूप म्हणजे तिच्या मनाची अत्यंत व्याकूळ अशी अवस्था. विठ्ठलाला मायबाप समजणारी जनी त्याच्या भेटीच्या ओढीने हट्ट करते. ती विठोबाचे आधी कौतुक करते.
“रूप सावळे सुंदर l कानी कुंडले मकराकारll
गळा वैजयंती माळा l तो हा मदनाचा पुतळा ll ”
          कौतुकाला विठू भुलला नाही तर लाडीगोडीने बोलाविते. “ये ग माझे विठाबाईl ” अशी हाक मारते. तरीही विठूराया आला नाही तर मात्र हिरमुसून जाते. आणि “का ग न येसी विठ्ठला l ऐसा कोण दोष मला ll” असे विचारते. कधीकधी मात्र या भौतिक जगात रमणे अशक्य होत असल्याने ती अजूनच कळकळीने हाक मारते.
“का गे निष्ठुर झालीसी l मुक्या बाळाते सांडिसी ll
तुज वाचोनिया माये l जीव माझा जावो पाहे ll
प्राण वारीयले कंठी l जनी म्हणे देई भेटी ll”
          अशा आर्त हाकेकडे कानाडोळा करणे देवाला जमणे कठीणच. लहान बाळ आपल्या आईला बोलावते आहे जणू तशी जनी विठोबाला आळविते. मग तो पंढरीचा राजा सगळी कामं बाजूला सारून जनीला भेट देत असे. तिला मायेने जवळ घेत असे. कुशीत घेऊन शांत करीत असे. मग जनी पुन्हा हसतमुखाने येईल त्या प्रसंगांना सामोरे जायला तयार होत असे. त्या भेटीमुळेच तिच्या अंगात अतिशय उत्साह आणि ताकद येत असे.
          जनाबाईंच्या अभंगातून केवळ त्यांचे विठू माऊली आणि नामदेवांप्रती असलेले प्रेमच व्यक्त होत नाही तर निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, चोखामेळा, आदी संतांविषयी तिच्या मनात असलेला आदरभावही व्यक्त होतो. वयाचे अंतर पाहता जनाबाई ज्ञानेश्वरांपेक्षा मोठ्या पण ज्ञानदेवांची आध्यात्मिक खोली, त्यांचा अभ्यास त्या जाणून होत्या. वेदशास्त्रांच्या अभ्यासातील चारही भावंडांची समज त्यांना माहिती होती. त्यांच्या अनेक अभंगातून ज्ञानेश्वरांविषयीचे त्यांचे प्रेम व्यक्त होते. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिशक्ती अशाप्रकारे जनाबाई या भावंडांचा उल्लेख करतात.  
“सदाशिवाचा अवतार l स्वामी निवृत्ती दातार ll
महाविष्णूचा अवतार l सखा माझा ज्ञानेश्वर ll
ब्रह्मा सोपान जाला l भक्ता आनंद वर्तला ll
आदि शक्ति मुक्ताबाई l दासी जनी लागे पायी ll”
          जेमतेम अक्षर ओळख असलेल्या, घरकाम करणाऱ्या, चाकोरीबद्ध आयुष्य जगणाऱ्या जनाबाईंचे हटयोग, इडा, पिंगळा, सुषुम्ना, अश्या कुंडलिनी जागृत करणाऱ्या ब्रह्मनाड्यांवरील ज्ञानही चकित करणारे असेच होते. भल्या भल्यांना कित्येक वर्ष साधना करूनही यातील बोध होत नाही. पण या विश्वाचा कारभार सांभाळणाराच तिचा सखा होता. त्यामुळे तिला कोणी काही न शिकवताही आपोआपच हे ज्ञान मिळत होते. “रक्त वर्ण त्रिकूटस्थान l श्री हाट पाहे श्वेतवर्ण ll” ही हटयोगावरील त्यांची रचना थक्क करणारी आहे. शुद्ध पण साध्या भाषेत त्यांनी यात हटयोग उलगडून दाखवला आहे. त्यांच्या आध्यात्मिक अभ्यासाबाबत, उत्स्फूर्त अभंगांच्या कौशल्याबाबत त्या “बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुरायापाशी ” असे एवढेच नम्रपणे म्हणत.
          एवढे विविध विषयांवरील ज्ञान एकवटले असलेल्या जनाबाई कधी जात्यावरच्या ओव्याही रचत असत. “दळीता कांडिता l तुज गाईन अनंतll” असे त्यांच्या मुखातून सहज येत असे. जात्याचे आणि त्यातून दळून बाहेर पडणाऱ्या पीठाचे रूपक योजून त्या “प्रपंच दळण दळीले पीठ भरिले l सत्त्वाचे आधण ठेविले पुण्य वैरिले l पाप ते उतू गेले l” असे गात असत. तर घरातील लहान मुल रडत असताना त्याला कडेवर घेऊन मायेने “माझे अचडे बचडे l छकुडे गे राधेचे रुपडे l” असे लाड करीत जोजवत असत. अशुद्ध भाषेत बोबडे बोल बोलणारी, आई, वडिलांविना पोरकी झालेली, नामयाची दासी जनी, ते कथाकीर्तन करून तत्कालिन पुरुष संतांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेली ‘संत जनाबाई’ हा प्रवास कोणालाही अचंबित करणारा असाच आहे. नामदेवांच्या घरी काम करणारी एक मोलकरीण विठोबाची लाडकी सखी झाली. नामदेवांच्या सहवासात, विठुरायाच्या कृपेने तिला दिव्य ज्ञान प्राप्त झाले. आज जनाबाईंचे सुमारे साडे तीनशे अभंग उपलब्ध आहेत. याशिवाय थालीपाक आख्यान, कृष्णजन्म, बालक्रीडा, काला, अशी अनेक आख्यान काव्यांची निर्मितीही त्यांनी केली. पाळणा, नवलकाव्य, कूट, विविध संतांच्या आयुष्यातील प्रसंग, दशावतार, असे विविध विषय त्यांनी काव्यातून हाताळले. असे असले तरीही अन्य संतांपेक्षा जनाबाईंचे साहित्य अत्यल्प उपलब्ध आहे. परंतु, त्यांच्या प्रत्येक रचनेतून त्यांची आध्यात्मिक, वैचारिक बैठक, प्रगल्भ प्रतिभा सतत जाणवते. नामदेवांच्या चरित्रातून आपणास जनाबाईंची ओळख होते. त्यांच्या अभंगादी काव्यांमधून त्यांचे अंतरंग उलगडत जाते. त्यांचे स्वतंत्र चरित्र सांगणारे साहित्य अत्यल्प आहे; हे दुर्दैवच मानावे लागेल. तरीही त्यांच्या अभंगाच्या वेलीवरील फुले टिपत, त्यातील मंद मंद गंध आणि मधुकणांची मेजवानी आपल्याला चाखता यावी यासाठी हा केलेली ही धडपड..!

-      वैदेही सच्चिदानंद शेवडे.

शुक्रवार, २३ मे, २०१४

Pamper Yourself

          बापरे..! साडे पाच वाजले! झोप लागतेच कुठे पहाटे चार वाजेपर्यंत? जेमतेम तासाभरात उठून, आवरून ६ वाजताच घरातून बाहेर पडायचं. मग पुढे लोकलवारी. दादरपर्यंत उभ्यानेच जा. एवढ्या सकाळीही क्वचितच फोर्थ सीट मिळते बसायला. त्यात पण काही बायका अशा काही पसरून बसतात की जागा असूनही आपल्याला बसता येत नाही. दादर ते अंधेरी जागा मिळते पण मग अंधेरी येईपर्यंत झोप येऊ लागते. मग तसेच पेंगुळले डोळे घेऊन कामाची सुरुवात करा. दररोज वाढणारा कामाचा व्याप, कामासोबतच मास्टर्सचा अभ्यास, रोज हा चार तासांचा ट्रेनचा प्रवास आणि घरी आले की घरातूनही करावी लागणारी काही लहानसहान कामे आणि घरात आणि बाहेर सतत होणाऱ्या लहानसहान कुरबुरी! विचार करूनच वैताग आला. वाटलं, घेऊया सुट्टी. जायचंच नाही कामावर. मस्त ताणून देऊ. खूप वेळ झोपू. मग लक्षात आलं की कालही आपल्याला उठल्या उठल्या असेच विचार मनात आले होते आणि परवाही.. कदाचित त्या आधीदेखील! तेवढ्यात आईचा आवाज आला, “आज जायचं आहे की नाही? रात्रभर जागते त्यामुळे माझी झोपमोड होते. पुन्हा सकाळी तुला उठवायचं आणि डबा करून द्यायचा म्हणून एवढ्या लवकर उठावं लागतं. एवढी मोठी झाली तरी स्वतःला गजर लावून उठता येत नाही! उठवायला, डबा करून द्यायला, सगळं सामान घेतलं ना याची आठवण करून द्यायला अजून आई लागते. लग्न झालं की कसं होणार देव जाणे..” आता मात्र झोपायची इच्छा झाली तरी झोप मिळणार नाही हे समजलं आणि नाईलाजाने मी उठले. कामावर पोहोचायला उशीर तर झालाच पण नेहमीची ट्रेन हुकली त्यामुळे अचाट गर्दीचा सामना करायला लागला. आधीच उठल्यापासून काही चांगले विचार मनात येत नव्हते त्यातून ट्रेनची गर्दी, प्रचंड उकाडा आणि कोणत्याही कारणांवरून भांडणाऱ्या बायकांचा आवाज ऐकून माझ्या निरुत्साही, वैतागलेल्या विचारांना खतपाणीच मिळालं.

          रोजच्यासारखी कामं चालू होती. आज मात्र त्यात काहीतरी यांत्रिकता आल्यासारखं वाटत राहिलं. रोज रोज तेच ते.. काहीच नवीन नाही. आजकाल तर सोमवार का येतो? असंच वाटतं आणि मंगळवारपासूनच शनिवार – रविवारच्या हक्काच्या सुट्टीचे वेध लागतात. तेवढ्यात मैत्रिणीने विचारलं, “सुट्टीचा काय प्लान आहे?” “सुट्टी? आज तर गुरुवार आहे. कसली सुट्टी?” मग लक्षात आलं की धुळवडीची सुट्टी आणि शनिवार, रविवार असे लागून आले आहेत. सुट्टी.. हेच तर हवं होतं आपल्याला. मग तरीही आनंद का नाही झाला? मी माझ्याच विचारात.. आणि इथे माझ्या मैत्रिणीचे ३ दिवसांचे काय काय प्लान आहेत याची वर्णन चालू होती. ती कुठेतरी बाहेर जाणार आहे एवढंच समजलं मला आणि आपण किती दिवसात बाहेर गेलोच नाही फिरायला हे आठवलं. एकूणच उदासीनतेचा पारा ‘वाढता वाढता वाढे’ असाच होत होता. संध्याकाळपासूनच मुंबईमध्ये ठिकठिकाणी लोकांच्या अंगावर फुगे मारा. उगीच घराखालून किंवा समोरून जाणाऱ्या माणसांच्या अंगावर रंग उडवा असले प्रताप सुरु होतात. त्यामुळे आज सगळ्या महिला वर्गाला कामावरून लवकर निघता येणार होतं. घरी जाऊन खूप झोपूया असा विचार मनात डोकावला. इतक्यात आईचा फोन आला. “भरून ठेवलेला डबा साधा पर्समध्ये घालायला पण लक्षात राहत नाही? तरीही मी अगदी तुझ्या पर्स जवळच ठेवते तो. आज जाताना विचारलं नाही ना सगळं ठेवलं आहेस ना सोबत? तर लग्गेच विसरलीस! आता काहीतरी खाऊन घे बाहेरच. आणि वेळेवर खाऊन घे. तशीच उपाशी राहू नको. जागरण झालंय आणि त्यात अजून उपास नको. गेल्यावेळेस ट्रेनमध्ये चक्कर आली होती, आठवतंय ना? जीवाला घोर उगीच आमच्या..” उफ्फ..!!! मला लहानपणापासून भूक सहन होत नाही. भुकेच्या वेळेस कोणी माझ्या भल्याचही सांगत असेल तरीही माझ्यापाशी ते ऐकण्याचा संयम नसतो. त्यात सकाळीच मातोश्रींनी आमच्या नावाने भूपाळी आरवली होती आणि आताही तेच. त्यातून पोटात कावळे ओरडत होते. मी काहीही विचार न करता आई बोलत असतानाच फोन बंद करून टाकला. खरंच, एवढी साधी एक गोष्ट आपल्या लक्षात राहू नये? बरीच कामं आपण अशीच नंतर करू म्हणून ढकलतो आणि विसरूनही जातो. आवडत्या ठिकाणी, आपल्याला आवडणार काम करत आहोत पण त्यातही उत्साह नाही. वैताग आला आहे सगळ्याचाच. कशीबशी कामं आटोपली आणि ४ वाजताच मी निघाले. आता भूकही लागली होतीच आणि आई आपल्याच काळजीपोटी आपल्याला बोलत होती याची जाणीवही तीव्र झाली होती. स्वतःवरचाच राग आपण आईचा फोन कट करून तिच्यावर काढला या भावनेने शरम वाटली. पण स्वभाव असा अडेलतट्टू की घरी जाऊन माफी मागू असंदेखील मन ऐकत नव्हतं.

          मी सरळ एकटीच मरीन ड्राईव्हला गेले. का? माहित नाही.. पण घरी जाण्याची इच्छा नव्हती. हे ठिकाण माझ्या खूप आवडीचं. कॉलेजमध्ये असताना तर दर काही दिवसांनी इथे दौरा ठरलेला. आता एकटीलाच त्या गोष्टी आठवत होत्या. शेवटची कधी आले होते मी इथे? धन्याचं लग्न ठरलं तेव्हा सगळे भेटलो होतो वाटत. अरेच्या! म्हणजे जवळपास वर्ष होत आलं. इथून घरी परत जात असताना सीएसटीहून आरामात बसायला जागा मिळते तेव्हा मी वाचत असे.माझ्या बॅगेमध्ये नेहमीच एखादं पुस्तक असे. फावल्या वेळेत वाचायचं किंवा भरपूर गाणी ऐकायची हा माझा आवडता कार्यक्रम. इतक्यात कोणतच पुस्तक नाही वाचलं की नवीन गाणीही माहित नाहीत. जुनी गाणीही ऐकून बराच वेळ झाला. काय होतंय हे सगळं? मीच आता मला अनोळखी वाटू लागले. आजूबाजूच्या अपरिचीत जगाचाच एक भाग असल्यागत मी स्वतःकडे पाहू लागले. मी वैतागून डोकं हलवलं. मार्च महिना, त्यात मुंबईचा उकाडा.. सूर्य निरोप घेत होता पण अजूनही गरम वाफा येत होत्या. त्यात सकाळपासून घराबाहेर.. जरा बरं वाटावं म्हणून मी पर्समधून वेट टीश्यू काढला आणि चेहरा खसाखसा पुसला. धूळ निघाली चेहऱ्यावरची... पण, या स्पर्धेच्या युगात तग धरून राहण्यासाठी रोज जी वेगवेगळी पुटं आपण चढवतो त्यांचं काय? ती अशी खसाखसा पुसून निघणारच होती जणू! चेहरा पुसल्यावर सवयीप्रमाणे आरसा हातात घेतला.  पण आज कसं कोणास ठाऊक पण आरश्यात स्वतःला बघून गुलजार साहेबांच्या ओळी आठवल्या. “हम नहीं थे आइनेमे, बाकी तीनों थे.. एक नोकर, एक रुतबा, एक वर्दी थी..” मला माझ्याच विचारांचा उबग येऊ लागला होता. तेवढ्यात एक मोठी लाट आली आणि तिने हलकेच काही शिंतोडे माझ्या तोंडावर उडवले. मी लगेच चेहरा पुसण्यासाठी हातात रुमाल घेतला. पुन्हा तेच.. समुद्राचं खारं वारं आणि पाणी पुन्हा माझ्या गालांवर आलं. ते पुसायला गेले पण, हात तसाच थांबला. आता मलाच माझं अनोळखी होण्याचं कोडं उलगडू लागलं. इथे तासंतास मी अशीच खारं वारं आणि पाणी अंगावर घेत बसायचे. आताही तेच हवंय मला खरंतर. लहान मुलाला भूक लागली तरी समजत नाही आणि ते ते चिडचीड करतं. मग आईलाच ते समजतं आणि ती त्याला लाडीगोडीने भरवते, तसंच मलाही नेमकं काय होतंय हे मला कळत नव्हतं. पण, ते समजलं ते या वारा आणि पाण्याच्या स्पर्शाने. स्वतःवरच रुसलेल्या या बाळाच्या गालांना स्पर्श करून ते पाणी गुदगुल्या करत होतं. दिवसभर उन्हात वणवण केलेल्या जीवाला फुंकर घालून वारा शांत करू पाहत होता. आता अचानक मला हवेत जरा प्रसन्न शीतलता आल्यासारखी वाटली. मी उभी राहिले. त्या कट्ट्यावरून चालू लागले. गच्च वर बांधलेले माझे लांब केस सोडले. वाऱ्यावर त्यांना मनसोक्त उडू दिलं. भरभरून तो खारा वारा आत साठवून घेतला. हेडफोन्स काढून मोबाईलवर माझी आवडती गाणी ऐकली. एक वेगळाच आनंद होत होता. तेवढ्यात घड्याळाकडे लक्ष गेलं. निघायला हवं. फोर्ट फेरीने सीएसटी स्टेशन गाठलं.

          मोबईलची बॅटरी उतरली होती. आईने अजून काळजी करू नये म्हणून तिला फोन करून दीड तासात पोहोचते असं कळवलं. फोन ठेवताना तिला जेवायला काही करू नकोस असंही सांगितलं. ट्रेन सुरु झाली. आता तासाभराने उतरायचं. हल्ली ट्रेनमध्ये बसायला पुरेशी जागा मिळाली की मला लगेच झोप लागते. आज मात्र तसं नाही झालं. एक उत्साह संचारला होता. माझ्या शेजारी एक बाई दोन लहान मुलांना घेऊन बसली होती. तिच्या मांडीत जेमतेम ६ महिन्यांचं तान्हुलं होतं तर पुढ्यात ४ वर्षांचं. त्या छोटुला मी माझी खिडकीची जागा दिली. ट्रेन सुरु झाली. छोटूसोबत गप्पा रंगल्या. त्याला गोष्टी सांगितल्या. थोड्या वेळाने त्याला भूक लागली तेव्हा तो आईपाशी भुणभुण करू लागला. तिला दोघांना सांभाळणं कठीण जात होतं मग मी लगेच तान्हुल्याचा ताबा घेतला. अगदी माझं स्टेशन येईपर्यंत ते माझ्या मांडीत होतं. जाताना त्याच्या आईने दोनदोनदा माझे आभार मानले. तेव्हा अवघडल्यासारखंच झालं. तिची मदत म्हणून मी कुठे काही केलं होतं? माझी आवड म्हणून केलं आणि त्या दोन्ही पिल्लांनी मला अजूनच उत्साह दिला. हे तिला कसं समजवू शकले असते मी?

          आईला माझे मोकळे केस आवडत नाहीत, वेणी आवडते. त्यामुळे ट्रेनमध्ये बसल्यावर मी वेणी घातली होती. ती पाहून मी घरी आल्यावर आईच्या चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह उमटलं. पण सकाळपासून वैतागलेल्या मला आल्याआल्या प्रश्न विचारायला नको म्हणून ती काहीच बोलली नाही. अंघोळ करून मी बाहेर आले आणि स्वयंपाक घरात शिरले. थोड्या वेळाने आईला खिचडी तयार आहे असं सांगितलं. आईला खिचडी जेवढी आवडते तेवढीच मला नकोशी असते. लहानपणापासून तोंड वाकडं न करता मी कधी खिचडी खाल्ली नाही. आज मी स्वतः गाणी गुणगुणत खिचडी केली त्यामुळे आता मात्र आईला राहवलं नाही. “आज हे काय आक्रीत?” असं तिने पानं घेताना विचारलंच. मी हसले आणि आईसाठी आठवणीने आणलेली तिची आवडती चाफ्याची फुलं तिच्या हातात दिली. “जास्त चिडले ना उगीच.. चुकले गं.” असं म्हणाले. आई मनापासून हसली पण लिंबाच्या लोणच्याची बरणी काढता काढता तिने, “आत्ता म्हणालीस ठीक आहे. पण उद्यापासून पुन्हा सगळं असंच असणारे हे माहित आहे मला.” असा टोला लगावलाच. मग दोघी मायलेकींनी वाफाळत्या खिचडीवर ताव मारला. मातोश्री आज उगीच कौतुक करीत खिचडी खात होत्या. मग मला ती आवड नसूनही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कौतुक यामुळे दोन घास जास्तच गेले. रात्री आईने डोक्याला तेल लाऊन दिलं  आणि मग पाउलो कोएल्लोचं पुस्तक वाचता वाचता मला कधीतरी झोप लागली.

          सकाळी कोणीही न उठवता आणि सुट्टी असून लवकर जाग आली. मी लगेच घराबाहेर पडले. रंग विकत घेतले आणि गल्लीतल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना जागं करून घरी जाऊन रंग लावला. बऱ्याच दिवसांनी सगळ्यांना भेटले. त्यांनीही गेली अनेक वर्ष रंग खेळले नसल्याचं आणि माझं असं अचानक घरी येऊन सरप्राईज करण्याने त्यांना छान वाटल्याचं कबुल केलं. मग सगळे तसेच रंगलेले चेहरे घेऊन आमच्या घरी आले. आमच्या मातोश्रींना सगळ्याच गोष्टी आधीच कश्या कळतात देव जाणे! तिने सगळ्यांसाठी दडपे पोहे करून ठेवले होते. गप्पा आणि पोहे यांचा पोटभर आस्वाद घेऊन सगळे निघाले. मीपण मस्त अंघोळ केली, एक चित्रपट पहिला आणि झोपी गेले. रविवारचा दिवसही आईसोबत शॉपिंग करण्यात आणि गप्पा मारण्यात घालवला. संध्याकाळ झाली आणि विचार आला की संपली सुट्टी. आता उद्या पुन्हा सगळं आधीसारखं. अभ्यासाची टिपण काढलेली डायरी मला दिसली आणि पुन्हा एकदा चिंतेची हलकीशी लकेर चेहऱ्यावर उमटली. नोकरीसोबत शिक्षण पूर्ण करणं खरंच जमणार आहे ना मला? डायरीखालची फाईल मी हातात घेतली. त्यात माझी शाळा, कॉलेजमधली आणि विद्यापीठात प्रथम  आल्याची वगैरे बरीच प्रमाणपत्रकं होती. ती पहिली. तेव्हाही परिस्थिती फारशी अनुकूल नव्हती हे आठवलं. तेव्हाही भीती वाटत होती पण जमवलंच की आपण! असा विचार आला आणि हुरूप आला. “हो, मी हे करणारंच!” असं स्वतःलाच मी बजावलं. आता कसलाच ताण जाणवत नव्हता. मग पुस्तक वाचायला घेतलं. रात्री झोपण्याआधी आठवणीने आठवणीने मी ते पर्समध्ये ठेवलं. 

