शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

उशीर
         
            "तू हवं तेव्हा निघ. मी पोहोचेन वेळेतच... नेहमीप्रमाणे. पण, तू आजही उशिरा आलास तर मी थांबणार नाही. आज शेवटची भेटणार होते, तीही तशीच निघून जाईन." रस्त्यात वाट पाहत उभं राहण्याचा तिला अत्यंत तिटकारा. रागाने फणफणतच श्रेया घराबाहेर पडली. "आज काय तो सोक्षमोक्ष लावतेच. वेळ तर नसतोच कधी याला पण आता तर सतत चिडचीड! नेहमी वैतागून बोलतो." अशाच सगळ्या विचारात गढून गेली असल्याने पावसाळ्याचे दिवस असून ती छत्री घ्यायला विसरली. स्टेशन जवळ आलंच होतं एवढ्यात मुसळधार पाऊस सुरु झाला. छत्री विसरल्यामुळे स्वतःवरच वैतागली.
          चार पाच ट्रेन्स समोरून गेल्या, तरीही पावसामुळे तिला हताश होऊन, स्टेशनसमोर रस्त्यातच एका शेडखाली उभं राहावं लागलं होतं. "पाऊस नसता तरीही साहेबांची वाट पाहत असंच ठाणे स्टेशनबाहेर वाट पाहत थांबावं लागलंच असतं." तिची आतल्याआत धुसफूस सुरूच होती. पावसाचा जोर जरा कमी झाल्यावर तिने भराभर रास्ता ओलांडून प्लॅटफॉर्म गाठला. तर पुढची ट्रेन १५ ते २० मिनिटं उशिराने असल्याची घोषणा झाली. घड्याळाचा काटा पुढे जात होता तसा श्रेयाचा रागही वाढत होता. तेवढ्या वेळात दोन वेळेस श्रीकांतचा फोन येऊन गेला. तिने समजूनही दुर्लक्ष केलं. "फोन नाही उचलला की कसं वाटतं बघ आता!" तिने ठरवलं होतं. २० मिनिटांनी एक ट्रेन आली. तोपर्यंत गर्दी जास्त झाली असल्यामुळे श्रेया चढू शकली नाही. “किती वाजले?” तिने मोबाईल पाहिला. श्रीकांतचे ५ मिस कॉल!! "अरे वाह! रोज तर लक्षातही नसतं फोन वगैरे करावा असं. आज बरा वेळ मिळतो आहे!" तिने फोन पुन्हा बॅगेत टाकला. पाऊण तासांनी श्रेया ट्रेनमध्ये चढू शकली. "मी पोहोचलो आहे. ट्रेनचा गोंधळ आहे. सावकाश ये." "कुठे पोहोचलीस?" "मला काळजी वाटत आहे. मेसेज, कॉल पाहूनही उत्तर मुद्दाम देत नसशील तर असं करू नको, प्लिज." हा शेवटचा मेसेज वाचून तिने त्याला कॉल केला. बिचारा खरंच काळजीत होता. त्याच्या आवाजातून श्रेयाला ते लगेच समजलं. तरीही, आपला तोरा सांभाळत, तिने "आता वाट बघ आणि कसं वाटतं सांग!" असं तोंड वाकडं करत उत्तर दिलं. डोंबिवली ठाणे अर्ध्या तासाचं अंतर... पण, आज ट्रेन थांबत थांबत दिड तासाने ठाण्याला पोहोचली. तेवढ्या वेळात पाऊस, मोबाईलवरील गाणी, फोटोज, त्याचे अधूनमधून येणारे कॉल आणि मेसेज यामुळे तिचा राग मावळत होता. बऱ्याच दिवसांनी तो आपली वाट पाहतोय आणि त्याला अजून काळजी आहे, या विचाराने ती सुखावली होती.
          तशी श्रेयाही तापट. याबाबतीत अगदी श्रीकांतपेक्षा चार पावलं पुढेच. हे तिलाही मान्य आहे आणि मनापासून ती बऱ्याच वेळेस शांतपणे बोलायचा प्रयत्न करत असते. पण, आजकाल कामाच्या गडबडीत किंवा श्रेयाचा (अव)गुण लागल्यामुळे श्रीकांतही चिडका झाला आहे. कितीही "सोक्षमोक्ष लावायचा" ठरवलं तरीही दोघांनाही हे शक्य नाही हे माहित होतं. पण, तरीही एकमेकांपासून दूर जाण्याची भितीही होती. श्रेया स्टेशनबाहेर आली. समोरच तिला श्रीकांत दिसला. काळजी, आपण चुकलो असल्याची भावना, सगळं अगदीच स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. श्रेया थोडी हट्टी आणि लाडोबा असल्यामुळे राग ओसरला असला तरी ती काही एवढ्यात ते दाखवणार नव्हतीच. आपल्याला उशीर झाला पण, श्रीकांत कारणं देतो तसं आपलं अजिबात नाही. ट्रेनमुळे गोंधळ झाला. असा सगळा विचार तिच्या मनात चालू होता. चिडल्यावर, भाव खाताना, एखादा टोमणा ती सहज मारते. अगदी तशाच सवयीप्रमाणे ती सॉरी म्हणतानाही सरळ बोलणार नव्हतीच.
          "सॉरी... मी वेळेतच निघाले होते. पण, ट्रेन आणि पाऊस... काय करणार मी! तुझ्या आधीच पोहोचले असते. पण, बरं झालं... आता कसं वाटतंय मला उशीर झाला म्हणून!" श्रीकांतला तिच्या असं बोलण्याची खोड चांगलीच सवयीची होती. आज तो यावर चिडणार नव्हता. त्याने शांतपणे तिच्याकडे पाहिले. " उशीर झालाच तुला! खरंय! जरा आधी आली असतीस आयुष्यात तर आणखी आनंद मिळाला असता. आता फक्त एक काम कर. उशीर झालाय हे ठिक पण आता कधीच जाऊ नकोस." त्याच्या उत्तराने ती चकित झाली. राग तर ओसरला होताच पण, त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांनी उरलीसुरली कटुताही वाहून गेली. त्याने दिलेला रेनकोट तिने चढवला आणि बाईकवर बसून त्याला घट्ट मिठी मारून ती दोघं फुर्रर्र निघून गेली.


-      ­ © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे

२ टिप्पण्या: