अन्नपूर्णा
गोविंदवाडीमध्ये काहीतरी जादूच होती. लाखमोलाची माणसं ती! सण, उत्सव असो किंवा ओळखीच्याच काय तर कोणाही अनोळख्याला मदत करायची असो, सर्व अगदी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येत असंत. एकमेकांच्या सुखदुःखात असे काही एकाच रंगात रंगत असंत की कोणालाही त्यांचा हेव वाटावा! नाही म्हणायला काही खोचक भोचक मंडळी इथेही होती. पण, त्यांनाही सर्व आपलेपणाने वागवायची. इथे कोणाचंही पोरं, कोणाच्याही घरी खेळायला, जेवायला, अभ्यासाला, अगदी राहायलाही असायची. वाडीतील सुरकुतलेले हात कधी त्यांना गरमागरम खमंग थालीपीठ भरवत असंत तर कधी खरपूस रट्टेही देत होते. बरं यातही भेदभाव नाही! नाईकांच्या पिंट्याचा, सोमणांच्या राजूचा आणि आपल्या कार्ट्याचा अभ्यास घेताना जोशी काकू मनसोक्त कणिक तिंबून समाचार घेत असंत पण तिघांच्याही निकालाच्या दिवशी त्याच गोडधोड करत होत्या.
वाडीमध्ये
स्वामी समर्थांचं एक मंदिर होतं. केवळ वाडी नाही तर ठिकठिकाणाहून भाविक तिथे
दर्शनासाठी येत असंत. स्वामींच्या प्रकट दिनाचा सोहोळा तर काय वर्णावा! आधीच
उत्साही वाडी त्या दिवशी अधिकच गजबजून जात असे. पालखी काय, रोषणाई काय, विविध
सांस्कृतिक कार्यक्रम अगदी सप्ताहभर चालत असंत. प्रत्येकजण आपल्यावर सोपवलेली
जबाबदारी अत्यंत भक्तिभावानं पार पाडत असतानाच दुसऱ्याच्या कामात मदत करत असे. दर
वर्षी प्रत्येक कुटुंबावर वेगवेगळी जबाबदारी असे. पण, स्वामींच्या नैवेद्याची
जबादारी मात्र गोखले आजींकडेच होती. दोन तीन वर्ष ही जबाबदारीदेखील अन्य कुटुंबांकडे
देऊन बघितली होती म्हणे. पण, दरवेळेस काही न काही असे घडत असे की गोखले आजींचा हात
त्या नैवेद्याला लागल्यावरच तो पूर्ण होत असे. मग, उत्सवाचे दिवस सोडल्यास बाकी
दिवसांमध्ये दररोज एकेक कुटुंब स्वामींसाठी नैवेद्याचं ताट मोठ्या प्रेमानं आणि
सेवा भावानं मंदिरात नेत असे. पण, आजींच्या
हातचा नैवेद्य खाऊन स्वामींच्या चेहऱ्यावर जे तेज आणि आनंद दिसत असे तो इतर वेळेस
दिसत नाही, असं सर्व म्हणायचे. स्वामींची अन्नपूर्णाच ती जणू!
मला तर
स्वामींचा मोठा धाक वाटत असे. बाकी सर्व देव स्मित करत असताना, स्वामी मात्र
आपल्याकडे गंभीर मुद्रेने का बघत आहेत? आपण काही चुकलो का? आपण काय केलं की स्वामी
आपल्याकडेही हसून बघतील? एकदा तरी असं दिवस येईल का? असे अनेक प्रश्न मनामध्ये रोज
धिंगाणा घालत असंत. आईच्या ते लक्षात आलं होतं. मला अभ्यासाच्या, जेवणाच्या
वेळेसही धाक दाखवताना आई नेहमी म्हणायची, “जो चांगला अभ्यास करतो, ताटातील पदार्थ
संपवतो, त्याच्याकडे स्वामी हसून बघतात. नाहीतर चिडतात!” मग मी काही नं बोलता
पानात वाढलेली नावडती भाजी किंवा गणिताचा अभ्यास संपवत असे. रोज स्वामींना कोमल
मुद्रेने पाहण्याची प्रार्थना करत असे.