          घड्याळाचा गजर लावताना आईने, “सुट्टी संपली. तेव्हा उद्या सकाळपासून वैताग आणि चिडणं सुरु ना?” विचारलं आणि दोघी हसत सुटलो. आता एक गोष्ट मला पक्की समजली होती. मोबाईलची बॅटरी जास्त डाऊन झाली की तो बंद करून आपण चार्ज करतो. तसंच, आपल्याला स्वतःची गणितं चुकत आहेत, काहीच बरोबर होत नाही आहे असं वाटायला लागलं की एक लहानसा ब्रेक घ्या. स्वतःला आवडत ते करा. स्वतःचेच लाड करा. कौतुक करा आणि मग बघा पुढच्या आव्हानांसाठी पुन्हा नव्या उमेदीने आपण कसे उभे राहतो!

-     वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.

सोमवार, २० जानेवारी, २०१४



भेटी लागी जिवा लागलीसे आस..!

          
          मनी वसे ते स्वप्नी दिसे असे लहानपणापासून ऐकले आहे. खरंच आहे की.. आपण सतत ज्या गोष्टीचा विचार करत असतो आपल्याला तेच दिसत असत. कधीकधी ही जिद्द एवढी शिगेला पोहोचते की अगदी जळी स्थळी काष्ठी पाषाणी आपल्याला तेवढेच दिसू लागते. त्याच गोष्टीचा विचार आपण सतत करू लागतो. निरंतर असा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याने आपोआप आपल्या आजूबाजूची परिस्थितीही आपली मनीषा पूर्ण करण्यासाठी अनुकूल होते. हळूहळू आपण आपल्या ध्येयाच्या अधिकाधिक जवळ पोहोचतो आणि अंतिमतः आपणास निश्चितच ती गोष्ट प्राप्त होते.
          कधीकधी मनाची एक विचित्र अवस्था होते. जवळ सगळंच असूनही एक पोकळी जाणवते. शांतपणे विचार केला की मनातील एक इच्छा तीव्रपणे जाणवते. देवाचं अस्तित्व ठायी ठायी जाणवतं खरं पण तरीही त्याचे सगुण, सदेह रूपातील दर्शन व्हावे असे राहून राहून वाटते. वाडी, पंढरपुर, द्वारका, सोमनाथ, अशा अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला प्रत्येकवेळेस त्या मायबापाला डोळ्यात साठवताना तो उत्साह असा ओसंडून वाहत असतो की डोळ्यातून ते चैतन्य पाझरू लागते. विश्वाचा धनी तो.. माझ्या इवल्याशा डोळ्यात कसा साठणार! ओसंडून वाहणार हे स्वाभाविकच! काही वर्षांपूर्वी एक कानडी भजन ऐकलं होत. “कृष्णानी बेगने बारो.. बेगने बारो मुखवन्नी तोरो..” कानडी समजत नसल्याने पूर्ण अर्थबोध होत नव्हता पण तरीही ते ऐकताना वेगळाच सुख मिळत होतं. शेवटी त्याचा अर्थ शोधून काढला. “हे कृष्ण, तू त्वरित ये.. त्वरित येऊन तुझ्या मुखाचे दर्शन होऊ दे.” भाव समजायला भाषा समजणं गरजेचंच आहे असं नाही असा प्रत्यय आला.
          श्री गजानन महाराजांवरील पोथीचे पठण करत असता बाळापुरच्या बाळकृष्ण नावाच्या सद्गृहस्थांची एक कथा समजली. बाळकृष्ण मोठे समर्थ भक्त होते. नित्यनेमाने सज्जनगडावर जात असत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना एक वर्ष त्यांचा नेम चुकणार असे वाटत होते. पण बाळकृष्णांची एवढी अगाध श्रद्धा की स्वतः गजानन महाराज त्यांच्या घरी वेष बदलून गेले आणि त्यांना समर्थांच्या रूपात दर्शनही दिले. कथा वाचून झाली आणि मी विस्मयाने महाराजांच्या प्रतिमेकडे पाहू लागले. आपण किती क्षुल्लक आहोत आणि आपल्या मनात त्या विश्वनियन्त्याला भेटण्याची तळमळ एवढी शिगेला कधी पोहोचेल? कधी आपण त्यांचे दर्शन घेऊ शकू? असे विचार येऊ लागले. रात्री झोपताना परत मनाला समजावले. आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती, घटना यातून देव आपल्याला भेटतच असतो. बरेचदा त्या दैवी अंशाची आपल्याला जाणीव होते.. केवढी भाग्याची आहे ही गोष्ट! पण तरीही याची देही याची डोळा पाहण्याची इच्छा काही मनातून जाईना. आजही बरेचदा असं अंतरद्वंद्व चालूच असत. अशा वेळेस किवा मनात निराशा निर्माण करणारे विचार आले की सरळ देवाचा धावा करते. थोडंसं रडू येत पण आपल्या पाठीशी “तो” भक्कम उभा आहे या जाणीवेने निश्चिंत होते. परिस्थिती बदलेल, प्रश्न सुटतील, तो दर्शन देईल असं वाटतं आणि मन शांत शांत होतं.
          २ वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील प्रवरा नदी काठी असलेल्या देवगड या दत्तगुरूंच्या स्थानी जाण्याचा अचानक योग आला. संध्याकाळी आम्ही तेथे पोहोचलो. थंडीचे दिवस असल्याने आल्हाददायक असा गारवा हवेत जाणवत होता. आरतीची वेळ झाली होती. त्या आधी आमचे दर्शन झाले. आम्हाला पुढे मुम्बईमध्ये लवकर पोहोचणे आवश्यक होते त्यामुळे आरतीला थांबणे शक्य नव्हते. पण माझे मन काही तयार होईना. मी शेवटी सांगितलं, “मुख्यद्वारातून बाहेर येण्याआधी आरती सुरु झाली तर मी थांबणार. आरती सोडून कधीही जाऊ नये.” सगळे पटापट पाय उचलू लागले. मीदेखील पुढे अडचण नको म्हणून त्यांच्यासोबत चालू लागले. तरीही मनात हुरहूर लागली होतीच. कान आरतीच्या आवाजासाठी उत्सुक होते. मुख्यद्वार अवघ्या चार पावलांवर असताना शंखनाद झाला आणि आरतीला सुरुवात झाली. गुरुदेवांनी माझी इच्छा पूर्ण केली. क्षणात गहिवरून आलं. माझ्यासोबत आमचे एक सर आणि आणि काहीजण थांबले. मंदिरात आणि आमच्यात अंतर बरंच होत पण तिथून अस्पष्ट का होईना थेट दर्शन होत होतं. दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर अनेक दिवे तेवत होते. गाभारा उजळून निघाला होता. आम्ही सर्व तल्लीन होऊन हे पाहत होतो. अचानक मी माझ्या सरांकडे वळले आणि जाणवलं की तेही माझ्याकडे पाहत आहेत. आम्ही एकमेकांना "काही दिसलं का?” असा प्रश्न विचारला आणि एकच प्रश्न आमच्या मुखातून कसा आला म्हणून अजून अचंबित झालो. सर म्हणाले, “मला मगापासून इथे दत्तगुरूंच्या मूर्तीऐवजी राम – लक्ष्मण – सीता दिसत आहेत. पहा जरा.” मी पाहिलं तर खरंच मला आता तसच दिसू लागलं. काही वेळ गेला आणि सरांनी मला काय दिसत होतं? ते विचारलं. मी म्हणाले, “मला बाप्पा दिसतोय. तुम्ही म्हणालात तेव्हा रामानेही दर्शन दिले. ” थोड्यावेळाने सर पुन्हा चकित झाले.. “अरेच्या खरंच! आता गणपती बाप्पाचं दर्शन होतंय.” ब्रह्मा, विष्णू, महेशाचे दर्शन होता होता आता सर्वच देवतांचे होऊ लागले. आरती झाली. दत्तगुरू हे माझं श्रद्धास्थान आहेच पण मी बाप्पालाही मनोभावे पुजते. दत्तगुरूंच्या या पावन स्थळी जाण्याचा योग आला म्हणून मन सुखावले होते पण एकाच ठिकाणी अन्य इष्ट देवतांचेही दर्शन गुरुदेवांनी घडवले या विचाराने मनोमन तृप्त झाले.

          अनेकदा असे अनुभव आपल्याला येत असतात किंवा नकळत कुणीतरी आपली अडचण न सांगताही समजून घेत असत, सोडवत असत, अचानक, अनपेक्षित घटना घडत असतात ज्यांमुळे एखादी कठीण गोष्ट सुकर होते. अशा प्रत्येक वेळेस मी हात जोडते आणि त्या त्या वेळेस देवाने पुन्हा एकदा प्रत्यय दिला हे जाणवत. लहानपणी बाबांनी एक भजन शिकवलं होत. त्यात “लोग कहते है भगवान आते नाही.. रुक्मनीकी तरह हम बुलाते नहीं.. द्रोपदिकी तरह धुन लगाते चलो..” अशा पंक्ती आहेत. खरंच.. तेवढी तळमळ कदाचित अजून उत्पन्न झालीच नाही. म्हणून आपण सामान्य आहोत असं जाणवत. पण त्याच भजनात पुढे आहे की, “वक्त आएगा ऐसा कभी ना कभी.. हमभी पायेंगे प्रभुको कभी ना कभी.. ऐसा विश्वास दिलमे जगाते चलो.. कृष्ण गोविन्द गोपाल गाते चलो..” एवढीच एक इच्छा मनात ठेऊन दर दिवशी नारायणाचे नाव घेते. तुम्हीही नाव घेत रहा. तो भेटेलच. तूर्तास राम राम.
- वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे. 

बुधवार, ७ ऑगस्ट, २०१३

तो आणि ती
          
          एका सोशल नेटवर्कींग साईटवरच्या ग्रुपमधून त्यांची ओळख झाली. पुढे त्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. एकमेकांपासून दूर असूनही, एकमेकांना न भेटूनही केवळ फोनवर आवाज ऐकून ते एकमेकांच्या मनातलं समजू लागले. आता तो आणि ती यांचं सूत जुळलं आणि त्याचं लग्न झालं एवढीही टिपिकल स्टोरी नाही आपली. तर हे तो आणि ती मैत्री होऊनही ४ वर्ष एकमेकांना कधी ते भेटूच शकले नाहीत. फोन, फेसबुक, व्हॉटस् अॅप यामुळे कधी भेटीची उणीवही भासली नाही.
          ती गोरीपान अशी मुंबईकडची तर हा काळासावळा नगरचा गडी. कोणीही पाहताच क्षणी प्रेमात पाडावं अशी ती.. तर मोकळ्या, प्रामाणिक मतांवर कोणतीही मुलगी फिदा होईल असा तो. दोघांनी एकमेकांना अनेकवेळा सुखदुःखात साथ दिली. अगदी त्यांच्या प्रियकर-प्रेयासीलाही त्यांची ही वेडी मैत्री चांगलीच माहिती आहे. आता तिचं प्रियकरासोबत लग्न ठरलं आहे. त्याचंही ठरेलच इतक्यात. काही कामनिमित्त त्याला मुंबईला येण्याची आणि तिला भेटण्याची संधी मिळाली म्हणून दोघेही खुशीत आहेत.
          त्याला स्टेशनवरून तिने थेट मरीन ड्राईव्हला नेलं. समुद्राकडे कितीतरी वेळ तो एकटक पाहत होता. भेटल्यावर तो एवढा गप्प का? तिला अवघडल्यासारखं झालं. त्याच्याही ते लक्षात आलं. उगीच काहीतरी बोलावं म्हणून त्याने विचारलं, “सकाळी असा मेसेज का केलास? ये लम्हा फिलहाल जी लेने दे? आणि व्हॉटस् अॅपवर स्टेटसही असंच आहे तुझं. काही झालंय का?” “नाही रे.. ते गाणं ऐकत होते एवढंच.” तिचं उत्तर. तिने इकडचे तिकडचे विषय काढून त्याला बोलतं करायचा प्रयत्न केला. पण, तो अगदीच शांत होता. पहिल्यांदाच भेटलो आहोत म्हणून असेल कदाचित.. तिने विचार केला. थोड्यावेळाने मात्र तो थेट मुद्द्यावर आला. “आता तुझं लग्न होईल मग आपल्याला आतासारखं नाही बोलता येणार सतत.” त्याची घुसमट पाहून तिने “तर?” एवढाच प्रश्न केला. “मग आपण कमी बोलायची सवय केली पाहिजे.” ती गप्पच. या मुलीला समजतंय तरी का? आपण किती विचार करत आहोत तिच्या दूर जाण्याचा? त्याची मनातल्यामनात घालमेल. तेवढ्यात पाऊस कोसळू लागला. ती उभी राहिली, लहान मुलांसारखी हात पसरून गोल गिरक्या घेत, “कित्ती मोठ्ठा पाऊस!” म्हणून ओरडली. तिचं पावसाचं वेड आणि बालिशपणा त्याला नवा नाही. पण लगेच छत्री उघडून ती शांतपणे त्याच्यापाशी बसली. “मला आवडतं भिजायला पण..” “अगं, आवडत मग भिजावं खुशाल.” तो. “नको, काही महिन्यांनी पाऊस बंद होईल. मग कुठे येणार अशी मजा! त्यामुळे सवय करायला हवी.” आता तो वैतागला, “तू काहीही कुठेही जोडत्येस. पाऊस दरवर्षी येतो पण आपलं नातं नेहमीसाठी बदलणार आहे.” ती खळखळून हसून म्हणाली, “मग आत्ता जेवढे महिने पाऊस आहे तेवढं भिजावं की पुढचा विचार करून सगळे दिवस संपवायचे?” त्याला तिचा मुद्दा पटला. दोघांनी छत्री बंद केली आणि पावसामध्ये चिंबचिंब भिजले. निरोप घेताना ती म्हणाली, “आपण प्रयत्न करू ना लग्नानंतरही एकमेकांसाठी वेळ काढायचा.” तिने खूप प्रयत्न करून अडवलेलं डोळ्यातलं पाणी त्याला दिसलंच. गाडी सुरु झाली आणि तिचा विचार मनात घोळत असतानाच त्याला सकाळच्या तिच्या मेसेजच्या ओळींचा अर्थही समजला. त्यानेही व्हॉटस् अॅपवर लगेच स्टेटस अपडेट केलं... ये लम्हा फिलहाल जी लेने दे..
-      वैदेही सच्चिदानंद शेवडे.


गुरुवार, ६ जून, २०१३

“... तरी मला वाटलंच होतं!”
        