तर, गुण्यागोविंदाने नांदणारी अशी आमची
गोविंदवाडी...! पण, त्या वर्षी मात्र कोणालाच स्वामींचा प्रकट उत्सव अगदी ३
दिवसांवर आला तरीही काहीच करावे वाटत नव्हते. ठिकठिकाणाहून आलेले भाविक नेहमीच
गजबजलेल्या आमच्या वाडीतील त्या खास दिवसांमध्ये असलेली भयाण शांतता पाहून नवल करत
होते. वाडीतील जो माणूस दिसेल त्यांना आपलेपणाने याबद्दल विचारत होते आणि सत्य
जाणून घेतल्यावर हळहळत होते. स्वामींची अन्नपूर्णाच स्वामींनी स्वतःकडे बोलावून
घेतली होती. आता उत्सव कसा करावा? सर्वांसमोर मोठा प्रश्न होता.
गोखले
आप्पा... म्हणजे गोखले आजींचे पती... अगदी कडक शिस्तीचे. वाडीत कोणालाही काही
प्रश्न पडला, संकट आलं तर पहिले त्यांना आप्पा आठवत असंत. आप्पा स्वतःदेखील अत्यंत
संघर्षमय आयुष्य, अनंत अडचणी यांना तोंड देत खंबीर उभे होते. आजींच्या चेहऱ्यावर
याचा सार्थ अभिमान नेहमी दिसत असे. त्यांच्या आयुष्यातील असे कठीण क्षण मोकळेपणाने
सांगताना, पतीवरील प्रेम आणि अभिमानानं त्यांची प्रभा झळाळून निघे. अगदी तसेच तेज,
तसेच समाधान स्वामींच्या चेहऱ्यावर आजींच्या हातचा नैवेद्य चाखून दिसते असं सर्व
म्हणत असंत.
डोंगरासारखे
आप्पा,आजी गेल्यावर काडी मोडावे तसे आतून पुरते कोसळले. आयुष्यात नेहमी कडवट, कठोर
अनुभव आणि त्यावर एकट्याने दिलेला लढा, यामुळे आप्पा थोडे जास्तच स्वाभिमानी होते.
टोकाचे नास्तिक नसले तरीही फारसे भाविकही नव्हते. त्यांना मंदिरात कधी कोणी पाहिले
नाही पण, आजींच्या भक्तिला कधी त्यांनी आडकाठीही केली नाही. कोणताही भाव कधीच ते चेहऱ्यावर
दाखवून देत नसत. आजी गेल्यावरही त्यांनी खूप प्रयत्न करून डोळे वाहू दिले नाहीत.
पण, सतत पाणावत असलेले डोळे ते किती वेळ झाकणार होते! आजींना मुखाग्नी देताना
मात्र त्यांनी आभाळाकडे पाहून, “का केलेस रे हे असे?” असं देवाला विचारलं असेल का?
जमेल तेवढं बाहेरून शांत राहू पाहणाऱ्या आप्पांचे डोळे दिवस दिवस भकास दिसत होते.
रोज सकाळी फेरी मारताना टवटवीत दिसणारे आप्पा आता सुजलेल्या डोळ्यांनी, म्लान
चेहऱ्यानं, फिरत होते.
अशातच २
महिने गेले आणि उत्सवाचे दिवस असे भयाण शांततेत जात होते. देवा घरून हाक वाडीत
अनेक घरांमध्ये आधीही आली आली होती. काही दिवसांच्या दुखवट्या नंतर सर्व सुरळीत
होत असे. पण, आजींच्या जाण्याने मात्र पूर्ण वाडी सुन्न झाली होती. आता प्रकट दिन
तोंडावर आल्यावर मात्र वाडीतील कुजबुज वाढू लागली. सर्वांसमोर एकंच प्रश्न होतं.
“आता करायचं काय?” पण, आप्पा समोर आले की हा विषय बदलला जात असे.
अवघ्या २
दिवसांवर आता उत्सव आला. त्या रात्री चर्चा चालू होती. अचानक आप्पा तिथे आले.
“उद्या सर्वांनी नैवेद्य, भंडारा, बाकी उत्सवाची तयारी करण्यासाठी जे समान लागेल
ते घेऊन यायचं. या पोरांना पाठवा आत्ताच वर्गणीसाठी.” कधीही मंदिरात न दिसलेला
माणूस हे काय सांगतोय! सर्व अचंबित झाले. “उठणार का आता?” आप्पांच्या आवाजाने
विचारांमधून बाहेर पडत सर्व उत्सवाच्या तयारीसाठी पांगले. पण, आप्पांच्या आवाजातला
कंप, थकवा सर्वांना जाणवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तयारी करून पुन्हा वाडी
सजवण्यात आली. बऱ्याच दिवसांनी वाडीत चेतना जाणवत होती. पण, खरा प्रश्न तसाच उभा
होता... आजींशिवाय नैवेद्य पूर्ण होणार कसा???