          
              “ तरी मला वाटलंच  होतं...”  एक ओळखीचा आवाज आला आणि त्या पाठोपाठ दारावर ठकठक ऐकू आली. तशी मी आणि नेहाने एकमेकींकडे सूचक नजरेनं पहिलं. मोठमोठ्यांनी हसत आमच्या अवाढव्य विजू काकू आत शिरल्या. “अग्गो बाईss, जागेच आहात का तुम्ही राजे? आज्जी भेटायला येणार हे समजलं होतं वाटतं तुम्हाला!” नेहाच्या बाळाला पाहायला आलेल्या आमच्या लाडक्या विजू काकूंनी त्यांच्या आवाजानी पूर्ण खोली दुमदुमून टाकली. “हो ना! आमच्या पिल्लुलापण आधीच वाटलं होतं तुम्ही येणार म्हणून. त्यामुळेच तर कधी नव्हे तो पोटोबा भरूनही झोपला नाही तो अजून.” मी काकूंना मारलेला टोला ऐकून नेहा तिथेच फिसकन हसली आणि आमच्या मातोश्रींनी आमच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला. काकूंना मात्र मी बोलले ते समजलंच नाही किंवा मला पामराला त्यांनी मनावर घेतलं नाही आणि नेहमीप्रमाणे समोरचा हसला तर आपणही हसावे म्हणून त्याही हसल्या. नेहाची आई तोपर्यंत सगळ्यांसाठी चहा घेऊन आली. चहाचा भुरका मारत काकूंनी आपली बडबड गाडी पुन्हा सुरु केली. “मला वाटलंच होतं तुला मुलगा होणार. म्हणून आधीच मी निळं झबलं घेऊन ठेवलं होतं पहा.” त्यांनी नेहाला झबलं दिलं. ते देताना त्यातून पावती पडली ती नेमकी माझ्याच पुढ्यात. मी पण अशी संधी सोडणार होते का? सरळ पावती उघडली आणि त्यांना “खरेदीची तारीख तर आजची दिसते आहे!” असं सांगितलं. आता मात्र आई माझ्याजवळ आली आणि मला अस्सा चिमटा काढला की मी पार कळवळले पण एवढ्या लोकात ओरडणार कशी? आणि ओरडले असते.. सांगितलं असतं माझ्या ओरडण्याचं खरं कारण मग तर मातोश्रींनी घरी जाऊन नुसती कणिक तिम्बवली असती माझ्या पाठीची. तसंही तिने माझ्यावर हात साफ करून खूप वर्ष झाली आहेत आणि म्हणूनच मी कशी शेफारले आहे असं ती परवाच बाबांना सांगत होती. तेव्हा किमान आई असेपर्यंत तरी मला गप्प राहणं भाग होतं हे मला समजलं. काकू समोर बसल्या आहेत आणि मला आता त्यांची खेचण्याचा आनंद मिळणार नाही म्हणून मी चरफडत होते. पण, तेवढ्यात आईला दादानी हाक मारली म्हणून ती आमच्या घरी निघून गेली. जाताना नेहाच्या आईलाही ती बाळासाठी तिनी बनवलेली दुपटी पाहायला घेऊन गेली. या शेजार शेजारच्या साळकया माळकया विजू काकू जाईपर्यंत तरी परत या घरी येणार नाहीत हे माझ्या लक्षात आलं. काकूंनी पण मी आहे ना तुमचं चालू दे असं त्या दोघींना सांगितलं.
          तसं पाहायला गेलं तर माझा आणि काकूंचा छत्तीसचा आकडा वगैरे नाही. आम्ही एकमेकींना अगदीच पाण्यात पाहतो किवा आमच्यातून विस्तवही जात नाही असं देखील नाही. उलट त्या आल्या की त्यांच्या गप्पा ऐकायला आणि नंतर त्यांची नक्कल करायला मीच पुढे असते. त्यांची खेचायला तर मला भारीच आवडतं. पुढे नेहाच्या बाळालाही ते शिकवण्याचा माझा विचार आहे. काकू सगळंच हसण्यावारी नेतात. लहानपणापासून मी त्यांना कधीच कोणाशी भांडताना पाहिलं नाही की ओरडताना ऐकलं नाही. सात मजली हास्याचा गडगडाट आणि “...तरी मला वाटलंच होतं.” या दोनच गोष्टी आम्ही त्यांच्या मुखातून ऐकत ऐकत मोठे झालो. लहानपणी मला खूप आश्चर्य वाटायचं. काकूंना बरं सगळं आधीच माहिती असतं..! आधीच सगळं कसं वाटून जातं..!! देवाला कौल लावण्यापेक्षा सगळे विजू काकुंनाच का नाही प्रश्न विचारत! असं नेहमी वाटायचं. अशी सर्वज्ञानी काकू आहे आमच्या इमारतीमध्ये याचं कसलं कौतुक होतं मला! पण हळूहळू माझ्या एक लक्षात आलं. सगळ्या गोष्टी झाल्यावर बऱ्या यांना आधीच वाटल्या होत्या असं सांगत फिरतात. मी कधी त्यांनी कसलं भाकीत केल्याचं आणि नंतर तसंच झाल्याचं ऐकलंही नव्हतं. बरं, असं झालं असतं तर कोणीतरी सांगितलं असतं. पण नाहीच. उलट इमारतीतीलंच नाही तर त्यांना ओळखणारे सगळे त्यांच्यामागून त्यांच्या या सवयीची खिल्ली उडवतात हे समजलं आणि माझं बालमन खट्टू झालं. मग आता मी अशी भरपूर त्रास देते त्यांना. पण तरीही त्या कधी मला रागवल्या नाहीत की आईला कधी चाहाडी केली नाही त्यांनी माझी. अर्थात मी मागून बोलणारी नसल्याने त्यांना समोरासमोर बोलत असे. बाकी सगळे त्या गेल्यावर खिसफीस करत राहत. एकूण काय! विजू काकू या सगळ्यांच्याच चेष्टेचा विषय बनल्या होत्या ते त्यांच्या “...तरी मला वाटलंच होतं.” या लाडक्या वाक्यामुळे. तरी आज आधी मातोश्रींकडून प्रसाद मिळाल्यामुळे माझं आता त्या कितीवेळा ‘त्या’ वाक्याचा जप करीत होत्या ते मोजायचं राहिलं. नाहीतर आम्ही मैत्रिणी त्या समोर दिसल्या की आधीच पैज लावत असू आणि मी सहसा जिंकत असे. माझा बिचारा हात त्या चिमट्यामुळे पाहता पाहता लाल झाला होता आणि तो भाग टरारून वर आला होता. मी हात चोळण्यात गुंग होते तेवढ्यात काकूंच्या हासण्याने माझी तंद्री भंग झाली.
          “तुला सांगते राणी..” त्यांनी माझ्याकडे पहिलं. “ही नेहा मला एकदा पेंडसे नगरला दिसली तेव्हाच मला वाटलं होतं की ही लग्न करून सोनावण्यांकडेच जाणार.” आता मात्र हद्द झाली. आमचं पिल्लू झोपलं होतं. नेहादेखिल पेंगुळली होती आणि ह्या बाई बसून काहीही पुड्या सोडत होत्या. त्यांचं हे वाक्य ऐकून मात्र कधी काही न बोलणारी नेहाही, “आता जरा जास्त होतंय हो काकू!” असं वैतागून म्हणाली. खरंच होतं नेहाचं.. उलट लहानपणापासून माझं आणि तिचं सोनावण्यांचा संकेत दिसला की डोकं फिरायचं. त्यात तो सगळ्यात हुशार म्हणून नेहाची आई सतत तिला तो बघ कसा..! असं सांगून अक्षरशः कान किटवीत असे आणि जेव्हा या काकूंनी तिला पहिली होती तेव्हा आम्ही तिथे संकेतचं प्रेमपत्र दुसऱ्याच एका मुलीला देण्यासाठी गेलो होतो. म्हणजे त्याला आम्ही पत्र पोहोचवतो असं सांगून तिला तो कसा तिच्यासाठी योग्य नाही असं मधल्यामध्ये सांगायला गेलो होतो. पुढे या दोघांचच लग्न घरच्यांनी लावून दिलं पण अगदी लग्नाच्या आधीपर्यंत आम्ही दोघी मिळून त्याच्या नावाने खडे फोडीत असू. आता हे सगळं आठवलं की जेवढी गम्मत वाटते तेवढीच आत्ता काकूंचं ऐकून वाटली कारण ज्या गोष्टीची खुद्द नेहालाच कल्पना नव्हती तेही काकूंना आधी वाटलं! नेहाही वैतागली आहे हे पाहून मी परत फॉर्मात आले. त्यांना म्हणाले, “काकू, सगळंच बरं तुम्हाला आधीच वाटून जातं! नाही म्हणजे खूप कौतुक आहे तुमच्या या गुणाबद्दल पण..” माझ्या डोक्यात कसल्यातरी विचारला चुरचुरीत फोडणी घातली गेली आहे हे नेहाच्या एव्हाना लक्षात आलं होतं. ती सरसावून थोडी पुढे झुकून मी आता काय बोलते आहे याकडे नीट लक्ष देऊ लागली. “पण काय?” काकूंना काहीच समजलं नसल्याने त्यांनी गोंधळून मला प्रश्न विचारला आणि इथेच मी अर्धी बाजी मारली म्हणून स्वतःवर खुश झाले. “पण काय आहे.. बरेच जण म्हणतात की तुम्हाला काही वाटत वगैरे नसतं तुम्ही आपल्या उगाचचं..” बोलता बोलता माझं नेहाकडे लक्ष गेलं ती माझ्या या वाक्यामुळे पार आ वासून पाहत होती. एवढा आ केला होता तिने की माझ्या मिनी मांजरीचं छोटं पिल्लुपण आत गेलं असतं तिथून. काकू कधी नव्हे त्या जरा अवघडल्यासारख्या झाल्या. पण स्वतःला सावरत म्हणाल्या, “हूह.. बोलणाऱ्यांच काय गं..! एवढे केस पांढरे झाले ते उगीच नव्हे हो. साधना आहे माझी ती. मला कळतं बाई सगळं. कोणी काही बोलू दे. आता हेच पहा ना नेहाचं लग्न, तिला मुलगा होणार हे पण मला वाटलं तसंच तर झालं. असंच असतं ते. मला वाटलं की तसं होतंच.” त्या थोडसं स्वतःशी पुटपुटत.. थोडं आम्हाला ठामपणे सांगत होत्या. त्या स्वतःलाच त्यांची थाप पटवून देत होत्या असंच वाटलं मला तरी. त्यांनी मोठ्या आशेने नेहाकडून सकारात्मक प्रतिसादासाठी पाहिलं. तिला जराही वेळ लागत नाही कुणाची कणव येण्यासाठी. त्या सांगत आहेत त्यात काही तथ्य नाही हे माहिती असूनही ती कसंनुसं हो म्हणाली. आता खरं पाहता मी त्यांच्या डोक्याला एवढं खाद्य पुरवून देऊन थांबायला हवं होतं. पण मगाचा आईचा चिमटा अजून ठुसठुसत होता ना. “तुम्ही त्या सगळ्याचं तोंड का नाही गप्प करत?” इति मी. त्या भांबावून माझ्याकडे पाहू लागल्या. “म्हणजे कसं आहे! तुम्ही एखाद वेळेस पहिलेच सांगून टाका ना काय होईल ते. मग तसं झालं की मी एकेकाचं तोंड कशी बंद करते पहा!” काकूंनी पाटल्यासारखी मान डोलावली. पण आता भाकीत कशावर करायला हवं त्यांनी? मी तर हा विचार केलाच नव्हता. मग मी उगाच अजून नको त्यांना त्रास म्हणून माझे पुढचे दिवस कसे जातील सांगा बरं असं म्हणाले. मी अंदमान यात्रेला निघाले होते. स्वतःच नेत असलेली माझी पहिली यात्रा. तेव्हा काय होईल यात्रेत ते सांगा. आता फक्त सगळं छानछान नाही, खरंखरं तुम्हाला काय वाटत आहे ते सांगा. अशीही पुढे पुस्ती जोडली. काकू थोड्यावेळ शांत बसल्या आणि मग अगदी दोन चार अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या की त्या कोणीही.. अगदी नेहाचं बाळही सांगू शकलं असतं. मी त्यांना परत “फक्त छानछान नाही, खरंखरं” याची आठवण करून दिली. मग म्हणाल्या, “सांभाळून गो पोरी. कोणीतरी महाभाग मोठ्ठा गोंधळ उडवणार आहे आणि तेही पहिल्या काही दिवसातच. मग सगळ्यांचा मूड खराब असेल.” मला वाटलं होतं काकू सपशेल हार स्वीकारतील पण या तर खरंच भाकीत करायला निघाल्या होत्या. मी अजून थोडी मस्करी करण्याच्या इच्छेत होते पण आईने हाक मारली. उद्या माझ्यासोबत यात्रेवर असणारे मला भेटण्यासाठी आले होते. तेव्हा काकू आणि नेहाचा निरोप घेऊन मी निघाले. मग संपूर्ण दिवस एकेक काम संपवून यात्रेच्या तयारीमध्ये गेला आणि काकूंच्या भाकीताबाबत मी पार विसरले. सकाळी लवकर घरातून निघायचं होतं आणि खूप थकले असल्याने पाठ टेकल्यावर लगेच डोळा लागला.
          सकाळी सगळी कामं आटोपून निघताना मी नेहाला भेटले. तेव्हा ती वेडी खूप काळजीत दिसली. माझा हात घट्ट पकडत म्हणाली, “काळजी घे. मला भीती वाटते आहे काल काकू ते बोलल्यापासून.” मी तर एवढं विसरले होते की मला आधी काही कळेच ना. मग तिला “हत् वेडी!” असं म्हणून निघाले. चेन्नईला आल्यावर सगळ्यांना एकत्र जमा करून मी अंदमानला जाण्यासाठी विमान तासाभराने आहे हे सांगून तिकीट नीट जवळ ठेवा हे पुन्हा पुन्हा सांगितलं. विमानतळावर जाण्यासाठी निघत असतानाच मला पाटील काकांचा ओरडण्याचा आवाज आला. त्यांना अगदी पहिल्या बैठकीपासून सगळ्यातच प्रश्न होते आणि सतत वाकडं तोंड करून ते असत. आता नवीन काय झालं? मी विचारायला गेले. “ही मुर्ख बाई, तिकीट सांभाळून ठेव म्हणालो तरी आता सापडत नाही म्हणते आहे.” सगळे आवाक झाले. मी बाकीच्यांना पुढे जाऊ दिले आणि शांतपणे त्यांना माझ्याजवळ मी एक कॉपी नेहमी ठेवते तेव्हा आता जाऊ दे असं सांगितलं. माझ्याजवळ असलेली प्रिंट मी त्यांना दाखवली. पाटील काकूंचा उद्धार करीत असलेले काका, गरीब बिचाऱ्या काकू आणि मी असे आम्ही पुढे निघालो. विमानात बसले आणि सहज मनात येऊन गेलं.. हाच का तो महाभाग? काय गोंधळ होणार अजून? आपण सगळं नक्की सांभाळू शकतो ना? मी काकूंच्या बोलण्याचा विचार करू लागले आहे..! माझं मलाच आश्चर्य वाटलं. सगळे विचार काढून मी खिडकीबाहेर डोकावू लागले. विमान वर जात असताना रात्रीच्या वेळेस असंख्य दिवे टीमटीमताना पाहायला मला खूप आवडतं. थोड्यावेळाने कसला तरी जोरदार आवाज आला. मी गोंधळून इथे तिथे पाहू लागले. एयर होस्टेसची धावपळ चालू होती. त्यांचा आवाज मला काहीसा विचित्र वाटला. विमानाला मोठ्ठा धक्का बसला. जोराने ते वर खाली झालं. आता मात्र मला काही सुचेनासं झालं. माझ्या मैत्रिणीची ड्युटी याचं विमानात आहे हे आठवून मी तिला बोलावलं. तीदेखील खूप घाबरलेली वाटत होती. तिने जे सांगितलं ते ऐकून माझी बोबडी वळली. आमचा वैमानिक म्हणे दारू पिऊन झोपला होता. आणि दुसरा विमान उडवायला आज घाबरत होता. असं कसं चालेल? आमचं काय होणार आता? मला काहीच सुचेनासं झालं. मी कशीबशी पुढे गेले. धडकन दार उघडून वैमानिक बसतात तिथे आत शिरले आणि बघते तर काय समोर एक चिम्पांझी माकड बसलं होतं. आता मात्र माझं डोकं सुन्न झालं होतं. मला काही समजत नव्हतं. एव्हाना पाटील काका ओरडत आत शिरले. विमान खाली हेलकावत जात आहे आणि आता ते माझ्यामुळे मारणार असं ते मला सांगत होते आणि त्याही परिस्थितीत ‘प्राणी प्रेमी’ मला तो चीम्पाझी खूप गोड वाटत होता आणि मी हसून त्याला पाहत होते. “अगं हसतेस काय मुर्ख मुली!” ते डाफरले आणि मला गदागदा हलवू लागले. काकांकडे माझं जराही लक्ष नाही हे समजल्यावर त्यांनी चिडून जवळच असलेलं धारदार असं काहीतरी जोरात माझ्या दंडात खुपसलं. मी कळवळले आणि त्यांच्याकडे पाहिलं. तर मला माझ्या शेजारी बसलेली छोटी प्रिया खिडकीत बसू दे ना असं सांगताना दिसली! आता मात्र मी गोंधळले आणि सभोवार नजर टाकली.. सगळं शांत निवांत होतं. माझी एयर होस्टेस मैत्रीण माझ्याकडे पाहून नेहमीप्रमाणे हसत जात होती. पाटील काका त्यांच्या बायकोवर करवादत होते. आणि मग ते सगळं?? आणि ते लोभस चिम्पांझी?? प्रियाने परत माझ्या दंडामध्ये आपलं इवलसं बोट खुपसलं. तिच्याकडे नजर गेली तशी तिच्या हातातली चिम्पांझीची फरची बॅग मला दिसली. “ओह.. सगळं स्वप्नंच होतं तर!” मी स्वतःशीच हसले. संपूर्ण यात्रा खूप चांगली झाली. पाटील काका मधून मधून कटकट करत होते पण शेवटच्या दिवशी माझ्या डोक्यावर हात ठेऊन यात्रा छान झाली आणि मी त्यांना किती आवडले! हे त्यांनी सांगितलं आणि मला हायसं वाटलं.
               घरी परत आले तर नेहा, बाळ आणि विजू काकू आमच्याचकडे बसल्या होत्या. मी आल्या आल्या यात्रा कित्ती छान झाली ते सांगितलं. तर विजू काकू लगेच म्हणतात कशा..! “तरी मला वाटलं होतंच की पोरीला काही त्रास होणार नाही आणि सगळ्यांना कशी खुश करून परतेल.” मी आणि नेहा एकमेकींकडे पाहत हसत सुटलो आणि दोघीही “तरी मला वाटलं होतंच.. यात्रा छान झाल्यावर विजू काकू असंच बोलणार...” असं जोरात एका सुरात ओरडलो. आईला काही समजलं नाही पण कधी नव्हे ते विजू काकू मात्र लगबगीने निघून गेल्या.

-      वैदेही शेवडे.

गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२


सुख ??

           सकाळी सहा वाजता गजर झाला. वीणाने नेहमीप्रमाणे बंद डोळ्यांनी झोपेतच चाचपडत तो बंद केला. गजराच्या आवाजाने बाळ उठलं तर सकाळची कोणतीच कामं आपल्याला वेळेवर पूर्ण करता येणार नाहीत. नाताळच्या सुट्टीचा आजचा शेवटचा दिवस, उद्यापासून महाविद्यालय सुरु होणार आणि परत सगळी धावपळ सुरु.. तेव्हा आज काय काय तयारी करून ठेवायची याची चक्र वीणाच्या डोक्यात चालू झाली. पेंगुळलेल्या डोळ्यांनी तिने अंगावरची दुलई बाजूला सारली. बाळ आणि बाबा दोघेही शांतपणे झोपले होते. बऱ्याच महिन्यांनी सुरेशनी रजा घेतल्यामुळे आठवडा कसा गेला समजलंच नाही. “ झोपू दे अजून दोघांनाही.. आपण आपलं सगळं काम उरकून घेऊ. ” तिने विचार केला. प्रेमाने दोघांच्याही गालावरून हात फिरवून अलगद चुंबन घेतले.

          थोड्याच वेळात वीणा आंघोळ करून केस पुसत बाहेर आली.  सुरेशची चुळबूळ पाहून आता थोड्याच वेळात साहेब उठतील आणि चहा मागतील हे तिला समजले. एकीकडे नाश्त्याची तयारी करत तिने चहाचे आधण गॅसवर ठेवले. बैठकीच्या खोलीत येऊन वर्तमानपत्र हातात घेईपर्यंत सुरेश उठलेच. चहा, उपमा आणि बातम्या अशा तीन गरमागरम गोष्टी घेऊन ती आत गेली. वीणाच्या लांबसडक केसातून अजूनही पाण्याचे थेंब खाली ओघळत होते. मुळातच असलेली नाजूक आणि गौर कांती थंडीमुळे किंचितशी गुलाबी झाली होती. पिवळसर रंगाच्या साडीवर लाल रंगाची फुले असलेली साधीच, घरात नेसायची साडी असली तरी वीणा त्यातही अगदी अगदी टापटीप आणि मोहक दिसत होती. झाडावर उमललेली ताजी गुलाबाची फुलं जास्त टवटवीत दिसत होती की वीणा हेच लक्षात येऊ नये अशी ती लोभसवाणी वाटत होती. सुरेशनी चहा बाजूला ठेवून तिला जवळ ओढले. “तुझे गाल पुण्याच्या थंडीमुळे असे गुलाबी झाले आहेत, की काल रात्री मी.. ” त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती नव्या नवरीप्रमाणे लाजली आणि अजून बिलगली. नाश्ता होईपर्यंत आर्या उठली. मग त्या बाहुलीला न्हाऊ माखू घालण्यात वीणा गुंग झाली. आर्या आता आई, बाब्बा, आज्जी असे बोबडे बोल बोलू लागली होती. तिच्या तोंडून असं ऐकून, तिची दिवसागणिक होणारी प्रगती पाहून ती सुखावून जात असे.

          आर्याला खेळामध्ये रमवून ती दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करू लागली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. “सुरेश, पाहता का कोण आलं आहे दारावर? मी इथे बाळाला सांभाळते आहे आणि काम करते आहे. ” बेल परत परत वाजत होती. आता मात्र वीणा वैतागली. ती दार उघडण्यासाठी वळते न् वळते तोच तिच्या लक्षात आलं की सुरेश तर आपल्याला सांगूनच आई अण्णांना आणायला गाडी घेऊन स्टेशनवर गेले आहेत. “ किती ग वेंधळी मी..! आताशा असं रोजंच होऊ लागलं आहे आपलं. सुरेश म्हणतात तसं खरंच मी एवढ्यातच म्हातारी झाले आहे.. ” पुटपुटत वीणाने दार उघडलं. शेजारच्या रमा काकू कसलासा प्रसाद घेऊन आल्या होत्या. वीणाच्या हातात प्रसाद देत त्या म्हणाल्या, “ हा प्रसाद घे म्हणजे यंदा पेढा मिळणार पहा आम्हाला.. ” त्यांचं बोलणं ऐकून वीणाच्या कपाळावरची शीर तडकली. कसनुसं हसून तिने तो प्रसाद निमुटपणे गिळला आणि दरवाजा लावून घेतला. “ केवढा चोंबडेपणा हा.. काय करायचं असतं यांना इतरांच्या आयुष्यात सतत डोकावून देव जाणे..!! जे आहे.. जसं आहे त्यात मी सुखी आहे हे कळत कसं नाही या लोकांना? ” तेवढ्यात तिचं लक्ष मिश्किलपणे हसणाऱ्या त्या पिल्लाकडे गेलं. “राणी, आपल्याला काही कमी आहे का? आहे की नाही सगळं आपल्याकडे? कशाला हवं अजून काही? ” आईचं बोलणं जणू समजल्यासारखं राणी हुंकार देत होती. त्या प्रतिक्रियेने वीणाच्या चेहऱ्यावर परत हसू फुललं.

          आज बऱ्याच दिवसांनी अण्णांना आवडते तशी काळ्या वाटण्याची उसळ छान जमली होती. आईंनीही कौतुक केलं. आपल्या बायकोचं कौतुक होतंय त्यामुळे सुरेशच आपल्यापेक्षा अधिक आनंदात होते. चार दिवस नातेवाईकांकडे जाऊन आल्यामुळे आई अण्णा मस्त ताजे होऊन आले होते आणि खरंतर सुट्ट्या आहेत हे पाहून आपल्याला एकांत मिळेल म्हणूनच ते काही कारण नसताना नाशिकला गेले हे तिला पक्कं ठाऊक होतं. लग्न झाल्यापासून सासू सासरे सोबतच राहत असल्यानं तिला त्यांची अगदीच सवय होती त्यामुळे हव्या हव्याशा एकांतातही एकटेपणा जाणवत होता. पण दोन दिवस माहेरचे आले असल्यामुळे घरात परत वडीलधाऱ्यांचा वावर झाल्यानं तिला बरं वाटलं. सगळं कसं दृष्टं लागण्याएवढं सुंदर.. सुरळीत.. स्वतःशीच विचार करत ती झोपलेल्या सुरेशना गुड नाईट किस देत आर्याशेजारी झोपली.

          आठवडाभराच्या सुट्टीनंतर पुन्हा सकाळी उठून सगळं आवरून कामावर जाण्याचा कंटाळाच आला होता. तरीही सुरेशचा कंटाळा जावा म्हणून त्यांना लाडीगोडीनं उठवत तिने भराभर आपलं आवरलं, डब्बा भरला आणि स्कुटीवरून कर्वे नगरला तिच्या महाविद्यालयात पोहोचली. बऱ्याच दिवसांनी विद्यार्थांचे घोळके, त्यांचा गलका ऐकून तिला बरं वाटलं. मगाशी घर सोडवत नव्हतं आणि आता आपण इतके दिवस या गर्दी, गोंधळ, आवाजाशिवाय कसे राहिलो असं वाटतंय..! वीणा गालातल्या गालात एकटीच हसली. सुट्टीनंतरचा पहिलाच दिवस असल्याने आज काहीही न शिकवता सगळ्या विद्यार्थ्यांसोबत गप्पागोष्टी करण्यातच वेळ गेला. वीणा प्रसन्न व्यक्तीमत्वाची, आकर्षक, बोलकी आणि प्रेमळ अशी.. केवळ तरुणच नाही त्यातही उंची जरा कमी आणि सततची मजा मस्ती, यामुळे लहानशी वाटत असे. ती सगळ्या विद्यार्थ्यांची लाडकी शिक्षिका तर होतीच पण गोल्ड मेडलिस्ट असल्याने विषयातले सखोल ज्ञान आणि अभ्यासाच्या वेळेस कडक शिस्तीत अभ्यासंच या नियमाने वागणारी.. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच सहकारी आणि वरिष्ठही तिच्याशी अदबीनं वागत. त्यादिवशी मितालीने डब्बा आणला नसल्याने त्या दोघींनी अन्नपुर्णामध्ये जाण्याचं ठरवलं. मिताली ही वीणाची लहानपणापासूनची जिवाभावाची मैत्रीण. आयुष्यामधील प्रत्येक बरे वाईट क्षण दोघींनी एकमेकींसोबत वाटून घेतले होते. कोणताही आडपडदा न ठेवता प्रामाणिकपणे त्यांनी हे नातं जपलं होतं.

          गेली अनेक वर्ष त्या दोघी अन्नपूर्णा हॉटेलमध्ये येऊन त्यांच्या आवडीच्या चीझ पावभाजीवर मनसोक्त ताव मारत. अगदी हॉटेलचे मालक कामथ काकाही त्यांना जवळून ओळखू लागले होते. बरेचदा गप्पांच्या ओघात दोघी ऑर्डर देण्यास विसरल्या की स्वतः काका त्यांची फर्माईश घेऊन हजर असंत. काकांसोबत गप्पा मारून झाल्यावर दोघी आत बसल्या. इकडचं तिकडचं बोलून होईपर्यंत पावभाजी आली. “ मला जरा तुझ्याशी काही बोलायचं आहे.. खूप महत्त्वाचं आहे.. आणि यावेळी तरी टाळू नकोस. प्लीझ.. ” पहिला घास तोंडात घेत मितालीने सांगितलं. वीणाच्या हातातला घास मात्र तसाच हातात राहिला. आता पुढे कोणता विषय निघेल याची तिला पूर्ण कल्पना होती आणि म्हणूनच ती वैतागली. तिचा वैताग.. चिडचीड सगळं मितालीपर्यंत पोहोचत होतं. तिने शांतपणे वीणाचा हात हाती घेऊन घट्ट दाबला आणि तिला शांत करण्याचा एक विफल प्रयत्न केला. वीणाच्या चेहऱ्यावर स्पष्ट नापसंती दिसत असूनही मितालीने तो विषय निश्चयपूर्वक काढलाच.