तरीही पहाटेपासून सर्व बायका नैवेद्याच्या तयारीला लागल्या. मंदिराच्या
मागच्या भागातील मोकळ्या जागेत स्वयंपाक होत असे. सर्वांना जी शंका होती ती खरी
ठरली. एकदा ताजं असून दुध नासलं, मध्येच सांडलवंड झाली. नेहमीचं प्रमाण घेऊनही भजी
तेलात विरघळत होती. आतामात्र सर्वांच डोकं सुन्न झालं. काय करावं कळे ना झालं!
वाडीभर हे सर्व पसरायला वेळ नाही लागला. आप्पांच्याही हे कानावर आलं. आम्हा
मुलांचा ते अभ्यास घेत होते. पुस्तक बाजूला ठेऊन आप्पा उठले. कपडे बदलून बाहेर आले
आणि एक वही त्यांनी उघडली. “अरे ही तर आजींच्या पाककृतींची वही!” मी लगेच ती
ओळखली. वाडीतल्या सर्व आयाबायांची ती वही म्हणजे मदतीला धावून येणारी सखी. सर्व
मोजमाप, क्लुप्ती, आजी त्यात लिहून ठेवत. कोणीही काही खास पदार्थ करायचा असेल की
ती वही घेऊन जात असे. आप्पांनी नैवेद्याच्या शिऱ्याच पान उघडलं. आजींच्या
छायाचित्राकडे पाहून, “हेच हवं आहे ना तुला!” असं काहीसं म्हणाले आणि झपझप बाहेर
चालू पडले.
पुस्तकं,
वह्या आवरून आम्ही मुलं खाली आलो. बघतो तर काय! आप्पा एखाद्या सराईत
बल्लवाचार्यासारखे उभे राहून शिरा करत होते. सर्वजण अचंबित होऊन ते दृश्य पाहत
होते. पाच सहाशे जणांना होईल एवढा शिरा हा हा म्हणता झाला आणि त्यात एकही विघ्न
आले नाही. “आता बाकी पदार्थ करा.” आप्पांच्या आवाजाने सर्व भानावर आले. काय
चमत्कार! खरंच, सर्व पदार्थ आता बरोबर होऊ लागले. आप्पा संपूर्ण वेळ तिथेच उभे
राहून एकेक सूचना, वहीत पाहून देत होते. सर्व स्वयंपाक वेळेत झाला. स्वामींना
नैवेद्य दाखवण्यासाठी दामले गुरुजी ताट घेऊन मंदिरात गेले. तेवढ्यात कोणीतरी मोठ्यानं
ओरडलं... आम्ही सर्व धावत बाहेर आलो.
आप्पा
जमिनीवर बसले होते... की कोसळले होते? लालबुंद चेहऱ्यावरून अश्रू ओघळत होते. “झालं
का ग तुला हवं ते? तुझा नैवेद्याचा नेम नाही मोडला मी.” आम्ही सर्व अवाक्! “आता जे
आहे ते गोड मानून घे रे बा, देवा!” आप्पांनी हात जोडले होते. दामले गुरुजी नैवेद्य
दाखवून बाहेर आले. आपल्या जीवाभावाच्या मित्राला त्यांनी उभं केलं. जवळ घेतल. “आत
ये. जरा शांत हो.” असं म्हणत त्यांनी आप्पांना आत नेलं. आज पहिल्यांदाच त्यांना
कोणी मंदिराच्या आवारात पहिले. “तिच्या आठवणीने जीव पिळवटून निघतोय आणि दुसरीकडे
तिचा नेम नाही चुकला, माझ्या हातून सेवा घडली याचं समाधानही आहे!” आप्पा बोलत
होते.
मला
त्याचे अश्रू बघवत नव्हते. मी तडक गाभाऱ्यात स्वामींकडे धाव घेतली. “का असे कठोर
झालात तुम्ही?” आज जाबच विचारणार होते. पण, आज स्वामी माझ्याकडे प्रसन्न मुद्रेने
पहात होते. “आजींच्या हातचा नैवेद्य चाखुन स्वामी प्रसन्न दिसतात असं वाडीतले सर्व
म्हणतात ते हेच का?” मला पहिल्यांदाच हे स्वरूप पाहायला मिळालं. आज असं कसं
झालं??? मी थोडी अजून जवळ जाऊन स्वामींना निरखून पाहू लागले... आणि उत्तर
मिळालं... त्यांच्या ओठांवर काही लागलं होतं... आप्पांनी केलेल्या शिऱ्याचे कण होते
ते...!!!
- ©वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.
सुंदर! डोळ्यात पाणीच आलं टचकन!
उत्तर द्याहटवा