          “ लग्न कधी करणार आहेस राणी? अगं यावर्षी बत्तीस वर्ष पूर्ण होतील ना..! ” राणी.. किती वर्षांनी मितालीने अशी हाक मारली ..! आई बाबा लहानपणी प्रेमाने हाक मारायचे मला अशी.  वीणा स्वतःच्याच विचारांमध्ये.. “ उशीर झालाच आहे पण अजून वेळ गेली नाही. तू सुंदर आहेस, सुशिक्षित आहेस. उत्तम नोकरी आहे. मग काय हरकत आहे? आपल्यासोबातच्या सगळ्या मैत्रिणीची लग्न झाली आता. माझंपण पहा.. लग्नाला नको.. नको.. करता करता अविनाश भेटला आणि मी खरंच खूप सुखात आहे आता. अगदी आत्ता आत्तापर्यंत मलाही वाटायचं.. जाऊ दे तुला नाही करायचं ना लग्न नको करू.. काय बिघडणार आहे? पण खरं सांगू? अव्या, त्याचे आई बाबा, बाकी नातेवाईक यांच्यासोबत असले ना की खूप जाणवतं की तू उगाच या सगळ्यांना पारखी झाली आहेस आणि तेही स्वतः ठरवून. खरं म्हणजे आयुषीच्या जन्मानंतर मला जास्त जाणीव झाली तुझ्या एकटेपणाची..! ” वीणा अजूनही स्वतःतच अडकलेली... जणू मिताली तिथे दुसऱ्याच कोणाशीतरी बोलते आहे.. वीणा स्वतःच्याच कोषात... वेगळ्याच जगात हरवलेली.. तिच्या डोळ्यातील ते अलिप्त आणि हरवल्यासारखे भाव पाहून मितालीने तिला अक्षरशः हलवलं. जरा भानावर येईपर्यंत डोळ्यातून ते भाव टपाटप ओघळू लागले. जरासं थोपटल्यावर ती शांत झाल्यासारखी वाटली.. तोच परत “ तुझे आई वडील घटस्फोट घेऊन वेगळे झाले. दोघांपैकी कोणीच किंवा इतरही नातेवाईकांनी तुला मायेने वाढवलं नाही हे खरंच दुर्दैवी आहे. तुझी होणारी घुसमट.. तो त्रास.. तुझ्यावर होणारा अन्याय पाहायला मी नेहमीच तुझ्यासोबत होते. आयुष्यातल्या तुझ्या हातात नसलेल्या पण तुझ्या पदरी पडलेल्या सर्व अपयाशांना तू तुझ्या शिक्षणाने आणि जे तुला सोडून गेले त्यांनाही सतत हसतमुखाने मदत करून मात केलंस. आठवतंय.. आपण लग्न आणि पुढच्या आयुष्याच्या किती गप्पा मारायचो.. मला कधीच या कशाबद्दल आवड नव्हती, पण तू नेहमीच भरभरून बोलत असायची. माझ्या मुलीला मी असं शिकवेन.. नवऱ्यासाठी हे करेन.. आमचं घर... घरातली माणसं.. थकायची नाहीस असं बोलून.. बोलून.. मग आत्ता का असं वागतेस?? राहुलसोबत इतकी वर्ष असलेलं तुझं प्रेम नाही झालं यशस्वी.. तुला कधी समजलंच नाही तो तुझा केवळ फायदा घेत होता. जरा समजावलं तरी तुला मीच वेडी वाटले. यातून सावरून तुझ्या काकांनी पाहिलेल्या स्थळाला होकार दिलास.. पण साखरपुड्यानंतर लग्न मोडलं त्याने. त्यातही तुझी काहीच चूक नव्हती. अगं, बऱ्याच जणांच्या आयुष्यात असे चढ उतार येत राहतात पण म्हणून त्यांनी पुढचा रस्ता कसा असेल या भीतीने तिथेच थांबावं का? ” बोलता बोलता मितालीच आवाज चढला होता आणि वीणा लालबुंद होऊन.. हमसून हमसून रडत होती. तिला हे सगळं असहाय्य झालं होतं. आता एकाही क्षण इथे थांबणं शक्य नाही हे समजल्यावर सगळा जीव एकवटून “ मी माझ्या आयुष्यात खरंच सुखी आहे आणि मला अजून कोणाचीही गरज नाही.. ” असं सांगून ती एकटीच धावत हॉटेल बाहेर पडली. स्कुटी घेऊन थेट घरचा रस्ता धरला. वाटेत दिसणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा जणू तिला.. ही बाई दिसते तर बरी.. पण एकटी का आहे अजून?? असंच विचारात आहेत अशा वाटत होत्या.. बोचत होत्या. घराखाली स्कुटी लावत असताना रमा काकू तिच्याच बाजूने येताना तिला दिसल्या. घाईगडबडीत इमारतीत शिरेपर्यंत त्यांनी कितीतरी हाका मारल्या होत्या. “ हा मुलगा कसा वाटतो पहा.. तो पहा.. काय बाई..! मी इतकी स्थळं आणते पण तुला एकही पटत नाही. यंदाच्या वर्षी तरी लग्नाचा पेढा मिळू दे हो.. ” असं टुमणं वाजवत बसतील या विचाराने वीणा लिफ्टमध्ये शिरली.

          घरी येऊन थंड पाण्याने तिने खसाखस तोंड पुसले.. जणू त्या असावांसोबतच्या सर्व आठवणीही ती साफ करत होती. बऱ्याच दिवसांनी घरात एकटेपणा तिला जाणवत होता. बऱ्याच दिवसांनी.. कारण इतके दिवस तर आपण.. मनातल्या मनातही ते वाक्य ती पूर्ण करू शकली नाही. सुन्नपणे तिने दैनंदिनी उघडली. त्यात सुरुवातीच्या पानांवर होता तिचा एकटेपणा.. आणि नंतर तिने तिच्या मनाच्या खेळांनी त्यावर केलेली मात.. कोणालाही खरंच एखाद्या विवाहितेची वही वाचत असू असेच वाटेल. वाचता वाचता काही क्षण सुरेश, आई, अण्णा, आर्या, सगळी सगळी आपल्या मनाचीच पात्र असल्याचं तिला जाणवत होतं.. पण ते जग खोटं आहे हे मानण्याची मात्र तिची मुळीच तयारी नव्हती. शेवटी तिने नवे पान उघडले आणि त्यावर लिहिले.. मला ठाऊक आहे हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत.. आणि यामुळे एक दिवस ठार वेडी होईन मी. पण खरंतर एवढं सगळं पाहून अजून वेडी कशी झाले नाही तेच माझं मला समजत नाही. बाहेरच्या जगापेक्षा हे जग खरंच खूप चांगलं, सुरक्षित आहे. इथे मला कोणीही सोडून जात नाही आणि वेडी झाले तरी हे सर्व माझ्यासोबतच रहातील याची मला खात्री आहे. मी खूप सुखात राहते त्यांच्यासोबत.. खूप सुखात. ” तेवढ्यात तिला सुरेशनी हाक मारली. आर्या उठली असेल.. तिने दैनंदिनी तशीच ठेवली आणि आर्याला जोजवायला आत निघून गेली...

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१२


चूक 


 “ आई, किती वेळा सांगू तुला.... मला नाही बोलायचंय या विषयावर आता काही.”
“ अग सोनल, पण जरा......”
 “ आम्ही निर्णय घेतला आहे आणि मला खरंच वेळ नाहीये बोलायलाही तुझ्याशी. पाहतेस ना, एकमेकांशी निवांतपणे बोलण्यासाठीही वेळ नाहीये इकडे आम्हाला आणि त्यात मुलाची जबाबदारी....!! मुळीच शक्य नाही. हा आठवडा भरपूर काम आहे ऑफिसमध्ये, त्यामुळे पुढच्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये दाखल होईन.”
“ तुम्ही दोघे घरी या. आपण निवांतपणे बोलू यावर. मग पाहू. चालेल?”
“ आई, मलाही हे करताना काही फार चांगलं वाटत नाहीये. पण एक मुल सांभाळणं म्हणजे किती त्रास सहन करावे लागतात माहित्ये का तुला?”
“ तू मला विचारते आहेस? अग, आई आहे मी तुझी. तुला मोठं केलंच आहे की मी.”
“ तेच... अगदी तेच म्हणते मी. मला बाळाला सांभाळायचं आहे. फक्त मोठं नाही करायचंय.”
“ म्हणजे?? काय म्हणायचं आहे तुला?”
“ जाऊ दे ना आई. कशाला जुन्या गोष्टी काढायच्या परत परत...! मला खूप काम आहे इकडे. एक महत्त्वाची मिटींग सुरु होईलच इतक्यात. मला जायला हवं.”

          फोन समोरून ठेवण्यात आला. पण सोनलच्या आईच्या डोळ्यात मात्र पाणी साचलं होतं. डोळ्यातलं पाणी गालांवर ओघळलं तेव्हा नकळतच सुमेधा ताईंच्या मनात अजून एक विचार आला... किती वर्षांनी रडू आलं असेल आपल्याला? मनातली घालमेल दूर करण्यासाठी त्यांनी काहीतरी काम करायचं ठरवलं. पण खरंच.. काय काम करणार? सगळी कामं तर यशोदा बाई करून गेल्यात. मग उगाचंच आवरलेलं कपाट परत आवरायला घेतलं. त्यात त्यांना बऱ्याच जुन्या आठवणी सापडल्या. कपाटात अगदी खालच्या कप्प्यात कशातरी कोंबलेल्या. अगदी मनातही त्या अशाच होत्या.... खोल दाबून ठेवलेल्या,अस्ताव्यस्त.... एक अर्धा विणलेला पाय मोजा... काय झाला बाई नंतर त्याचं? का पूर्ण नाही करता आला मला? अरे हो.... मार्च महिना होता, ईयर एंडिंगची कामं होती. मग नाहीच जमलं पुढे काही. हे डोहाळजेवणाच्या वेळेचे फोटो. शिशिर आलेच नाहीत वेळेवर. सगळा कार्यक्रम झाल्यावर साहेब आले आणि तेही थकून लगेच झोपून गेले. साधं विचारलंही नाही पेढा सापडला की बर्फी. खूप राग आला होता तेव्हा. मी जरा बोलले यावर तर म्हणे बायकांचा कार्यक्रम तर होता. मी कशाला हवा होतो तिकडे? नाही म्हणजे खरंच पुरुष मंडळींचा काही खास सहभाग नसतो तिथे. पण, बाळ तर दोघांचं असतं ना? बाळाच्या बाबांनाच काही विशेष कौतुक नव्हतं तर आईनीच का म्हणून सगळं कौतुक आणि इतर जबाबदारी याचा पसारा सांभाळावा? असे अनेक विचार तेव्हा आले मनात. खरंच ऑफिस सांभाळून ही जबाबदारी पेलणं खूप कठीण. का हे असं आपल्या अंगावर पडलं? कंटाळवाणं वाटायचं. आपल्या मनाशीच स्पष्ट बोलतानाही आज मात्र का कुणास ठाऊक पण त्या चरकल्या. अल्बमची पुढची पानं जणू एक एक आठवण पुन्हा ताजी करत होती. सोनलचा जन्म... तिने रंगायला लागणं... चालण्यासाठी उचललेलं पाहिलं पाउल.... शाळेचा पहिला दिवस.... किती वर्षांनी आज परत त्या त्यांच्या छकुलीला मनमोकळं हसताना पाहत होत्या. एका फोटोत शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी नटलेली त्यांची ठकी पाहून त्यांनाही हसू फुटलं. पण पुढच्याच फोटोत ती नटलेली चिमुरडी दोन्ही हात पसरून रडत होती. काय झालं होतं तेव्हा?  बरोबर..... तिच्यासोबत कार्यक्रमाला जाता येणार नव्हतं म्हणून तिला रडू आलं होतं. किती रडलं होतं बाळ माझं तेव्हा. मिटींगदेखील महत्त्वाची होती. रात्री तिच्यासाठी एक बहुली आणली होती. पण घरी येईपर्यंत एवढा उशीर झाला होता की सोनल यशोदा बाईंच्या कुशीत झोपूनही गेली होती. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला असता ती झोपेतच “आईला वेळच नसतो माझ्यासाठी...” असंच काहिसं बडबडत होती.

          सुमेधा ताईंचे डोळे आता परत पाण्यानी डबडबले. पुढच्या फोटोंमध्ये त्यांच्या जागी यशोदा बाईच दिसत होत्या. नंतर मित्र मैत्रिणी.... आणि मग आशुतोष.... सोनलचा नवरा. सोनलचं त्याच्यावर असलेलं प्रेमही घरी पहिल्यांदा यशोदा बाईंनांच तर तिने सांगितलं होतं. असं का झालं असेल? का आपल्या मुलीला आपल्यापेक्षा कोणी परकी व्यक्ती जवळची वाटली? कुठे गणितं चुकली असतील? कदाचित माझं आणि शिशिरचं कामानिमित्तानं सतत बाहेर राहणं.....?? नाही... नाही... यात काय चूक? हे सगळं तर आपण सोनलसाठीच केलं. त्या स्वतःचीच समजूत घालत होत्या. स्वतःचं वागणं स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करत होत्या. पण काहीतरी चुकल्याची आज प्रकर्षाने त्यांना जाणीव होत होती. सहन करण्याच्या पलीकडे गेल्यावर मात्र त्यांनी परत सगळं कसंबसं कपाटात बंद केलं. ते कपाट तर बंद झालं पण मनाच्या कपाटात बऱ्याच विचारांची उलथापालथ होत होती आणि ते कसंतरी आवरून टाकणं किंवा बंद करणं शक्यच नव्हतं. मनाला जरा तरतरी यावी म्हणून त्यांनी गरम गरम कॉफी करून घेतली आणि वृत्तपत्रात तोंड खुपसलं. पण लक्ष मात्र कशातच लागत नव्हतं. आपल्या विचारांना पूर्णविराम मिळावा म्हणून त्यांनी घराबाहेर फेरफटका मारायला जाण्याचं ठरवलं. हातानेच केस सारखे करून आहेत त्या कपड्यानिशी त्या घराबाहेर पडल्या. काही विचार न करता वाट फुटेल तसं चालत राहायचा विचार त्यांनी केला. ‘लोकमान्य टिळक म्युन्सिपल जनरल हॉस्पिटल’..  त्याचं लक्ष त्या पाटीकडे गेलं आणि बरीच वर्ष जुनी एक आठवण ताजी झाली.

          सुमेधा ताईंना लग्नानंतर जेमतेम दोन महिन्यात दिवस गेले आणि वय अवघं अठरा वर्षांचं.. पण या बातमीने त्या मोहरून गेल्या. घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केल्यामुळे दरदिवशी काहीतरी विचार मनात येऊन एकटं वाटायचं. दोघांनी परस्पर संमतीने पूर्ण विचार करुन लग्नाचा निर्णय घेतला होता तरी आप्तांच्या वियोगाचं दुःख दोहोंच्या मनात सारखंच सलंत होतं. आता या बातमीमुळे तरी सगळं मळभ दूर होईल असं त्यांना वाटत होतं. शिशिर कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी कुठे होते मोबाईल फोन! त्यांनी लगबगीनं आपल्या माहेरचा रस्ता गाठला... मग सासरचा.. पण पदरी निराशाच आली. शिशिर परत येईपर्यंत काहीच सुचत नव्हतं. दोन दिवसांनी ते आले तेव्हा त्यांना ही गोड बातमी सांगितली. त्यांच्या चेहऱ्यावरही आनंदाचा लवलेश नव्हता. “आत्ता आपल्याकडे पैसे नाहीत. मला आपल्या मुलांसोबत असं चाळीत, पै न् पै चा हिशोब करत नाही रहायचं. त्यामुळे आत्ता हे शक्य नाही.” त्यांच्या बर्फासारख्या थंड आणि नकारात्मक प्रतिसादामुळे सुमेधा ताई पार कोलमडल्या. त्यांनी तरीही शिशिरना समजवायचा आटोकाट प्रयत्न केला. पण ते ठाम होते. दोन दिवसांनी दोघांनी हॉस्पिटल गाठलं. प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांनीही लगेच बाळंतपण नको असा सल्ला दिला. शरीराचे घाव भरले तरी मनातले घाव सतत ठुसठुसत होते. स्वतःचं घर, गाडी, दोघांचे गलेलठ्ठ पगार यासाठी पुढे जवळपास सहा वर्ष लागली. सततची धावपळ, त्यात शिशिरचा अलिप्त स्वभाव त्यामुळे वाटणारा एकटेपणा.. सगळ्यांची परिणीती म्हणून सुमेधा ताईंच्यामागे आजारपणं लागली. आता दोघेही बाळाच्या आगमनासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले खरे.. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनालची चिमुकली पाऊले त्यांच्या अंगणात उतरायला डॉक्टर, औषधं, नवस, गंडे-दोरे, असं करत करत पुढची सात वर्षें गेली. साहजिकच जे सहजासहजी मिळत होतं ते आपल्याच हाताने गमावल्यावर यंत्रवत अशा धावपळीच्या आयुष्याची आणि सातच्या स्पर्धेची सवय लागल्यावर कधीतरी स्वतःलाच हवहवसं वाटणारं आईपण आता त्यांना नकोसं झालं होतं. तेरा वर्षांपूर्वी जे सुख त्यांनी गमावलं होतं ते आता पदरात पडूनही त्यांना त्यात स्वारस्य उरलं नव्हतं. त्यांना पुढे घ्याव्या लागणाऱ्या सुट्ट्या, त्याचा त्यांच्या कामावर होणारा परिणाम, पदोन्नतीसाठी काही काळ थांबावं लागणार, असेच विचार आता सतावत होते. घरीही ओल्या बाळंतीणचे कोडकौतुक करणारे कोणीही नव्हते. यशोदा बाई याचं काळात भेटल्या. मग घर आणि पोर विश्वासाने त्यांच्यावर टाकून सुमेधा ताई आपल्या कामात पार गुरफटल्या. पोरीसाठी खेळ, कपडालत्ता, चांगल्या शाळा कॉलेजमध्ये प्रवेश, तिचे क्लासेस कशातच त्यांनी काही कमी पडू दिलं नाही. पण हे करता करता त्या लेकराकडे चार क्षण मायेने पाहण्याचं राहूनच गेलं.

          आता सोनलच्या बोलण्याचा अर्थ त्यांना उमगला होता. तिच्या निर्णयाला आपणच कारणीभूत आहोत या विचाराने त्यांना रस्त्यातच रडू फुटलं. टॅक्सी घेऊन त्या घराकडे वळल्या. सोनलला हे सगळं कसं समजवायचं? आपण चूक केली. पण तिने करू नये. बाळाला सांभाळायला, दोघांची काळजी घ्यायला आपण आहोत हे तिला कसं सांगायचं? या विचारात त्यांनी नेहमीप्रमाणे यशोदा ताईंना फोन लावला. नाही.. आपण परत तेच करत आहोत.. त्यांनी फोन बंद केला. आपल्या मुलीला आपण स्वतः समजू शकतो. आपली चूक तिच्यासमोर मान्य करण्यात कसला कमीपणा? त्यांनी मनाशी ठरवलं. घरी पोहोचेपर्यंत त्यांनी बरेचदा सोनालशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिने एकदाही फोन उचलला नाही. लहानपणी सोनलला काही हवं असलं किंवा काही सांगायचं असलं की ती घरी चिट्ठी ठेवून देत असे. मग ते मान्य झाल्यावर लाडाने दोन्ही हात पसरत असे. मिठी मारून गोड पापा देत असे. त्यांना आठवलं. आज त्यांना तिला हट्ट सोड असं सांगायचं होतं आणि खरंतर माफी मागायची होती. त्या लगेच तिला चिट्ठी लिहायला बसल्या. बराच वेळ.. स्वतःशीच हसत.. स्वतःशीच रडत होत्या. पण आता त्यांना खूप हलकं वाटत होतं. त्यांनी ते पत्र सोनलच्या डबेवाल्या काकांकडे सोपवलं. “ताईला सांगा मी रात्री जेवायला वाट पाहते.” त्यांनी काकांकडे निरोप दिला.

          सुमेधा ताईंची घालमेल आता वाढत होती. आशुतोषचाही फोन सोनल उचलत नव्हती. दोघेही आठ वाजल्यापासून अस्वस्थपणे तिची वाट पाहत होते. साडे दहाच्या सुमारास दाराची कडी वाजली. सोनलच असणार.. लहानपणी अगदी अशीच कडी वाजवायची ती.. स्वतःशीच पुटपुटत त्या उठल्या. दार उघडलं तर पाहतात काय.. सोनल.. डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते आणि दोन्ही हात पसरून ती दारात उभी होती. त्यांनी तिला घट्ट मिठी मारली. सोनलच्या हातात पत्र ते पत्र होतं. “आई, तू सगळं माझ्यासाठीच करत होतीस आणि तुझा अशा वागण्यामागे काहीतरी कारण असेल हे मी समजूच शकले नाही गं.. मला माफ कर.. मी चुकले.. चुकले...” सोनल बोलतच होती. तिला आत घेऊन ताईंनी पाणी दिलं. तिचा हात हातात घेऊन त्या म्हणाल्या, “चूक माझी होती.. आणि ती मला समजली आहे. तू फक्त तिची शिक्षा या बाळाला नको देऊस. मला वचन दे तू या बाळाला जन्म देशील. ” सोनललाही खरंतर बाल हवं होतं. पण लहानपणीच्या कटू आठवणी घर करुन होत्या. आता मात्र तिला सगळं समजलं होतं. आईबद्दल असलेल्या सगळ्या तक्रारी एका क्षणात दूर झाल्या होत्या. तिने वाचन दिलं आणि लवकरच दोघी मायलेकी नव्या पाहुण्याच्या स्वागताच्या तयारीमध्ये गुंतल्या.